महापालिका

किवळा साठवण तलावाचे काम पूर्ण, नांदेड दक्षिणला आता दररोज पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न

नववर्षाच्या पूर्वसंध्येला नांदेडकरांसाठी आली गुड न्यूज...१७ दलघमी पाण्याचा जलसाठा उपलब्ध, १२ दलघमी पाणी महापालिकेसाठी आरक्षित, शेतकऱ्यांसह इतर व्यवसायालाही पाणी मिळणार

नांदेड – लोहा तालुक्यातील किवळा येथील साठवण तलावाचे काम पूर्ण झाले असून आजघडीला येथे १७.२६ दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. या प्रकल्पातून महापालिकेसाठी १२ दलघमी पाणीसाठा राखीव ठेवला जाणार आहे. या पूर्ण झालेल्या साठवण तलावास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जलसंपदा विभागाचे अधिकारी यांनी मंगळवारी संयुक्तरीत्या भेट देऊन या साठवण तलावाची पाहणी केली. या तलावातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यातून नांदेड दक्षिण शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाणार असून अमृत 2.0 योजनेअंतर्गत तब्बल १३७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. नववर्षाच्या पूर्वसंध्येला नांदेडकरांसाठी अतिशय आनंददायक बाब पुढे आली आहे

नांदेड महापालिकेने लोहा तालुक्यातील किवळा येथे प्रारंभी घनकचरा व्यवस्थापनासाठी जवळपास २० एकर जागा घेतली होती. या जागेमध्ये पुढे घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प न करता येथे साठवण तलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. या साठवण तलावास राज्य शासनाकडूनही मंजुरी घेऊन हे काम पूर्ण करण्यात आले आहे. आजघडीला येथे १७.२६ दलघमी जलसाठा उपलब्ध झाला आहे. यातील १२ दलघमी पाणी महापालिकेसाठी आरक्षित करण्यात आले आहे. हे पाणी यावर्षीपासूनच उपलब्ध होणार आहे. उर्वरित पाणी शेती पिकांसाठी तसेच इतर व्यवसायासाठी जलसंपदा विभागाकडून दिले जाणार आहे. नांदेड महापालिका या साठवण तलावातील पाणी उचलण्यासाठी इंटेक वेल, जॅक वेल, पंपहाऊस याच ठिकाणी उभारणार आहे. सर्व पंपिंग मशिनरी त्यासोबतच वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र सोलार प्रकल्पही या ठिकाणी उभारण्यात येणार आहे.
 या साठवण तलावातून पाणी उचलून ते थेट असदवन येथील ३५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाईल आणि तेथून पाणी शुद्धीकरण करून ते नांदेड दक्षिणला पुरवण्यात येणार आहे. यासाठी किवळा साठवण तलाव ते असदवन जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जवळपास ९.२ किलोमीटर अंतराच्या जलवहिनी टाकण्यात येणार आहे.  विशेष म्हणजे ही सर्व जलवाहिनी कॅनॉलमार्गे टाकल्या जाईल. त्यामुळे भूसंपादनाचा कोणताही खर्च महापालिका अथवा जिल्हा प्रशासनाला उचलावा लागणार नाही. किवळा येथून असदवन जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत कच्चे पाणी उचलण्याचे हे काम जवळपास दीड वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न नांदेड महापालिकेकडून केला जाणार आहे. यासाठी अमृत 2.0 योजनेअंतर्गत १३७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
बुधवारी करण्यात आलेल्या या संयुक्त पाहणीसाठी नांदेड महापालिकेचे उपायुक्त अजितपालसिंघ संधू, उपायुक्त गुलाम सादेख, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे यांचीही उपस्थिती होती.

याच ठिकाणी उपलब्ध असलेल्या महापालिकेच्या उर्वरित जागेवर अमेझॉन पार्क अथवा विरंगुळा केंद्र उभारले जाणार आहे. येथे पर्यटन स्थळ विकसित करण्याबाबतही प्रयत्न केले जातील असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. त्याचवेळी येथे बोटिंग व इतर पर्यटन विषयक बाबीही विकसित केल्या जाणार आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीकडूनही आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. या साठवण तलावामुळे नांदेड महापालिकेला पाणी उपलब्ध होणार आहेच त्याचवेळी येथे चांगले पर्यटन स्थळही विकसित करण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील, असा विश्वास महापालिकेचे आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!