
नांदेड – वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही वर्तनात सुधारणा होत नसल्याने अर्धापूर ठाणे हद्दीतील तिघा जणांना नांदेड जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिले आहेत. जिल्ह्यात २०२४ मध्ये १५ टोळ्यांमधील ४५ जणांना नांदेड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारांना स्थानबद्ध तसेच हद्दपार करण्यासंबंधाने पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत कारवाई केली जात आहे. अर्धापूर पोलीस ठाण्यातून कलम ५५ महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये विशाल मधुकर डोलारकर वय २७, रा. लंगडेगल्ली, अर्धापूर, नितीन साहेबराव चव्हाण वय ३१, रा. कृष्णानगर, अर्धापूर आणि गणेश मारुती घोरपडे वय २२, रा. शिवाजीनगर, मालेगाव ता. अर्धापूर या तिघांच्या हद्दपारी संबंधाने पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव प्राप्त पाठविण्यात आला होता. या प्रस्तावासंदर्भात कायदेशीर चौकशीची प्रक्रिया पूर्ण करून पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी एका टोळीतील उपरोक्त तिघांना नांदेड जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार केले आहे. याबाबत अंतिम आदेशही पोलीस अधीक्षकांनी पारित केले आहेत. २०२४ मध्ये कलम ५५ महाराष्ट्र पोलीस अधिनियमांवर १५ टोळ्यांमधील ४५ इसमांना नांदेड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
१२ व्यक्तींना एका वर्षासाठी कारागृहातच केले आहे स्थानबद्ध… नांदेड जिल्ह्यातील धोकादायक व्यक्तींना स्थानबद्ध करण्यासंबंधीने २५ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यातील १२ व्यक्तींना एमपीडीए कायद्याअंतर्गत एका वर्षासाठी कारागृहातच स्थानबद्ध करण्याची कारवाई केली आहे.