क्राईम

नांदेडमध्ये महसूल पाठोपाठ पोलीस विभागाचीही वाळू माफियांवर कारवाई; बारा लाखांचे तीन इंजिन जप्त

नांदेड ग्रामीण, लिंबगाव, सोनखेड ठाणे हद्दीत गोदावरी काठावर पोलिसांची कारवाई सुरू

नांदेड – वाळू माफियांसाठी मोकळे कुरण ठरलेल्या गोदावरी घाटातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या विरुद्ध मंगळवारी महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला तर बुधवारी पोलीस पथक या घाटावर धडकले आहे. मंगळवारी महसूल विभागाने केलेल्या कारवाईत १२ लाखांचे तीन इंजिन जप्त करण्यात आले आहेत. बुधवारच्या कारवाईतील तपशील अद्यापपर्यंत हाती येऊ शकला नाही. ही कारवाई अजूनही सुरूच असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बुधवारी पोलीस दलाच्या वतीने भल्या पहाटे नांदेड ग्रामीण, सोनखेड आणि लिंबगाव ठाणे हद्दीत अवैध वाळूमाफियांविरुद्ध कारवाई हाती घेण्यात आली आहे. नांदेड ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली जात आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तासह अधिकारी गोदावरी घाटावर पोहोचले आहेत. पोलीस दलाच्या कारवाईची माहिती मिळताच महसूल विभागाचे पथकही या घाटावर पुन्हा एकदा रवाना झाले आहे. सोनखेड ठाणे हद्दीत गेल्या महिनाभरात वाळू माफियाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू आहे.  तरीही वाळूमाफियाही थांबत नसल्याचेच वास्तव पुढे आले आहे

मंगळवारी महसूल विभागाच्या पथकाने कल्लाळ, बोरगाव येथे गोदावरी नदीमध्ये अवैध वाळू उपसा करणारे ३ इंजिन जप्त करून क्रेनच्या साह्याने तहसील कार्यालयामध्ये रात्री उशिरा आणले. ज्याची किंमत अंदाजे १२ लाख रुपये आहे. गोदावरी नदीमध्ये शासनाच्या अधिकृत वाळू डेपोशिवाय कोणी उत्खनन करून आढळून आल्यास यापुढे सुद्धा कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील, असे प्रशासनातर्फे गावातील ग्राम महसूल अधिकारी यांच्यामार्फत सांगण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत  व  नांदेड उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार संजय वारकड यांच्या नेतृत्वाखाली पथक प्रमुख स्वप्निल दिगलवार, मंडळ अधिकारी नहणू कानगुले, कुणाल जगताप, राजेंद्र शिंदे, ग्राम महसूल अधिकारी रणवीरकर, खेडकर, कदम, सकवान, माधव भिसे इत्यादी या कारवाईत सहभागी होते.

जिल्ह्यात बिहार, उत्तर प्रदेशातील ५० हजारांहून अधिक मजूर…एखाद्या घरमालकाला भाडेकरू ठेवताना त्याची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर घर अथवा रूम भाड्याने देणे बंधनकारक आहे. मात्र जिल्ह्यात आजघडीला  बिहार आणि उत्तर प्रदेशातील ५० हजाराहून अधिक मजूर नांदेड वाळू उपसा करण्यासाठी ठिकठिकाणी वास्तव्य करून आहेत. या मजुरांची कोणतीही माहिती संकलित नाही. मजुरांसह अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोकही  वाळूमाफियांनी नांदेड जिल्ह्यात आश्रयास ठेवले आहेत. या मुजरांमार्फत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करून मोठी कमाई केली जात आहे. या मजुरांना शेतामध्ये झोपड्या तयार करून ठेवले जात आहे. त्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था करून त्यांना दिवस रात्र वाळू उपसा करायला लावला जात आहे.  गोदावरी नदीत हजारो इंजिनच्या मदतीने वाळू उपसा केला जात आहे. स्थानिकांच्या मदतीने नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पातूनही वाळू उपसा केला जात आहे. येथील अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मजुरांकडून गावठी कट्ट्यांचा जिल्ह्यात पुरवठा होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी विपिन इटनकर  यांनी केलेल्या कारवाईत नांदेड ग्रामीण ठाण्यात बिहारी मजूर आणि त्यांना आश्रय देणाऱ्या शेतकऱ्यांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर मात्र असे गुन्हे दाखल करण्यास कोणीही धजावले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!