
एखादं क्षेत्र करियर म्हणून निवडायचं आणि त्यात समर्पित वृत्तीने आणि एकनिष्ठतेने काम करून त्या क्षेत्रात नावारूपाला यायचं त्याची उंची गाठायची आणि यश डोक्यात जाऊ न देता आपल्या अजातशत्रू स्वभावाने ते यश टिकवून ठेवायचं, हे अभावानेच आढळलं. नांदेडबद्दल बोलायचं झालं तर असे अभावाचे व्यक्तीमत्व आहे है. सामनाचे नांदेड ब्युरो चीफ विजय जोशी आणि ते क्षेत्र आहे, पत्रकारितेतील.
अत्यंत निकराचा संघर्ष करीत आणि ज्येष्ठ पत्रकारांची शिकवण तंतोतंत आचरणात आणत विजय जोशी यांनी पत्रकारितेत जी प्रतिष्ठा, नावलौकिक मिळवला आहे तो केवळ प्रशंसनीयय नाही तर अनुकरणीय आहे. विजय जोशींनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातच पत्रकारितेची चुणूक दाखवली बिलोली तालुक्यातील अर्जापूर येथील महाविद्यालयात भित्तीपत्रक प्रसिध्द करून विजय जोशींनी ज्येष्ठ पत्रकारांचे लक्ष वेधून घेतले. ग्रामीण भागात पत्रकारिता शिकण्याची कोणतीही व्यवस्था नसतांनाही त्यांनी एकलव्याच्या एकनिष्ठतेने पत्रकारितेचे धडे गिरवले. पदवीधर झाल्यानंतर त्यांनी पत्रमहर्षी अनंत भालेराव यांच्या मराठवाडा या दैनिकासाठी वृत्तांकन केले. अनंत भालेराव यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा आणि सव्यसाची पत्रकारितेचा विजय जोशी यांच्यावर कमालीचा प्रभाव होता. अनंत भालेराव यांच्या व्यासंगाचे, परखड विचार प्रदर्शन आणि सामाजिक बांधीलकीशी एकनिष्ठता याचे अनुकरण करत मराठवाडयात पत्रकारांची जी पिढी घडली त्यात विजय नोशी यांचा अग्रक्रमाने समावेश करावा लागेल.
मराठवाडा दैनिकातील अनुभवाने विजय जोशींचे लिखाण अधिक प्रगल्म झाले. वाचन आणि मनन यांच्या सहाय्याने त्यांनी पत्रकारितेतील आपले लिखाण समृद्ध केले. कमलबाबूंनी सुरु केलेल्या लोकपत्र या दैनिकात उपसंपादक म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी केली. त्यांचे अनेक लेख वाचकांच्या पसंतीस उतरले. अनेक सामाजिक प्रश्नावर त्यांनी हिरीरीने लेखन केले. लोकपत्रनंतर त्यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘सामना’ या वृत्तपत्राचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम सुरु केले. सामनामध्ये काम करतांना हे पद टिकविण्यासाठी त्यांना सामना करावा लागला; पण संघर्ष हा स्थायीभाव असलेल्या विजय जोशींनी आपला प्रामाणिकपणा, पत्रकारितेशी नि:स्सीम एकनिष्ठता यांच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर लीलया मात केली. गेल्या २५ वर्षापासून ते सामनाचे काम यशस्वीपणे हाताळत आहेत. आज ते ब्यूरो चीफ आहेत. पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार संघाच्या वतीने जी आंदोलने केली गेली त्यात विजय जोशींनी समरसतेने सहभाग नोंदवला आहे. पत्रकारांच्याच नव्हे तर अनेकांच्या प्रश्नाना विजय जोशींनी जापल्या लिखाणाव्दारे वाचा फोडली आहे. पत्रकार संघाच्या कामातील त्यांची एकनिष्ठता पाहून पत्रकार नेत्यांनी त्यांच्यावर पत्रकारांची अनेक जवाबदारीची पदे सोपविली. सध्या ते महाराष्ट्र राज्याच्या पत्रकार अधिस्वीकृती समितीचे विभागीय अध्यक्ष आहेत; पण पद आणि प्रतिष्ठा विजय जोशींच्या डोक्यात कधी गेली नाही. त्यांचे पाय नेहमी जमिनीवरच राहिले आहेत.
पत्रकारिता करतांनाच विजय जोशींनी आपला गायनाचा छंदही जोपासला. आपल्या या छंदाचा उपयोग देशसेवेसाठी करण्याचा योग आला तो २६ नोव्हेंबर २००८ रोजी या दिवशी दहशतवाद्यांनी मुंबईतील अनेक रस्त्यावर अंधाधुंद गोळीबार करून शेकडो लोकांचे मुडदे पाडले. हा हृदयद्रावक प्रसंग टीव्हीवर पाहून विजय जोशींचे हळवे मन दु:खी झाले. पण त्यांनी क्षणार्धात दु:ख बाजूला सारून धीरोदात्तपणे त्यांनी “सैनिकहो तुमच्यासाठी” या का सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन केले. विशेष म्हणजे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला त्याच दिवशी कुसुम सभागृहात हा कार्यक्रम झाला तेव्हापासून आजपर्यंत विजय जोशींचा हा कार्यक्रम महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशभरातील नागरिकात राष्ट्रभक्ती प्रखरपणे जागवीत आहे.