
नांदेड :- स्वच्छ भारतासाठी स्वयंप्रेरणा आणि सामूहिक कृतीला बळकटी देण्यासाठी २०१७ पासून वार्षीक स्वच्छता ही सेवा (SHS) पंधरवाडा साजरा केला जातो. केंद्र शासनाच्या सुचनानूसार यावर्षी दि.१७ सप्टेंबर ते दि.२ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता ही सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात आला असून या वर्षी “स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता ” नामे हे अभियान राबविण्यात येणार आहे. नांदेड महापालिका आणि जिल्हा परिषद हे अभियान राबविणार आहे. नांदेड शहरातील स्वच्छतेचा उडालेला बोजवारा पाहता आता खुद्द जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनीही शहर स्वच्छतेच्या अनुषंगाने सूचना केल्या असून स्वच्छतेच्या वेळापत्रकात बदल करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे.
नांदेड महापालिका स्वच्छतेसाठी दरमहा जवळपास अडीच कोटीहून अधिक रक्कम आर.अँड बी. नामक ठेकेदाराला अदा करते. यातून किती रक्कम प्रत्यक्ष स्वच्छतेवर खर्च होते अन् किती रक्कम संबंधितांना वाटण्यात जाते, हा एक मोठा चर्चेचा विषय बनला आहे. विभागप्रमुखाचे स्वच्छतेच्या कामाकडे दुर्लक्ष करून हात ओले करून घेण्याचेच प्रयत्न सुरू असतात. त्यामुळे दरमहा होणारी कोट्यवधीची उधळण पाण्यातच जात आहे. शहरातील अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्नही अनेक भागात उद्भवला आहे. अनेक भागात चार चार दिवस कचरा उचलला जात नाही. वजिराबादसारख्या मध्यवर्ती भागात असलेल्या हुतात्मा स्मारकही कचऱ्याच्या गर्तेत अडकलेले आहे. त्यामुळे नेमकी स्वच्छता कुठे केली जाते, हा प्रश्नही पुढे येतोच. त्यामुळे शहरातील स्वच्छतेची झालेली ही परिस्थिती पाहता आता खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनाच पुढाकार घ्यावा लागला आहे. शहर स्वच्छतेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शहर स्वच्छतेच्या वेळा बदलण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील काही भागात झिरो वेस्ट हाऊसेस ही संकल्पनाही सुचवली आहे. शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयक जनजागृतीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्यक्षात ठेकेदाराने स्वच्छतेविषयी जनजागृती करावी अशी जबाबदारी कराराद्वारेच सोपवली आहे. मात्र आर.अँड बी. ने असा एकही जनजागृती उपक्रम राबविला नाही. त्यामुळे आर.अँड बी. ची पाठराखण कशासाठी केली जात आहे हेही एक आश्चर्यच आहे. त्यामुळे आगामी काळात आता महापालिका जिल्हाधिकाऱ्यांच्या या सूचनांची कितपत अंमलबजावणी करते हेही लवकरच स्पष्ट होणार आहे.
स्वच्छता ही सेवा या उपक्रमात शहरातील मोठ्या प्रमाणावर गलिच्छ व अस्वच्छ ठिकाणे साफ करण्यासाठी स्वच्छता मोहिम राबविणे. या मोहिमेस नागरिकांचे समर्थन व सहभाग, स्वच्छता कामगारांच्या योगदानाची ओळख, भारतातील स्वच्छता आणि शाश्वत कचरा व्यवस्थापन भविष्यासाठी वचनबध्दतेची पुष्टी करणे असे स्वच्छता ही सेवा या अभियानाचे उद्दिष्टे आहेत. या मोहिमेच्या अनुषंगाने मंगळवारी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोइफोडे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांसह अभियान नियोजनाची बैठक घेतली. सदरील बैठकित शहरातील अस्वच्छ भाग, रस्ते, चौक, रहिवासी भाग, तसेच गोदावरी नदी घाट अशा विविध ठिकाणी स्वच्छता शपथ घेत विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. २ ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदही स्वच्छता ही सेवा मोहीम राबविणार – मीनल करनवाल…राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी दिली. या मोहीमेत गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर स्वच्छतेशी संबंधित विविध उपक्रम राबवले जातील. या मोहिमेदरम्यान १७ सप्टेंबर ते १ आक्टोंबर या कालावधीमध्ये दर दिवशी गाव स्तरावर स्वच्छतेचे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. मोहीमेत सफाई मित्र सुरक्षा शिबिर आयोजित करून सफाई मित्रांसाठी एक खिडकी योजनेद्वारे विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यात येईल. १९ सप्टेंबर रोजी श्रमदानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे सार्वजनिक स्थळे, धार्मिक स्थळे, बाजारपेठा, नद्यांचे किनारे, रस्ते आणि पर्यटन स्थळांची स्वच्छता करण्यात येणार आहे. या श्रमदान उपक्रमात स्थानिक नागरिकांसह एनएसएस, एनसीसी विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, विविध मंडळे, आणि शासकीय कर्मचारी सहभाग घेण्यात येणार आहे. तसेच गावागावात एक झाड आईच्या नावे उपक्रमांतर्गत वृक्षारोपण केले जाईल. दिनांक २९ सप्टेंबर रोजी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील स्वच्छता प्रकल्पांचे उद्घाटन होईल. त्याचप्रमाणे १ ऑक्टोबरला जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छता प्रतिज्ञा घेतली जाणार आहे. या मोहीमेच्या समारोप कार्यक्रमात २ ऑक्टोबर रोजी प्रत्येक गावात स्वच्छ भारत दिवस साजरा केला जाईल तसेच स्वच्छ माझे अंगण स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कुटुंबांना सन्मानित करण्यात येईल. या मोहिमेत गावकरी, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ही मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.