
नांदेड – अवैधरित्या गुडगुडीच्या सहाय्याने वाळू उपसा करणाऱ्या गंगाबेट येथील चंद्रकांत रघुनाथ बनसोडे याच्यावर नांदेड ग्रामीण पोलिसानी कारवाई केली आहे.गुडगुडी यंत्रासह पाच ब्रास रेती असा एकूण सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई २८ एप्रिल रोजी सायंकाळी करण्यात आली.
जिल्ह्यात ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी वाळूची अवैध वाहतूक व उपसा करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्या अनुषंगाने नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली २८ एप्रिल रोजी सायंकाळी नांदेड तालुक्यातील गंगाबेट येथे चंद्रकांत रघुनाथ वानखेडे रा. बेटसांगवी हा गंगाबेट येथून वाहणाऱ्या नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून ग्रामीण पोलिसांनी येथे छापा टाकला. येथे वाळू उपसा गुडगुडी यंत्राच्या साह्याने केला जात होता. वाळू उपसा करणारे गुडगुडी यंत्र आणि पाच ब्रास वाळू आढळून आली.
या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ मांजरमकर हे करीत आहेत. या कारवाईत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्यासह पोना माधव डफडे, पोकॉ जमीर, पोकॉ कांबळे हे सहभागी झाले होते.
वाडी पाटीवरील दगडफेक तडजोड न झाल्यानेच..!शनिवारी नायब तहसीलदार यांच्या पथकावर वाडी पाटी येथे झालेल्या हल्ल्यानंतर ग्रामीण पोलिसांची ही कारवाई या भागात अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याचे स्पष्ट करणारी ठरली आहे. महसूल अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकावरील आल्यानंतर वेगवेगळ्या बाबीही पुढे येत आहेत. सदरील पथकाकडून काही वाहने तडजोडीनंतर सोडून दिले मात्र काही वाहने अडवून धरले. यातूनच वाद निर्माण झाला आणि दगडफेकीचा हा प्रकार घडल्याचेही काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही वाळू उपसा करण्यास परवानगी नसताना मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात वाळूचे साठे आढळून येत आहेत. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख मार्गावरून सर्रासपणे वाळू वाहतूकही सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी वाळूची साठेबाजी करून ती पुढे चढ्या दराने विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात साठा करण्यात येत आहे. यासाठी वाळू माफिया कोणकोणत्या विभागाची मूक संमती कोणत्या मार्गाने घेतात हेही सर्वश्रुत आहे. ह्याच मूक संमती आणि तडजोडीतून मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील नद्यांची अक्षरशः चाळणी होत आहे.