क्राईम

नांदेडमध्ये आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या, दोन दिवसात दोन घटना उघडकीस

खुपसरवाडी येथील गुरुगोविंद सिंघजी मेमोरियल स्कूल ऑफ नर्सिंग कॉलेजच्या टीचिंग स्टाफकडून मानसिक त्रास होत असल्याचा आरोप, गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे दिवसभर ठिय्या आंदोलन

नांदेड – दहावीत कमी गुण मिळाल्यामुळे निराश झालेल्या अंबानगर येथील विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. त्या पाठोपाठ गुरुवारीही नांदेडमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने कॉलेजमधील शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. १२ मे पासून हा विद्यार्थी बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह १५ मे रोजी गोदावरी नदीपात्रात हस्सापूर शिवारात आढळला आहे. या प्रकरणात खूपसरवाडी येथील गुरुगोविंद सिंघजी मेमोरियल स्कूल ऑफ नर्सिंग येथील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी गुरुवारी दिवसभर ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणात वजीराबाद ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली. प्रकरणाचा अधिक तपास केला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी दिली.

खूपसरवाडी येथील गुरुगोविंद सिंघजी मेमोरियल स्कूल ऑफ नर्सिंग येथे पुनीत विनोदराव वाटेकर (वय २०) हा विद्यार्थी तिसऱ्या वर्षातील सहाव्या सत्रात शिकत होता. हा विद्यार्थी मूळचा शिरसोली, जिल्हा वर्धा येथील आहे. तो भाड्याने धनगरवाडी येथे राहत होता. त्याची बहीण श्वेता वाटेकर ही सुद्धा नर्सिंगचे शिक्षण घेत होती. सध्या कॉलेजमध्ये परीक्षा फॉर्म भरून घेतले जात होते. त्याचवेळी या अभ्यासक्रमाचे असाइनमेंट करण्यासाठीही कॉलेज स्टाफकडून विद्यार्थ्यांकडे तगादा लावला जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. परीक्षेची तयारी करायची की असाइनमेंट दिलेल्या कमी मुदतीत द्यायची असा प्रश्न सर्वच विद्यार्थ्यांपुढे उभा राहिला होता. यातून अनेकांनी असाइनमेंट संदर्भात मुदत द्यावी अशी मागणी कॉलेज प्राचार्य यांच्याकडे केली होती; मात्र त्यांनी ती फेटाळून लावली. त्याचवेळी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूकही दिली जात असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. प्रामुख्याने कोरे या दांपत्याकडून विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक छळ केला जात असल्याचा स्पष्ट आरोप विद्यार्थ्यांकडून यावेळी करण्यात आला आहे. असाइनमेंटच्या याच तगाद्यामुळे मानसिक ताण येऊन पुनीत वाटेकर याने आत्महत्या केल्याचा आरोप त्याची बहीण श्वेता वाटेकर आणि आईने केला आहे. या प्रकरणात त्यांनी वजीराबाद पोलीस ठाण्याकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

यावेळी कॉलेजमधील शेकडो विद्यार्थी पुनीत वाटेकरला न्याय मिळावा या मागणीसाठी प्रारंभी ग्रामीण पोलीस ठाणे आणि त्यानंतर वजीराबाद पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातही आपले म्हणणे मांडले. या ठिकाणी आपली दाद घेतली जात नसल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते रमेश सोनाळे यांच्या नेतृत्वाखाली या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणात कॉलेजच्या स्टाफविषयी तक्रार केली. त्यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या प्रकरणात दोन्ही बाजूने म्हणणे ऐकून घेतले जाईल, असे स्पष्ट केले. कॉलेज प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाचारण केले जाईल तसेच विद्यार्थ्यांचीही मते जाणून घेतली जातील असे जिल्हाधिकारी कर्डिले यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कर्डिले यांच्या या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले. वजीराबाद ठाण्यात या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नांदेडच्या शैक्षणिक क्षेत्रात सलग दोन दिवसात घडलेल्या या घटनांमुळे एकच खळबळ उडाली आहे. शैक्षणिक क्षेत्रातील या ताण-तणावाकडे आता गांभीर्याने पाहणे गरजेचे झाले आहे. समाजातील सुज्ञ घटकांकडून या बाबीची नोंद न घेतल्यास अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होईल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!