नांदेड जिल्हा

नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा महापुराचा फटका, नांदेड शहरासह अनेक गावात पाणी शिरले, जनजीवन विस्कळीत

विष्णूपुरी प्रकल्पातून गोदावरीत तीन लाख क्युसेसपर्यंत पाणी सोडले जाणार, नांदेड- हैदराबाद महामार्गासह अनेक रस्त्यावरील वाहतूक पुरामुळे ठप्प, जिल्हाभरात बचाव कार्यालाही वेग

नांदेड – नांदेड जिल्ह्याला पुन्हा एकदा महापुराचा फटका बसला आहे. नांदेड शहरासह जिल्ह्यातील अनेक गावात पाणी शिरले असून नांदेड- हैदराबाद महामार्गासह अनेक रस्ते पुरामुळे वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. त्यात विष्णूपुरी प्रकल्पातून सध्या सुरू असलेला दीड लाख क्युसेसचा विसर्ग आता तीन लाखापर्यंत नेला जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नांदेड शहरासह गोदावरी काठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात सहा तालुक्यात २५ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
नांदेड जिल्ह्याला पुन्हा एकदा महापुराचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील लोहा, कंधार, अर्धापूर, मुदखेड नांदेड, मुखेड, नायगाव, देगलूर, धर्माबाद, हदगाव हे तालुके पुन्हा एकदा पुराच्या विळख्यात अडकले आहेत. नांदेड- हैदराबाद या राज्य महामार्गासह प्रमुख रस्त्यावरील वाहतूक थांबली असून जिल्ह्यातील अनेक गावांचा पुराच्या पाण्यामुळे संपर्क तुटला आहे. नांदेड शहरातील अनेक भागांमध्ये पाणी शिरले आहे. गोदावरी नदी पुन्हा एकदा धोक्याच्या इशारा पातळीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. विष्णूपुरी प्रकल्पात १ लाख ६० हजार क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे. तितकाच विसर्ग विष्णुपुरीतून गोदावरी नदीपात्रात केला जात आहे. पुढील काळात हा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने नांदेड जिल्ह्याला २६ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाडी, खाजगी कोचिंग क्लासेस, यासह इतर शैक्षणिक संस्थांना सुट्टी घोषित केली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच पावसाला प्रारंभ झाला. शनिवारी पहाटे संपूर्ण जिल्हाभर मुसळधार पाऊस झाला. अजूनही पाऊस सुरूच असून गोदावरी नदीपात्र पुन्हा एकदा ओसंडून वाहत आहे. नावघाट पूल वाहतुकीसाठी बंद झाला आहे. नांदेड शहरातील श्रावस्तीनगर, सादतनगर, तेहरानगर, गाडीपुरा कालापूल, वसरणी, मोर चौक, काबरानगर, यशनगरी आदी भागात पुराचे पाणी शिरले आहे. पासदगाव येथील आसना नदीच्या पुराचे पाणी पुलावरून जात असल्यामुळे नांदेड ते मालेगाव या मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद झाली आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात धर्माबाद तालुक्यातील बेलूर पुलावरून पाणी वाहत आहे. अर्धापूर तालुक्यातील शेलगाव या गावाचा संपर्क तुटला आहे. मुखेड तालुक्यातील शिकारा येथे राहत्या घरावर पिंपळाचे झाड पडून घराचे मोठे नुकसान झाले आहे. देगाव, बाऱ्हाळी- मुक्रमाबाद- निवळी येथे पुलावरून पाणी वाहत आहे. बेरळी रस्ता ही बंद झाला आहे. लोहा तालुक्यातील उमरा येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने उमरा ते रूपसिंग तांडा, परसराम तांडाकडे वाहतूक बंद आहे. देऊळगाव व चितळी येथे ओढ्यास पूर आला आहे. धनंज खुर्द येथील पुलावरून पाणी जात असल्याने संपर्क तुटला आहे. सोनखेड हद्दीतील निळा, डेरला या गावचाही संपर्क तुटला आहे.  उस्माननगर पोलीस स्टेशन हद्दीतील जोशीसांगवीमधील पुलावरून पाणी जात आहे. डोंगरगाव येथील घोटका येथे जाणारा पूल पाण्याखाली आहे. दोन मंदिरात पाणी शिरले असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पाणी आले आहे. चोंडी येथील बंधारा पाण्याखाली गेला आहे. धानोरा – खांबेगाव येथे पुलावरून पाणी वाहत आहे. भेंडेगाव येथे पुराच्या पाण्यात झाडावर अडकून पडलेल्या एका व्यक्तीस स्थानिक शोध आणि बचाव पथकामार्फत बाहेर काढण्यात आले आहे. कंधार तालुक्यातील बहाद्दरपुरा येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. देगलूर तालुक्यात जवळपास आठ गावांमध्ये पुलावरून पाणी जात असल्याने तात्पुरत्या स्वरूपात येथील संपर्क तुटला आहे. नांदेड तालुक्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे राहेगाव येथे पुलावरून पाणी जात असल्याने संपर्क तुटला आहे. वाणेगाव ते वरखेड हा रस्ता बंद झाला आहे. कासारखेडामार्गे एकदरा जाणारा नाला भरल्यामुळे रस्ता बंद करण्यात आला आहे. निळा- एकदरा पुलाच्या बाजूने पाणी वाहत असल्याने तो रस्ता बंद झाला आहे. तळणी ते दरेगाव हा रस्ता पुराच्या पाण्यामुळे बंद झाला आहे. पिंपळगाव खुर्द आहेत कोरका येथे कॅनॉल फुटल्याची घटनाही पुढे आली आहे. हदगाव तालुक्यात शेंबाळपिंपरी ते तळणी हा रस्ता बंद झाला आहे.

विष्णूपुरी प्रकल्पात जायकवाडी, माजलगाव, सिद्धेश्वर, निम्न दुधना आणि खडकपूर्णा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. विष्णूपुरी प्रकल्पामध्ये सध्या १ लाख ६० हजार क्युसेसची आवक सुरू आहे. पुढील सहा ते सात तासात ही आवक तीन लाख क्युसेसपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या विष्णूपुरी प्रकल्पातून १ लाख ६० हजार क्युसेस विसर्ग गोदापात्रात सोडण्यात आला आहे. हा विसर्ग येत्या पाच ते सहा तासात अडीच ते तीन लाख क्युसेसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नांदेड शहरालगत गोदावरी नदीची पातळी इशारा २५१ मीटरच्या वर जाण्याची शक्यता आहे. नांदेड शहर तसेच गोदावरी काठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!