
नांदेड : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत राष्ट्रीय लोक अदालत पार पडली. या लोक अदालतीत नांदेड महापालिकेने ५ कोटी ११ हजार रुपये मालमत्ता कराची वसुली केली आहे. नांदेड शहरातील ३ हजार २१८ मालमत्ताधारकांनी थकबाकीवरील शास्तीत ८० टक्के सुट योजनेचा लाभ घेतला.
शनिवारी सकाळी १०.३० वाजेपासून या लोक अदालतीस सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय लोक अदालतीसाठी आलेल्या मालमत्ताधारकांना मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, न्यायाधीश आर.पी.शिंदे, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार यांनी कायदेविषयक बाबी समजावून सांगितल्या. यावेळी मालमत्ताधारकांच्या तक्रारीचे निरसनही करण्यात आले. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये नांदेड शहरातील ३ हजार २१८ मालमत्ताधारकांनी थकबाकीवरील शास्तीत ८० टक्के सूट योजनेचा लाभ घेतला. यावेळी मालमत्तधारकांनी ५ कोटी ११ हजार २१५ रुपये इतक्या मालमत्ता कराचा भरणा केला आहे.
या राष्ट्रीय लोक अदालतीस महापौर कविता संतोष मुळे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश एन.के. ब्रह्म, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस.जी. देशपांडे, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर न्यायाधीश आर.पी. शिंदे, नांदेड पॅनल प्रमुख श्रीमती व्ही. डी. सोनवणे, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम, उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधू, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे, क्षेत्रिय कार्यालयाचे क्षेत्रिय अधिकारी मिर्झा फरहतुल्लाह बेग, विठ्ठल तिडके, रावण सोनसळे, गौतम कवडे, राजेश जाधव, नागनाथ पतंगे, न्यायालयीन कर्मचारी शेख अखील अहमद, एम.बी. भोसीकर, डी.एल.मनसकरगेकर, सर्व क्षेत्रिय कार्यालयाचे वसुली पर्यवेक्षक, वसुली लिपीक व त्यांचे सहाय्यक उपस्थित होते.
या लोक अदालतीच्या अनुषंगाने मालमत्ता धारकांना आपल्या मालमत्ता कराविषयी असलेल्या तक्रारीचे निवारण करुन नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा करुन महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोक अदालतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा मार्फत ज्या मालमत्ता धारकांचा मालमत्ता कर २५ हजार रुपयांहून अधिक थकित आहे त्यांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या.
नांदेड महापालिका हद्दीतील ज्या मालमत्ताधारकांनी आपल्या मालमत्ता कराचा अद्याप भरणा केला नाही त्यांनी तात्काळ कर भरणा करावा व भविष्यात मनपाकडून होणा-या जप्ती, नळबंद करणे, ड्रेनेज बंद करणे, लिलाव करणे या सारख्या अप्रिय कारवाया टाळाव्यात असे आवाहन मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.



