
नांदेड – लोहा पोलीस ठाणे हद्दीत महामार्गानजिक रात्री वेळेपेक्षा अधिक काळ सुरू ठेवलेल्या हॉटेल, धाबे, पानटपरी चालक अशा १५ जणांविरुद्ध लोहा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. आगामी काळातही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा लोहा ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी दिला आहे.
नांदेड जिल्हा तसेच नांदेड पोलीस परिक्षेत्रात कोणतीही आस्थापना दुकाने, हॉटेल, धाबे पानटपरी ही ठरवून दिलेल्या वेळेनंतर सुरू ठेवण्यात येऊ नयेत, असे आदेश पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिले आहेत. लोहा पोलिसांनी केलेल्या पेट्रोलिंगदरम्यान ३० ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजल्यानंतर लोहा शहरामध्ये महामार्गालगत काही हॉटेल, धाबे, पानटपरी व काही दुकाने ही सर्रासपणे चालू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे लोहा पोलीस स्टेशनच्या विविध पथकांनी सदर आस्थापनाधारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. ठरवून दिलेल्या वेळेपेक्षाही जास्त वेळ आस्थापना चालू ठेवणे या अपराधासाठी गुन्हे दाखल केले आहेत.महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३३ (w) प्रमाणे १५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या १५ जणांविरुद्ध न्यायालयामध्ये खटला पाठविण्यात आला आहे. त्याचवेळी रात्री उशिराने संशयितरित्या कुठलेही काम नसताना शहरांमध्ये विनाकारण फिरणाऱ्या दोघांना चोरीच्या संशयावरून अटक करून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२२ प्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आगामी काळातही निश्चित वेळेपेक्षाही जर कोणी आपली आस्थापना सुरू ठेवत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा लोहा ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी दिला आहे.
उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांची धास्ती..!जिल्ह्यात अवैध धंदे चालकांनी महानिरीक्षक शहाजी उमाप तसेच पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या विशेष पथकांची धास्ती घेतली आहे. त्यात आता भरीस भर म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव हेही रुजू झाले आहेत. गुरव यांनी नांदेड शहरात उपविभागीय पोलीस अधिकारीपदी काम केले आहे. त्यामुळे त्यांनाही शहराची पूर्ण माहिती आहे. या माहितीचा फायदा घेत गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये एक प्रकारे धडकीच भरली असून उपमहानिरीक्षक उमाप यांच्या तसेच अबिनाश कुमार यांच्या विशेष पथकांनी जिल्ह्यात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. त्यामुळे अवैध धंदेवाल्यांनी आता भूमिगत होणेच पसंत केले आहे. अनेक वाळू माफीयांनी देवदर्शनाचे बेत आखले आहेत. जिल्ह्यात काही प्रमाणात अवैध वाळू काही प्रमाणात अद्यापही सुरूच असल्याची बाब पुढे येत असली तरी नद्यांची अमाप लूट मात्र काही प्रमाणात थांबली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी मनावर घेतल्यानंतर अवैध धंदे चालणे किती कठीण आहे याचा प्रत्यय आता जिल्ह्यात अवैध धंदे चालकांना येत आहे.