अपघात

पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या गुंज येथील सात महिलांना आलेगाव शिवारात जलसमाधी 

शेतमजुरांना घेऊन आलेले ट्रॅक्टर थेट विहिरीतच कोसळले; दोन महिलांसह एका पुरुषाला वाचवण्यात यश, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेबद्दल केला शोक व्यक्त

नांदेड – पोटाची खळगी भरण्यासाठी आणि मोडक्या तोडक्यात संसाराला हातभार लावण्यासाठी दिवस उजाडताच घराबाहेर पडलेल्या सात महिलांना आपला जीवनाचा प्रवास अर्ध्या वाटेतच शुक्रवारी संपवावा लागला. वसमत तालुक्यातील गुंज येथून शेतमजुरांना घेऊन येणारे एक ट्रॅक्टर शेतात पोहोचल्यानंतर थेट विहिरीत कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात घडली. या घटनेत सात महिलांना जलसमाधी मिळाली. दोन महिलांसह एका पुरुष मजुरास वाचवण्यात यश आले आहे. जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन दल महापालिका अग्निशमन दल यांच्या ६ तास केलेल्या अथक परिश्रमाला मात्र अपेक्षित यश येऊ शकले नाही. नांदेड तालुक्यात घडलेल्या या घटनेबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे.
पोटासाठी हाती पडेल ते मजुरीचे काम करण्याची तयारी ग्रामीण भागातील महिलांची आहे. इतकेच नव्हे तर दिवस उजाडताच संपूर्ण कुटुंबाला, आपल्या लहानग्या वर्ष दोन वर्षाच्या पोटच्या गोळ्यांना, चिमुकल्यांना सोडून कामाच्या ठिकाणी पोहोचण्याची लगबगही भल्या पहाटेपासूनच सुरू असते. अशीच लगबग शुक्रवारी पहाटेपासूनच वसमत तालुक्यातील गुंज गावातील एका वस्तीमध्ये सुरू होते. एकमेकींना निघण्यासाठी विचारणा सुरू होते. काम झाले का, गाडी आली का याबाबत चौकशी होत असते. एकमेकींना लवकर होऊ द्या, असा संदेशही दिला जात असतो. शेवटी कामावर घेऊन जाण्यासाठी तो ट्रॅक्टर सकाळी साधारणत: सात वाजता गावात पोहोचतो. गुंज येथून जवळपास १० शेतमजुरांना घेऊन त्या ट्रॅक्टरचा प्रवास सुरू होतो. यातील सात महिलांचा हा जीवनाचा शेवटचा प्रवास असतो हे नियतीलाच ठाऊक असते. ज्या शेतातील भुईमूग निंदणीसाठी सदर महिला मजुरांना आणले जाते, त्या शेतातही ट्रॅक्टर पोहोचतो. आता ट्रॅक्टरमधून उतरून कामाला सुरुवातच करायची असते; मात्र ट्रॅक्टरमधून उतरण्याआधीच ट्रॅक्टर चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटते आणि ट्रॅक्टर ट्रॉलीसह थेट कटघरा नसलेल्या दगडोजी लक्ष्मण शिंदे यांच्या विहिरीत कोसळते. एकच हल्लकल्लोळ घटनास्थळी सुरू होतो. ही बाब जवळील शेतातील काही जणांना समजते. धावत पळत ते त्या विहिरीकडे पोहोचतात. विहिरीत पडलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी त्यांची धावपळ सुरू होते. हाती लागेल त्या साधनाद्वारे त्या महिला मजुरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र केवळ दोनच महिला आणि एका पुरुष मजुराला बाहेर काढण्यात त्यांना यश येते. तब्बल ७० फूट पाणी असलेल्या विहिरीतून इतर मजुरांना काढण्यासाठी आता कोणतेही साधन त्या शेतकऱ्यांजवळ नसते. त्यामुळे घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला दिली जाते. ही माहिती मिळताच पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व मदतीसह घटनास्थळी अवघ्या अर्ध्या तासात पोहोचते. महापालिकेच्या अग्निशमन दलालाही पाचारण केले जाते;  मात्र विहिरीतील पाणी पाहता मजुरांना बाहेर काढायचे कसे असा प्रश्न पुढे येतो. त्यावेळी तातडीने चार सक्षण पंपाची व्यवस्था करून विहिरीतील पाणी उपसा सुरू केला जातो.  याच वेळेत एका क्रेनलाही तातडीने बोलावण्यात येते आणि बचाव कार्याला सुरुवात होते. दुसरीकडे बघ्यांची गर्दीही प्रचंड प्रमाणात वाढत जाते. हा हा म्हणता घटनेची माहिती संपूर्ण जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला, देशालाही होते. बचाव कार्याबाबत वरिष्ठ पातळीवरून विचारणा होते. त्यामुळे बचावकार्याला आणखी वेगही येतो;  मात्र विहिरीतील पाणी उपसा होईपर्यंत काहीही हालचाल करता येत नसल्याने बचाव पथकही काहीसे हतबल झाले होते. अखेर पाणी उपसा झाल्यानंतर एक एक महिला मजूर हाती लागते पण ती मृतदेहाच्याच स्वरूपात. क्रेनच्या सहाय्याने काळ बनून आलेले ते ट्रॅक्टरही बाहेर काढले जाते. एकापाठोपाठ एक असे एकूण सात मृतदेह  विहिरीतून बाहेर काढले जातात.
या दुर्दैवी घटनेत ताराबाई सटवाजी जाधव वय ३५ वर्ष, धुरपता सटवाजी जाधव वय १८ वर्ष, सिमरन संतोष कांबळे वय १८ वर्षे, सरस्वती लखन भुरळ वय २५ वर्ष, चौत्राबाई माधव पारधे वय ४५ वर्ष, सपना उर्फ मीना राजू राऊत वय २५ वर्ष आणि ज्योती इरबाजी सरोदे वय ३० वर्षे या सात महिलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर पार्वतीबाई रामा भुरळ वय ३५ वर्षे आणि पुरभाबाई संतोष कांबळे वय ४० वर्षे या दोन महिला आणि सटवाजी जाधव वय ५५ वर्ष हा पुरुष मजूर जीवनाच्या या प्रवासात काही अंशी का होईना सुदैवी ठरला आहे.
घटनेची माहिती मिळताच जवळपास पाच ते सहा तास आलेगाव येथील हे बचावकार्य चालले. निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, नांदेडचे तहसीलदार संजय वरकड, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन पथक, नांदेड महापालिकेचे अग्निशमन दल, पोलीस प्रशासनाचे विशेष पथक ग्रामस्थ या बचावकार्यात सहभागी झाले होते. बचावासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले.

या घटनेबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करताना मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना पंतप्रधान सहाय्यता निधीतून दोन लाखांची मदत जाहीर केली आहे तर जखमींना ५० हजार रुपये देण्याबाबत निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त करताना मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याबाबतची घोषणा केली आहे.  मुख्यमंत्री सहायता निधीचा प्रस्ताव लवकरच सादर करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!