
नांदेड – नांदेड शहरातील आनंदनगर भागातील राजमॉल परिसरात झालेल्या १७ वर्षीय युवकाच्या खून प्रकरणात पोलिसांनी २४ तासानंतरही गुन्हा दाखल केला नसल्याने या प्रकरणात विमानतळ पोलिसांची तत्परता लक्षात येत आहे. या प्रकरणात एकही आरोपी पोलिसांच्या हाती आतापर्यंत आला नसल्याची माहितीही पुढे आली आहे. या खुनाचे नेमके कारण काय याचा उलगडाही अद्याप होऊ शकला नाही. त्यामुळे शैक्षणिक हब ठरलेल्या नांदेडमध्ये आता देशभरातून येत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहरातील आनंदनगर भागात असलेल्या राज मॉलमध्ये मूळच्या आखाडा बाळापूर येथील रहिवासी आणि सध्या विद्युत नगरात राहत असलेल्या साईनाथ प्रकाश कोळेकर या १७ वर्षीय युवकाचा तीन ते चार जणांनी चाकूने भोसकून खून केला होता या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ तपासाचे आदेश दिले होते. मात्र घटनेच्या २४ तासानंतरही या प्रकरणात विमानतळ पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. या खून प्रकरणात मयत युवकाचे पालक फिर्याद देण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र असे असले तरी संपूर्ण शहराला हादरवून सोडणाऱ्या या घटनेप्रकरणात २४ तासानंतरही गुन्हा दाखल न होणे ही बाब तितकीच असंवेदनशील ठरली आहे. त्यात पोलिसांना या प्रकरणाचे धागेदोरे हाती आले असले तरी आरोपी मात्र अद्याप पोलिसांच्या हाताबाहेरच आहेत. त्यामुळे एकूणच या प्रकरणाच्या तपासाबाबतच आता वेगवेगळ्या शंकाही घेतल्या जात आहेत.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार खून प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळी पथकेही स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके आरोपीच्या शोधामध्ये रवाना झाली आहेत. खुनाचा हा प्रकार किरकोळ कारणावरून घडल्याचे सांगितले जात असले तरीही आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे आहे. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती विमानतळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण यांनी दिली. त्याचवेळी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस जनसंपर्क कार्यालयातही घटनेची कोणतेही नोंद नसल्याची माहिती मिळाली.
शैक्षणिक हबची गुन्हेगारी हबकडे वाटचाल…नांदेड शहर गेल्या काही वर्षात शैक्षणिक हब म्हणून उदयास येत आहे. राज्यभरातीलच नव्हे तर देशभरातील विद्यार्थी नांदेडमध्ये वैद्यकीय प्रवेश परीक्षा तसेच अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी येत आहेत. देशपातळीवरील शैक्षणिक संस्थाही नांदेडमध्ये आपल्या शाखा सुरू करत आहेत. त्यामुळे हे प्रमाण दिवसेंदिवस आणखीच वाढत आहे. त्यामुळे नांदेडमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रासंगिक चर्चा होतात, कार्यक्रमाही होतात. त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे च होते. मात्र या विषयावर प्रशासकीय पातळीवर कोणत्याही ठोस उपाययोजना होत नसल्याचेच दिसत आहे. गेल्या काही दिवसातील गुन्हेगारी घटनांचा आढावा घेतला असता आणि आनंदनगर, श्यामनगर, श्रीनगर, स्टेडियम परिसर या भागात दररोज घडणाऱ्या मात्र कोणत्याही रेकॉर्डवर न येणाऱ्या घटना अनेक आहेत. ग्रामीण भागातून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे मोबाईल चालता चालता हिसकावून घेतले जात आहेत. अनेक प्रकरणात पालक आणि विद्यार्थी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचण्यास धजावत नाहीत. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती आणखी डोके वर काढत आहेत. यावर आता ठोस उपाययोजना आणि कृती कार्यक्रमच आवश्यक आहे. केवळ चिडीमार पथकाच्या भरवशावर विद्यार्थ्यांची सुरक्षितता सोडल्यास नांदेडचे शैक्षणिक हब आता गुन्हेगारी हब होण्यास वेळ लागणार नाही, हेही निश्चित.