
नांदेड – शहरातील तरोडा भागात असलेल्या कॅनॉल रोडला राज्य रस्त्याचा दर्जा असल्यामुळे आता लहान प्लॉट धारकांना बांधकाम परवानगी घेताना रस्त्यासमोर मोठी जागा सोडावी लागणार आहे. त्यामुळे हा रस्ता प्लॉट मालकांच्या मुळावर आला आहे. अशा लहान प्लॉट मालकांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावेत यासाठी राज्य महामार्ग क्रमांक ४३६ ची नरसिंह चौक, (सम्राट धाबा) कॅनाल रोड ते विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयापर्यंत रस्त्याची रुंदी कमी करावी, अशी मागणी माजी महापौर जयश्री निलेश पावडे यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाकडे केली आहे.
सार्वजनिक बांधकाम नांदेड प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता यांचा प्रस्ताव विचारात घेऊन नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील वसमत, नांदेड, मुदखेड, उमरी व धर्माबाद तालुक्यातील काही रस्त्यास शासनाने राज्यमार्ग क्रमांक ४३६ घोषित केले आहे. यात नरसिंह चौक, (सम्राट धाबा) कॅनाल रोड ते विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयापर्यंत रस्त्याचा समावेश आहे. सदरील राज्य महामार्ग वसमत, निळा, नरसिंह चौक, (सम्राट धाबा) कॅनाल रोड ते विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, नांदेड ते पुढे तेलंगणातील बासर येथे जातो. सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाने सदरील रस्त्याचे नव्याने नुतनीकरण करून दोन्ही बाजूने नालीचे बांधकाम करून सिमेंट काँक्रीटचा रस्ता केला आहे. त्यामुळे सदरील रस्त्याची हद्द कायम झालेली आहे. मात्र नरसिंह चौक, (सम्राट धाबा) कॅनाल रोड ते विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय रस्ता राज्यमहामार्ग म्हणून घोषीत झाल्याने शासन निर्णयाने रस्त्याची हद्द कायम रुंदीपेक्षा अधिकची १०० फूट होत आहे. सदर रस्त्याची रुंदी वाढवल्यास जमीन अधिग्रहण यातून होणारा वाद तसेच अधिग्रहण आर्थिकदृष्ट्या शासनासही परवडणारे नाही.
नरसिंह चौक, (सम्राट धाबा) कॅनाल रोड ते विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयापर्यंत रस्त्यालगत दाट वस्ती आहे. राज्यमहामार्ग जाहीर होण्यापूर्वीच या रस्त्यालगतच्या परिसरात अनेकांचे स्वतःचे व्यापारी गाळे बांधलेले आहेत. राज्यमार्गाचा दर्जा दिल्यामुळे या भागातील मोकळ्या भूखंड धारकांना बांधकाम परवानगी घेताना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. ज्याचे प्लॉट लहान आहेत त्यांचे प्लॉट शिल्लक राहत नाहीत. त्यामुळे अशा लहान प्लॉट मालकांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावेत, यासाठी राज्य महामार्ग क्रमांक ४३६ ची नरसिंह चौक, (सम्राट धाबा) कॅनाल रोड ते विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयापर्यंत रस्त्याची रुंदी कमी करावी, अशी मागणी माजी महापौर जयश्री निलेश पावडे यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाकडे केली आहे.