
नांदेड :- नांदेड शहरातील प्रलंबित प्रमुख रस्त्यांच्या विकासाची कामे दोन महिन्यात पूर्ण होतील यातून शहराचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलला जाईल, असा विश्वास महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी व्यक्त केला. डोईफोडे हे गुरुवारी ‘नांदेड स्क्रिप्ट’ शी संवाद साधत होते. शहरातील जुना मोंढा ते एसपी ऑफीस चौक, एसपी ऑफिस चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जुना मोंढा, भाग्यनगर टी पॉइंट ते डॉ. शंकरराव चव्हाण पुतळा, राज कॉर्नर ते वर्कशॉप चौक या प्रमुख रस्त्यांची कामे दोन महिन्यात पूर्ण होतील, असे ते म्हणाले.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु असलेल्या विविध विकास कामांचा आणि शहरातील वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा संदर्भातील आढावा बैठक महापालिकेत घेण्यात आली. या बैठकीस मनपा आयुक्त डॉ. डोईफोडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक गुट्टे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गळघर उपअभियंता काळे, नरमिटवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र शासनाने ११ डिसेंबर २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये शहरातील ७ प्रमुख रस्ते तसेच १६ जून २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये एकूण ९ रस्ते तर ०९ सप्टेंबर २०२१ अन्वये १० रस्ते महानगरपालिकेकडुन सार्वजनिक बांधकाम विभागास हस्तांतरीत केले होते. या सर्व रस्त्यांच्या रोड, नाली, पथदिवे या कामांसंदर्भात त्याचप्रमाणे शहर वाहतुकीस शिस्त लावण्याच्या दृष्टीकोनातून झेब्रा क्रॉसिंग, वाहन पार्कीग, सिग्नल व्यवस्था इत्यादी बाबींवर महानगरपालिका व शहर वाहतूक शाखेमार्फत संयुक्त पध्दतीने उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
शहरातील विविध भागात अर्धवट कामे झाल्यामुळे पावसाळ्यात सखल भागात पाणी साचून होणारी असुविधा टाळण्याच्या दृष्टिकोनातून प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी तातडीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. नांदेड शहरात वर्षभरापासून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध विकास कामे सुरु आहेत. त्यातील बहुतांश कामे अर्धवट स्वरुपात असल्याने ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्या.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रलंबित असलेली बहुतांश कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन साबांविच्या अधिकाऱ्यांनी दिले. काही कामासंदर्भात तांत्रिक बाबीमुळे विलंब होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले. प्रलंबित कामे पूर्ण झाली अथवा नाही याबाबत एका महिण्यानंतर प्रत्यक्ष स्थळ पाहणी करुन आढावा घेण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी सांगितले. त्याचबरोबर केंद्र शासन पुरुस्कृत अमृत २.० योजने अंतर्गत होत असलेली मलिनिस्सारण व पाणी पुरवठा योजनेची कामे विहीत कालमर्यादेत पूर्ण होतील याची दक्षता घेण्याचे आदेश आयुक्तांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. या बैठकीस महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त स. अजितपालसिंघ संधू, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता विश्वनाथ स्वामी, उपअभियंता दिलीप टाकळीकर, अरुण शिंदे, सतीश ढवळे यांची उपस्थिती होती.
दिवाबत्तीची जबाबदारी महापालिकेवर…नांदेड महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ते हस्तांतरित करून विकास कामावर करण्याचे जबाबदारी दिली असली तरीही दिवाबत्तीचे काम मात्र आता पुन्हा महापालिकेकडेच सोपवण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने तरोडा नाका ते राज कॉर्नर, आयटीएम कॉलेज ते रेल्वेस्टेशन, गोकुळनगर चौक ते हिंगोली गेट रेल्वे ओव्हर ब्रिज, विश्रामगृह पावडेवाडी नाका मोर चौक ते छत्रपती चौक, रवी नगर चौक ते लातूर रोड पोलीस चौकी, साई कमान वसरणी ते मुख्य रस्ता दुध डेअरी आणि वसंतराव नाईक कॉलेज ते ढवळे कॉर्नर पर्यंत पथदिवे महापालिकेलाच आता बसवावे लागणार आहेत.