सामाजिक

भोकर तालुक्यात ‘सेवा समर्पण’च्या कातळगाव अभियानाची सांगता

श्रमदानातून ४०० घनमीटर गाळ निघाला, एका पावसात ४ लाख लिटर पाणी जमिनीत मुरणार

भोकर:- कातळगाव अभियानाअंतर्गत सेवा समर्पण परिवार व कोळगाव (बु) येथील ग्रामस्थांनी सलग १९ दिवस श्रमदान करुन सीसीटीमधील गाळ काढण्याचे काम केले आहे. या १९ दिवसात ४०० घनमीटर गाळ निघाल्याने एका पावसात ४ लाख लिटर पाणी जमिनीत मुरणार आहे. यावर्षी जर असे २० पाऊस झाले तर ८० लाख लिटर पाणी जमिनीत मुरणार आहे. या कातळगाव अभियानाची सांगता झाली. नोव्हेंबर महिन्यात सेवा समर्पण परिवार पुन्हा कातळगाव अभियानाअंतर्गत गाळ काढण्याचे काम करणार आहे.
शासकीय योजनेतून नवीन जलसंधारणाची कामे होत असली तरी जुन्या तलावातील गाळ काढण्याचे विशेष प्रयत्न झाले नसल्याने भोकर तालुक्यात सेवा समर्पण परिवार व प्रशासनाने दि.१५ मे रोजी कोळगाव बु.येथून कातळगाव अभियानांची सुरुवात केली.

या अभियानाला सलग १९ दिवस सेवा समर्पण परिवाराचे सदस्य व कोळगाव बु. येथील ग्रामस्थांनी दररोज अडीच तास श्रमदान करून जुन्या सीसीटीमधील गाळ काढण्याचे काम केले. या १९ दिवसाच्या कालावधीत ४०० घनमीटर गाळ काढला गेला. यामुळे या झालेल्या कामात एका पावसात ४ लाख लिटर पाणी साठवण होवून ते जमिनीत मुरणार आहे.

यावर्षी जर २० वेळा पाऊस झाला तर ८० लाख लिटर पाणी जमिनीत मुरणार आहे. मागील ५ वर्षापूर्वी पाणी फाऊंडेशन वाँटर कप स्पर्धेच्या अनुषंगाने जलसंधारणाची कामे झाली. यामुळे भोकर तालुक्यातील पाणी पातळीत वाढ होवून तालुका टँकरमुक्त झाला. तद्नंतर लोकसहभागातून जलसंधारणाची कामे झाली नाहीत. यावर्षी तालुक्यात पुन्हा टँकर सुरू करावे लागले. भविष्यात पाणी पातळीत वाढ व्हावी या उद्देशाने सेवा समर्पण परिवाराने कातळगाव अभियान सुरू केले असून हे अभियान सलग तीन वर्षे चालणार आहे.
या कातळगाव अभियानाची सांगता करण्यात आली असून यानंतर सेवा समर्पण परिवार वृक्ष लागवड करण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम करणार आहे. यावर्षी हा परिवार सहस्त्रवर्ष वटवृक्ष संवर्धन हा उपक्रम राबविणार असून या उपक्रमाअंतर्गत एक हजार वटवृक्षाची लागवड केली जाणार आहे.
कातळगाव अभियानाच्या समारोप कार्यक्रमाला तहसीलदार सुरेश घोळवे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिक मोडवान, सेवा समर्पण परिवाराचे अध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड, सेवा समर्पण परिवाराचे सचिव विठ्ठल फुलारी, सरपंच सौ.राधाबाई विलास पानेवार, उपसरपंच कैलास गायकवाड, बालाजी पोकलवाड, एकनाथ पांचाळ यांच्यासह सेवा समर्पण परिवाराचे सदस्य, ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कातळगाव अभियानाचे कौतुक केले.

निसर्गाचे चक्र बदलत चालले असल्याने याचे रक्षण करण्यासाठी मावळे तयार करणे आवश्यक आहे. सेवा समर्पण परिवार व कोळगाव बु.येथील ग्रामस्थ पावसाचे पाणी जिरविण्याचे पवित्र काम करत आहे. प्रत्येकांनी झाडे लावून ती जगविणे गरजेचे आहे. १९ दिवस न थकता जलसंधारणाची कामे केली. या कामाचा आदर्श इतर गावांनी घेऊन अशी कामे झाली तर पाणीटंचाईला आळा बसेल.     सुरेश घोळवे, तहसीलदार, भोकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!