
नांदेड :- नांदेड महानगनपालिका हद्दीत दर शुक्रवारी व्ही.आय.पी. रोडवर भरणाऱ्या आठवडी बाजाराचे स्थलांतर करण्यात आले आहे. हा आठवडी बाजार इंदिरा गांधी मैदान व रोड नं.२६ वर भरविला आहे. शुक्रवारी महापालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने जंबो कारवाई करत व्ही.आय.पी.रोडवर भरविण्यात येणाऱ्या बाजारास मज्जाव करीत शेतकरी व व्यापाऱ्यांना पर्यायी जागेत स्थलांतरीत केले. भाजी विक्रेते आणि व्यापाऱ्यांनी या निर्णयास विरोध केला परंतु महापालिका तसेच पोलिसांनी हा विरोध मोडून काढत आठवडी बाजार स्थलांतरित करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केली.
महापालिका हद्दीमध्ये शुक्रवारचा आठवडी बाजार हा साठे चौक ते आय.टी.आय. कडे जाणारा रस्ता व शिवाजी नगर ते ज्योती टॉकीज रोड त्याचप्रमाणे गोकुळनगर ते रेल्वे स्टेशन या मार्गावर भरत असल्यामुळे वाहतूक व रहदारीस अडथळा निर्माण होत असे त्याचबरोबर रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांना अडचण निर्माण होत असल्यामुळे सदरील बाजार इतरत्र ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन होते. त्याअनुषंगाने पालिकेच्या मालमत्ता विभागामार्फत वृत्तपत्रामध्ये जाहिर सूचना प्रसिध्द करुन शुक्रवारचा आठवडी बाजार नेहमीच्या ठिकाणी न भरवता भाजीपाला विक्रेते व शेतकरी बंधुनी इंदिरा गांधी मैदान व रोड नं.२६ वर बाजार भरवण्यात यावा असे पालिकेने सूचित केले होते. त्याचाच भाग म्हणून पालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहिम राबवून सदरील आठवडी बाजाराचे स्थलांतर केले. या बाजार स्थलांतरणाच्या ठिकाणी पालिकेमार्फत पिण्याच्या पाण्याची, रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातीन पोलीस पथकसुध्दा तैनात करण्यात आले. यापुढे सुध्दा बाजारास आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले आहे.
सदरील कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे, व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स.अजितपालसिंघ संधू यांच्या नेतृत्वात पालिकेच्या अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने पार पाडली. या कारवाईत शहर उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने, शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश पुरी व त्यांचे पोलीस सहकारी, अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे, क्षेत्रिय अधिकारी रमेश चवरे, गौतम कवडे, मिर्झा बेग, राजेश जाधव, निलावती डावरे यांच्यासह पालिकेचे २५० कर्मचारी तसेच १५० पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
शहरातील साठे चौक ते आय.टी.आय. तसेच शिवाजी नगर ते ज्योती टॉकीज त्याचप्रमाणे गोकुळ नगर ते रेल्वे स्टेशन व आनंद नगर ते महादेव दाल मिल या मार्गावरुन जाताना येथील बाजारामुळे वाहतुकीची होणारी कोंडी तसेच भरधाव वाहनांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी या आठवडी बाजाराचे स्थलांतर करणे आवश्यक होते. सदरील आठवडी बाजार स्थलांतरीत केल्याने व्यापाऱ्याऱ्यांसह नागरिकांकडून समाधान व्यक्त केल्या जात आहे. तसेच यापुढेही व्यापारी व शेतकरी बांधवांनी शुक्रवारचा आठवडी बाजार मुख्य मार्गावर न भरवता पालिकेने उपलब्ध करुन दिलेल्या पर्यायी जागेत अर्थात इंदिरा गांधी मैदार व रोड न.२६ वर भरविण्याचे आवाहन पालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
दारुडे, पाकीटमारांचा बंदोबस्त करा..! शुक्रवार बाजार हा इंदिरा गांधी मैदानात स्थलांतरित करण्यात आला असला तरीही या ठिकाणी असलेल्या दारुडे आणि पाकिटमरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजीपाला विक्रेत्यांनी केली आहे. बहुतांश भाजीपाला विक्रेत्या महिला आहेत. या महिलांनी सायंकाळी पाच-सहा नंतर इंदिरा गांधी मैदान हे मोठ्या प्रमाणात धोकादायक असल्याचा आरोप केला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाकीटमार असतात. ते बाजारात येणाऱ्यांची लूट करत असतात. त्याचवेळी भाजीपाला विक्रेत्याकडून पैसे तसेच दागिनेही हिसकावून घेतात असा गंभीर आरोप केला आहे. सायंकाळी दारुड्यांची ही संख्या मोठी असते. त्यामुळे अशा या भीतीदायक वातावरणात व्यापार करायचा कसा, आपले पोट भरायचे कसे असा गंभीर प्रश्न या महिला विक्रेत्यांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्यांना आता कशा प्रकारची सुरक्षा दिली जाते याकडेही लक्ष लागले आहे.



