
नांदेड : नांदेड शहर तसेच अर्धापूर, मुदखेड, नायगाव, देगलूर, बिलोली या तालुक्यातून आज दिनांक २१ मार्च रोजी सकाळी ६:०९ व ६:१९ मिनिटांनी भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या वृत्तानुसार या भूकंपची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे ४.५ व ३.६ अशी नोंदविण्यात आलेली आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील जांब गावात असून नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास प्राप्त झाली आहे. नांदेड जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झाले नाही.
नांदेड शहरातील उत्तर भागात ३ मार्च रोजी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. गुरुवारी सकाळी भूकंपाच्या धक्क्याची सुरुवात होताच शहरातील अनेक भागातील नागरिक भीतीने घराबाहेर पडले.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्य़ातील वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात भूकंपाचे केंद्र होते. याची खोली १० किलोमीटर असल्याचे दिसत आहे.लगेचच दुसरा हलका धक्का पहिल्या धक्क्यानंतर अकरा मिनिटांनी म्हणजे सकाळी ६:१९ वाजता ३.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापन यंत्रणेवर झाली. मात्र या भूकंपाचे केंद्र तीन किलोमीटर दक्षिणेला असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या रामेश्वर तांड्याच्या दक्षिण भागात होते. याही भूकंपाची खोली १० किलोमीटर होती, अशी माहिती छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम महाविद्यालयातील एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली.
नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी त्वरित दगड काढून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे