
नांदेड – मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, सगे सोयरे कायदा अंमलात आणावा तसेच राज्यात मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात ८ जुलै रोजी नांदेडमध्ये राज कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरापर्यंत मराठा आरक्षण व शांतता रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीच्या अनुषंगाने नांदेड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिले आहेत तर नांदेड शहरातील सर्व शाळांना सुट्टी देण्याचे आदेशही शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले आहेत.
मराठा आरक्षणाच्या संदर्भाने जनजागृती करण्यासाठी संपूर्ण मराठवाड्यात जनजागृती आणि शांतता रॅली काढण्याचा निर्णय मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. त्यानुसार शनिवारी हिंगोली येथून या जनजागृती रॅलीला प्रारंभ झाला आहे. सोमवारी नांदेडमध्ये जनजागृती आणि शांतता रॅली निघणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील या जनजागृती रॅलीच्या नियोजनासाठी नांदेड जिल्ह्यात अखंड मराठा समाजाच्या वतीने गेल्या पंधरा दिवसापासून तयारी केली जात आहे. जिल्हाभरात बैठका घेऊन या रॅलीबाबत जनजागृती करण्यात आली आहे. या जनजागृती रॅली दरम्यान मराठा स्वयंसेवक व उत्स्फूर्तपणे आपली जबाबदारी पार पाडणार असल्याची माहिती संयोजकाच्या वतीने देण्यात आली आहे.
नांदेडमध्ये सोमवारी होणाऱ्या या जनजागृती रॅलीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. त्यानुसार तरोडा नाका व शिव मंदिराकडून राज कॉर्नर ते वजीराबाद चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे येणारी वाहतूक येण्या जाण्यासाठी बंद राहील. राज कॉर्नर ते वर्कशॉप टी पॉइंट ते आयटीआय – वजीराबाद चौकापर्यंत वाहतूक दोन्ही मार्गाने बंद राहील. भाग्यनगर चौकाकडून वर्कशॉपकडे येणारी वाहतूक बंद राहील. महात्मा गांधी पुतळा – सोनू कॉर्नर वजीराबाद चौक- कलामंदिर – शिवाजीनगर ते आयटीआय चौक ते राज कॉर्नरपर्यंत वाहतूक बंद राहिल. रवीनगर कौठा- गोवर्धन घाट पुलावरून वजीराबाद चौक- राज कॉर्नरकडे येण्या जाण्यासाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशनकडून शिवाजी पुतळ्याकडे येणारी वाहतूक पूर्णतः बंद राहील तसेच महावीर चौक व गांधी पुतळ्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे येणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
शहरातील हे प्रमुख मार्ग बंद राहणार असल्यामुळे पर्यायी मार्गही पोलीस दलाने सुचवले आहेत. बर्की चौकाकडून वजीराबाद चौकाकडे येणारी वाहतूक महावीर चौक- चिखलवाडी चौक -हिंगोली गेट मार्गे सुरू राहील. गोवर्धन घाट पुलावरून येणारी वाहतूक व वजीराबाद चौकाकडून शिवाजीनगर- आयटीआय वर्कशॉपकडे जाणारी वाहतूक तिरंगा चौक -पोलीस मुख्यालय मार्गे खडकपुरा -लालवाडी अंडर ब्रिजमार्गे शिवाजीनगर- पिवळी गिरणी- गणेश नगर वाय पॉईंटकडे जाण्यासाठी वापरता येणार आहे. राज कॉर्नर ते जुना मोंढा मार्गावरील वाहतूक चैतन्यनगर – पीरबुऱ्हान- भाग्यनगर -आनंदनगर -नागार्जुना टी पॉइंट- अण्णाभाऊ साठे पुतळा – यात्री निवास पोलीस चौकी – अबचलनगर ते पुढे जाण्यासाठी सुरू राहील. सिडको -हडकोकडून येणारी वाहतूक रवीनगर – कौठा – गोवर्धन घाट -तिरंगा चौक -पोलीस मुख्यालय मार्ग- खडकपुरा -लालवाडी अंडरब्रीज मार्गे शिवाजीनगर- पिवळी गिरणी- गणेश नगर वाय पॉईंटपर्यंत येण्या-जाण्यासाठी वापरता येणार आहे. वाहतुकीतील हे बदल ८ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत राहणार आहेत असे स्पष्ट करण्यात आले आहे.
नांदेड शहरातील सर्व शाळा सोमवारी बंद राहणार …
मराठा आरक्षण जनजागृती रॅली निमित्त शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व रस्ते उद्या सोमवारी सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत बंद आहेत अशी अधिसूचना पोलीस अधीक्षकांनी काढली आहे. या अधिसूचनेच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरातील सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या प्रार्थमिक ते उच्च माध्यमिक शाळांना ८ जुलै रोजी एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी केवळ नांदेड शहरातील शाळांनाच लागू राहील, असेही जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
मराठा आरक्षणाबाबत सोमवारी मुंबईत सर्वपक्षीय बैठक, खासदार अशोकराव चव्हाण सहभागी होणार…मराठा आरक्षणाच्या संदर्भाने आठ जुलै रोजी मुंबईत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्यासह अनेक नेते आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत माजी मुख्यमंत्री, खासदार अशोकराव चव्हाण हे देखील सहभागी होणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच खा. चव्हाण यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. एक लोकप्रतिनिधी आणि समाजाचे नागरिक म्हणून मराठा आरक्षणविषयक प्रश्नांचा आपण राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. जरांगे यांच्याशी झालेल्या चर्चेकडे आपण सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे खा. चव्हाण यांनी सांगितले आहे.