राजकीय

नांदेडमध्ये प्रतापरावांचा पराभव का झाला हे सांगण्याईतपत मी मोठा नाही – खा. अशोकराव चव्हाण

पक्षनिरीक्षक रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे पाटीलच सांगू शकतील नांदेडचा पराभव कशामुळे.!

नांदेड – नांदेडमध्ये भाजप उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव कशामुळे झाला हे सांगण्याईतपत मी मोठा नसल्याचे खा. अशोकराव चव्हाण यांनी शनिवारी स्पष्ट केले. पक्षाने नियुक्त केलेले निरीक्षक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी केंद्रीय  रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हेच नांदेडमधील पराभवाचे कारण आता सांगू शकतील. त्यांनी पराभवाची कारणे नांदेड दौऱ्यामध्ये जाणून घेतली आहेत, त्यामुळे आगामी काळात  चिखलीकरांचा पराभव का झाला हे स्पष्ट होईल, असेही खासदार चव्हाण यांनी येथे सांगितले.

नुकत्याच मांडलेल्या राज्यातील अर्थसंकल्पातील तरतुदी समाज हिताच्या असल्याचे सांगताना खासदार चव्हाण यांनी महिला, युवक तसेच कृषी या क्षेत्रात राज्य शासनाने भरीव तरतूद केली असल्याचे सांगितले. राज्यात सिंचनाचे रखडलेले प्रकल्प दोन वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे. ६१ प्रकल्प पूर्ण केले जातील. त्यामध्ये नांदेडच्या प्रकल्पाबाबतही आपण लक्ष घालून ते पूर्ण करण्याबाबत पाठपुरावा करू असे ते म्हणाले. राज्यात गाव तिथे गोदाम या योजनेअंतर्गत १०० गोदामाचे बांधकाम हाती घेतले जाणार आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळत असून महिलांना याचा निश्चितच लाभ होईल.  राज्याच्या अर्थसंकल्पातील अनेक तरतुदी या महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नांदेडमध्ये भाजपाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पराभवाबाबत प्रश्न विचारला असता या प्रश्नाचे उत्तर देण्याईतपत आपण मोठे नसल्याचे सांगून या प्रश्नाला त्यांनी बगल दिली. याबाबत आता पक्ष निरीक्षकच काय ते स्पष्ट करतील असेही ते म्हणाले.

नांदेड उत्तरमधून काँग्रेसकडून संगीता पाटील डक यांनी विधानसभेसाठी उमेदवारी मागितली आहे. तर दुसरीकडे त्यांचे पती विठ्ठल पाटील डक हे भाजपात प्रवेश घेत असल्याचा खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. काँग्रेसची बी टीम आपल्या सोबत आहे का,  याबाबत विचारले असता नांदेड जिल्ह्यात माझी भरपूर टीम आहे. कोण कुठे आहे याची मलाही माहिती नाही,  असे त्यांनी सांगितले. याच अनुषंगाने माजी मंत्री डी. पी. सावंत यांच्याबाबतही प्रश्न विचारला असता, ते कुठे आहेत हे आपण त्यांनाच विचारा असे ते म्हणाले.
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची आपण शुक्रवारी भेट घेतली आहे. त्यांच्याशी आरक्षण संदर्भाने विस्तृत चर्चा झाली आहे. याबाबत आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहोत. हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे. या आंदोलनादरम्यान झालेले गुन्हे मागे घेण्याबाबतही सरकार सकारात्मक आहे. मात्र जे गुन्हे न्यायालयात आहेत, त्याबाबत विचार करावा लागणार असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी मराठवाड्यात ६ जुलैपासून मनोज जरांगे यांनी सुरू केलेली मराठा आरक्षण संवाद यात्रा ही शांततेत पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या यात्रेला कोणाचाही विरोध नाही. मराठवाड्यात कुठेही मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.   या पत्रकार परिषदेला माजी आमदार अमरनाथ राजूरकर, भाजपाचे महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर, गणपतराव तिडके यांची उपस्थिती होती

केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे प्रकल्पांसाठी भरीव तरतुदीची अपेक्षा…येत्या २२ जुलै रोजी केंद्राचा अर्थसंकल्प सादर होत आहे. या अर्थसंकल्पात नांदेड जिल्ह्यातील नांदेड – बिदर आणि नांदेड -लातूर या रेल्वे मार्गाचा विषय मार्गी लागण्याची अपेक्षा आहे. हे दोन्ही रेल्वे मार्ग जवळपास २५० किलोमीटर अंतराचे आहेत. त्यामुळे या मार्गाला निधी मिळणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे या दोन्हीही रेल्वे प्रकल्पांचा ५० टक्के वाटा राज्य शासन उचलणार आहे. त्यामुळे या प्रकल्पांची किंमत कमी राहील. याबाबत आपण रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी केली आहे. हे रेल्वे मार्ग मंजूर झाल्यास मराठवाड्याच्या विकासाला गती मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यावेळी नांदेड जिल्ह्याचा एकाच डिव्हिजनमध्ये समावेश करणे आवश्यक आहे. याबाबत आपण रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!