
नांदेड – राज्य सरकारने मंत्री छगन भुजबळ यांना संपूर्ण पाठबळ दिले आहे. ओबीसीतील पडेल नेत्यांची टोळी एकत्र करून मराठा आरक्षण आंदोलन संपविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. छगन भुजबळ हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज सोमवारी नांदेडमध्ये केला. मात्र ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय आपण मागे हटणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणासंदर्भात नांदेड शहरातून मनोज जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत जनजागृती आणि शांतता रॅली सोमवारी दुपारी दोन वाजेपासून राज कॉर्नर येथून काढण्यात आली. ही रॅली सायंकाळी सहा वाजेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पोहोचली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मनोज जरांगे पाटील यांनी अभिवादन करून हजारो बांधवांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, गरीब मराठ्यांसाठी आपण हा लढा हाती घेतला आहे. समाजाला आपण कधीही बेईमान होणार नाही. ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय आता मागे हटायचे नाही, ही आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या ७० वर्षात जे झाले नव्हते, ते या दहा महिन्यात आपण करून दाखवले आहे. मला छगन भुजबळ हे गावठी, चौथी पास असल्याचे म्हणत होते. मात्र आपल्याच आंदोलनामुळे मराठा आरक्षणाच्या ५४ लाख नोंदी सापडल्याचा शासकीय आकडा आहे. आपण अधिक विचारणा केली असता शासनाने हा आकडा ५७ लाखापर्यंत पोहोचला असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या नोंदीच्या आधारे दीड कोटी मराठ्यांना लाभ झाला आहे. हीच आपल्या या आंदोलनाची मोठी उपलब्धी असल्याचे सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना पाठबळ न देता मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. मराठे आपल्याला डोक्यावर घेऊन नाचतील. मात्र छगन भुजबळ यांचे ऐकून राज्यात भाजपा संपवू नका असा सल्लाही त्यांनी दिला. १९८० पासून ज्यांनी काही दिले नाही त्यांना तुम्ही घेऊन फिरता. राज्यात १६ टक्के आरक्षण ओबीसींना दिले आहे. त्यांच्या पाठबळाची अपेक्षा करता. मात्र राज्यात ५५ टक्के असलेल्या मराठा समाजाला आपण दुर्लक्षित करत आहात. याच मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून मराठ्यांच्या सापडलेल्या नोंदी रद्द करण्याची मागणी केली जात आहे. या नोंदी रद्द झाल्या तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. आपल्याला संपवण्यासाठी शासनाने एसआयटीही गठीत केली होती. मात्र ती एसआयटी आता कुठे आहे असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.
सगे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून होत असलेल्या वक्तव्याबाबतही त्यांनी टीका केली. सगे सोयरे हे आमच्या व्याख्येनुसार ठरवावेत आणि त्यानुसारच त्याची अंमलबजावणी करावी. नातेवाईक वेगळे आणि सगेसोयरे वेगळे आहेत. २०१७ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होत असल्याचे चंद्रकांत पाटील सांगत आहेत. मात्र त्यावेळी ते कुठे होते हे आम्हाला माहित नाही असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांच्यावरही टीका केली. पण यापुढेही आपला सरकार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे. त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा अन्यथा आगामी निवडणुकीत आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असेही त्यांनी सांगितले. लोकसभेत फक्त पाडा म्हणून सांगितले होते. आता आम्ही राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघात आमचे उमेदवार देवू अन्यथा नाव घेऊन मराठा आरक्षणाला विरोध करणारे उमेदवार पाडू. मग ते उमेदवार महायुतीचे असतील किंवा महाविकास आघाडीचेही असतील. मराठ्यांच्या १० टक्के नेत्यांना मोठे करण्याऐवजी ८० ते ९० टक्के समाजाचे भले करण्याचा आपला उद्देश असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान या जनजागृती व शांतता रॅलीचे शहरात ठिकठकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. रॅलीदरम्यान मराठा स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीने ही रॅली शांततेत पार पाडली. संपूर्ण शहरात ‘एक मराठा लाख मराठा’चा नारा दणाणत होता.
ओबीसींचे आरक्षणच बोगस..!१९६७ मध्ये १८० जाती ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यात आल्या. त्यात कुणबी ही जातही होती. या १८० जातीमध्ये माळी जातीचा ही समाज समावेश होता. मात्र पुढे माळी जातीतील तब्बल ४५० पोट जाती केवळ समान व्यवसायाच्या आधारावर या ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्यात आल्या. मुळातच ओबीसींचे आरक्षणच बोगस आहे. ओबीसी हे फुकटचे आरक्षण खात असल्याची टीकाही त्यांनी केली. त्याचवेळी कुणबी आणि मराठा यांच्यात रोटी – बेटी व्यवहार होतो. त्यांचाही समान व्यवसाय हा शेती आहे. त्यामुळे याच निकषावर मराठ्यांचाही ओबीसीमध्ये समावेश करणे आवश्यक असल्याचे जरांगे यांनी सांगितले. हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट, बॉम्बे गव्हर्मेंट गॅझेटमध्ये याबाबतचा उल्लेख असल्याचे ते म्हणाले.