
नांदेड – बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाच्या 95 बटालियन हरियाणामध्ये नाईकपदी कार्यरत शहीद कामेश कदम यांना ९ जुलै रोजी कर्तव्यावर असताना वीरमरण आले होते. त्यांचे पार्थिव आज ११ जुलै रोजी सकाळी हडको येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. हडको येथून निघालेल्या अंत्ययात्रेनंतर सिडको येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तेरा वर्षीय मुलगा आणि वडील विठ्ठलराव यांनी साश्रू नयनांनी अग्नी दिला. यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
शहीद कामेश कदम यांचा हरियाणातील गुडगाव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचे पार्थिव बुधवारी रात्री दिल्लीहून हैदराबाद येथे विशेष विमानाने आणण्यात आले. हैदराबादहून वाहनाने आज सकाळी आठ वाजता हडको येथील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव आणण्यात आले. घरी काही वेळ पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर हजारोंच्या उपस्थितीत हडको येथून अंत्ययात्रा निघाली. सिडको हडकोतील मुख्य रस्त्यावरून निघालेल्या या अंत्ययात्रेत हजारो महिला, पुरुष सहभागी झाले होते. ‘भारत माता की जय’ च्या घोषणेसह ‘कामेश कदम अमर रहे’च्या घोषणाही दिल्या जात होत्या. ठिकठिकाणी शहीद कामेश कदम यांना पुष्पांजली वाहण्यात येत होती.
सिडको येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत प्रारंभी बीएसएफच्या वतीने सलामी देत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या फेरी झाडत अभिवादन करण्यात आले. शहीद कामेश कदम यांना बीएसएफच्या वतीने डेप्युटी कमांडंट अशोक कुमार, मेजर राजेश कुमार, विजय सिंह तसेच त्यांच्या पथकाने पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर राज्य शासनाच्या वतीने नांदेडचे तहसीलदार संजय वरकड यांनी यांनी पुष्पचक्र वाहिले. यावेळी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आंबेडकरी चळवळीतील नेते सुरेशदादा गायकवाड हे निवासस्थानापासून अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. त्यांनीही शहीद कामेश कदम यांच्या पार्थिवावर पुष्पचक अर्पण केले. शहीद कामेश कदम यांचे माता, पिता सेवानिवृत्त भारतीय माजी सैनिक संघटना, खासदार वसंतराव चव्हाण यांचे प्रतिनिधी बंडू चव्हाण, बालाजी पांडागळे, संजय घोगरे, नरेंद्र गायकवाड, आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम, रिपब्लिकन हक्क परिषदेचे रमेश सोनाळे, राहुल हंबर्डे, आदींनी यावेळी पुष्पचक्र अर्पण केले. अंत्यविधी प्रसंगी बीएसएफचे मेजर विजय सिंह यांनी शहीद कामेश कदम यांच्या पार्थिवावरील तिरंगा ध्वज वडील विठ्ठलराव, पुत्र आणि मातेच्या स्वाधीन केला. यावेळी भदंत पय्याबोधी आणि डी.पी. गायकवाड यांनी अंत्यविधी पार पाडला.