हवामान

नांदेडमध्ये तापमानाने गाठला उच्चांक, ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

आगामी ५ दिवस मराठवाड्यात तापमानात होणार वाढ

नांदेड – नांदेड जिल्ह्यात तापमानाचा पारा उच्चांक गाठत आहे. सोमवारी ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. रविवारी २८ एप्रिल रोजी  नांदेडमध्ये ४२.४° अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. आगामी पाच दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये  तापमानवाढ कायम राहण्याचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उष्माघात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण १४ ग्रामीण रुग्णालये, ६ उपजिल्हा रुग्णालय तसेच  एकूण ६८ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि एकुण ३७९ उपकेंद्र आहेत.

मागील काही दिवसांपासून उन्हाळ्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. राष्ट्रीय हवामान विभागाकडे ३ एप्रिल रोजी देशातील पश्चिम राजस्थान, उत्तर पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, उत्तर गुजरात व मराठवाड्यात सर्वाधिक तापमानाची ४१ ते ४३° सेल्सिअस नोंद झाली आहे. तसेच अकोला येथे ४४°C ही देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आगामी पुढच्या पाच दिवसामध्ये मराठवाड्यामध्येसुध्दा  तापमान वाढ कायम राहण्याचे संकेत आहेत. नागरिकांमध्ये तापमानवाढ, उष्णतेची लाट याबाबत जागरुकता निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी सर्वसामान्य लोकांना संभाव्य तापमानवाढीचे संकेत लक्षात यावेत यासाठी कलर कोडींगचा वापर हवामान विभागाकडून केला जातो. उष्माघात होऊ नये यासाठी प्रत्येकाने जागरूक राहिले पाहीजे. उन्हाळयामध्ये उष्माघाताने रुग्णांवर उपाययोजना करण्यासाठी व मृत्यू टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून, आरोग्य संस्थांमध्ये उष्माघात उपचार कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेऊन उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.एम. शिंदे यांनी केले आहे.

उष्माघाताची कारणे : उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजूरीची कामे फार वेळ करणे, कारखान्याच्या वॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपडयांचा वापर करणे, अशा प्रत्यक्ष उप्ततेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबध येण्याने उष्माघात होतो.

उष्माघाताची लक्षणे  : थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भुक न लागणे, चक्कर, येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, पोटऱ्यात वेदना येणे अथवा पेटके येणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बैचैन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था इत्यादी.

उष्माघातामध्ये अतिजोखमीचे घटक  :- ६५ वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती, १ वर्षाखालील व १ ते ५ वयोगटातील मुले, गरोदर माता, मधुमेह व हृदयविकार तसेच अल्कोहोलीक व्यक्ती, अतिउष्ण वात्तावरणामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती.

उष्माघात होऊ नये या करीता काय करावे : तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी प्यावे, हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बुट व चपलांचा वापर करावा, प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी, उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा, शरीरातील पाण्याचे प्रमाणे कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबूपाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करावा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसल्याची चिन्हे ओळखावित व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात, पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे, कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, सुर्य प्रकाशाचा थेट सबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात यावे, पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा. बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा, गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घ्यावी, रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरीता शेड उभारावेत, जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी, दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी

उष्माघात झाल्यास उपचार- रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावे अथवा वातानुकूलित खोलीत ठेवावे. रुग्णांच्या शरीराचे तापमानात खाली आणण्याचा दृष्टीने प्रयत्न करावेत. रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी. रुग्णांच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवाव्यात.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!