
नांदेड – जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघातील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदार यादीत जिल्ह्यातील मतदारांची संख्या २७ लाख २१ हजार ४२० इतकी आहे. त्यामध्ये १४ लाख ३ हजार ९४३ पुरुष मतदार तर १३ लाख १७ हजार ३१० महिला मतदारांचा समावेश आहे. १६७ तृतीयपंथी मतदारही यामध्ये समाविष्ट आहेत. या नऊ मतदारसंघात १८ ते १९ वर्ष वयोगटातील ४८ हजार ५८६ मतदार आहेत. २० ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील मतदारांना आपली नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करता येणार आहेत.
विधानसभा निवडणुकीचे पडघम प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत. राजकीय पातळीवरही नेत्यांचे दौरे तसेच इतर घडामोडी सुरू आहेत. जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. त्याचवेळी प्रशासकीय पातळीवरही मतदार यादी अंतिम करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ३० ऑगस्ट रोजी मतदार यादी अंतिम होणार असून २० ऑगस्टपर्यंत मतदारांना आपले नाव यादीत नोंदवता येणार आहे. तसेच मतदार यादीतील नाव वगळणीही होणार आहे. यासाठी २० ऑगस्टपर्यंत आपल्या मतदान केंद्रावर दररोज मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याकडे नाव नोंदणी तसेच मतदार यादीवरील हरकत नोंदवता येणार आहे. ६ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये किनवट मतदार संघात २ लाख ७१ हजार ८९२ मतदार आहेत तर हदगाव मतदारसंघात २ लाख ९१ हजार ६४६, भोकरमध्ये २ लाख ९६ हजार २०, नांदेड उत्तर मतदारसंघात ३ लाख ५० हजार ५५, नांदेड दक्षिण मतदार संघात ३ लाख १० हजार ८३२, लोहा मतदार संघात २ लाख ९४ हजार १५२, नायगाव मतदारसंघात ३ लाख ३ हजार ३६७, देगलूर मतदारसंघात ३ लाख ५ हजार ४३८ मतदार आणि मुखेड मतदार संघात २ लाख ९८ हजार १८ मतदार संख्या आहे.
जिल्ह्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार याद्या तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात मतदारांना पाहता येणार आहेत. २० ऑगस्टपूर्वी राजकीय पक्ष किंवा सामान्य नागरिक नजीकच्या मतदान केंद्रावर अर्ज करून या मतदार यादीवरील आक्षेप दाखल करू शकणार आहेत.
आगामी दोन शनिवार व रविवारी विशेष मतदार नोंदणी मोहीम… जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी संदर्भाने १० व ११ ऑगस्ट रोजी आणि १७ व १८ ऑगस्ट रोजी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबवण्यात येणार आहे. दररोज कार्यालयीन वेळेत केंद्रस्तरीय अधिकारी उपलब्ध राहतील. आपल्या परिसरातील मतदान केंद्रावर २० तारखेपर्यंत मतदार नोंदणीचे काम केले जाणार आहे. मतदार नोंदणी मोहिमेत बीएलओ हा महत्त्वाचा घटक आहे. २० ऑगस्टपर्यंत मतदान केंद्रावर त्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. या संदर्भात तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधितांना निर्देश द्यावेत. एखादा केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रावर उपस्थित नसेल तर त्याच्यावर कारवाईचे आदेशही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.