
नांदेड – अर्धापूर पोलीस ठाणे हद्दीत १ सप्टेंबर रोजी स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ७ लाख ९६ हजार रुपयांचा तांदूळ आणि ट्रक पोलिसांनी पकडला होता. हा तांदूळ काळ्या बाजारात नेत असल्याच्या संशयावरून अर्धापूर पोलिसांनी या प्रकरणात २४ तासात चौकशी करून कपिल पोकर्णा, शेख जाकीर शेख वजिरोद्दिन, यायाखान पठाण रौफखान पठाण आणि शेख सोहेल शेख वजीरोद्दीन या चौघाविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियमाच्या विविध कलमानुसार अर्धापूर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नूतन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात सध्या ‘ऑपरेशन फ्लश आउट’ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत विविध अवैध धंद्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. याच कारवाईअंतर्गत १ सप्टेंबर रोजी अर्धापूर ठाणे हद्दीत गस्तीवर असलेल्या पोहेकॉ विजय आडे, पोकॉ महेंद्र डांगे विजय कदम आणि नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्थापन केलेल्या विशेष पथक क्र. ६ मधील पोलीस कर्मचारी व पोलीस अंमलदार उपनिरीक्षक प्रवीण हलसे, पोहेकॉ ब्रह्मानंद लामतुरे, पोकॉ राम मुळे, महाचंद्रमनी कांबळे, पोहेकॉ पंढरी जाधव हे सर्वजण पेट्रोलिंगवर होते. त्यावेळी गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार एमएच २२ एए ३३३६ क्रमांकाच्या ट्रकमध्ये राशनचा शासकीय माल आहे, अशी माहिती मिळाली. त्यावेळी हे पथक जांभरून पाटीजवळ पोहोचले. त्या संशयित ट्रकमधील मालाबाबत चौकशी करण्यासाठी हा ट्रक आणि ट्रकमधील ७ लाख ९६ हजार ४८५ रुपयांचा तांदूळ असा एकूण १७ लाख ९६ हजार ४८५ रुपयांचा मुद्देमाल अर्धापूर ठाण्यात आणला.
अर्धापूर तहसील कार्यालयाचा अहवाल अद्याप अप्राप्तच..! अर्धापूर पोलिसांनी जप्त केलेला ७ लाख ९६ हजार रुपयांचा तांदूळ हा स्वस्त धान्य दुकानातील आहे का? हे निष्पन्न करण्यासाठी अर्धापूर पोलिसांनी अर्धापूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाला एक पत्र दिले आहे. दोन दिवसानंतरही अर्धापूर तहसीलदारांचा अहवाल अप्राप्तच आहे. त्यामुळे सदर तांदूळ हा स्वस्त धान्य दुकानातील आहे की नाही? ही बाब अर्धापूर तहसीलदारांच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. काही दिवसांपूर्वी हदगाव पोलिसांनी तांदळाचा एक ट्रक जप्त केला होता. त्या प्रकरणातही पुरवठा विभागाचा सुस्पष्ट अहवाल येण्यास विलंबच झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानातील माल काळ्या बाजारात पोहोचविणारी एक मोठी टोळी कार्यरत असल्याची बाब पुढे येत आहे. अर्धापूर प्रकरणातील काही आरोपीविरुद्ध राज्यभरात गाजलेल्या नांदेड जिल्ह्यातील कृष्णुर धान्य घोटाळ्यातही गुन्हे दाखल असल्याची बाब तपासात पुढे आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचे धागेदोरे किती लांबतील की प्रकरण चौकशीवरच प्रलंबित राहील, याकडेही लक्ष लागले आहे.