
नांदेड – नांदेड जिल्ह्यात तीन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दोन लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या या पावसाने पशुधनाचीही मोठी हानी झाली आहे. जवळपास २५ जनावरे मृत्युमुखी पडले आहेत. पावसामुळे घरांची हानी झाली असून २८ कच्च्या घरांचे नुकसान झाले आहे. नांदेड शहर तसेच जिल्हाभरात सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. जिल्ह्यातील काही नाल्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटला होता.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या ४८ तासात जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे शेती, पशुधन, घरे व अन्य मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीकडे शासनाचे लक्ष असून पाऊस थांबताच पंचनामे करण्यात यावे, असे आदेश राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी दिले आहेत.
नांदेडमधील अतिवृष्टीच्या संदर्भात पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेतला. जिल्हयातील ९३ मंडळापैकी ७१ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच प्राथमिक माहितीनुसार अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून पशुधनाची देखील हानी झाली आहे. सध्या पाऊस सुरू आहे. मात्र पाऊस थांबल्यानंतर प्रशासनाने तातडीने पंचनामे सुरू करावे असे त्यांनी निर्देश दिले आहे.
२५ जणांची केली सुटका, पासदगाव पुलावरून एक जण गेला वाहून…हदगाव तालुक्यातील उंचाडा येथे सोमवारी कयाधू नदीच्या परिसरात जवळपास २५ ग्रामस्थ अडकले होते. ही माहिती मिळताच जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या म्हणजेच एसडीआरएफच्या तुकडीला त्या ठिकाणी पाचारण केले. या पथकाने शोध व बचावकार्य करून अडकलेल्या २५ जणांना पुरातून सुखरूप बाहेर काढले आहे. दरम्यान, नांदेड तालुक्यात सोमवारी दुपारी चार वाजता पासदगाव पुलावरून पाणी वाहत असताना एका व्यक्तीने पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी त्याला अडवूनही तो न ऐकता पुराच्या पाण्यात पुलावरून जात होता. अखेर तो पुरामध्ये वाहून गेला. त्याचा शोध घेण्यात येत आहे.