
नांदेड – जुन्या नांदेडातील गाडीपुरा भागात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी रात्री अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शहरातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले, अनेक घरांची पडझड झाली. शहरातील गोकुळनगर, हमालपुरा, अमन कॉलनी, बालाजी नगर, बी.के. हॉल परिसर, यशवंत कॉलेज परिसर, वसरणी, श्रावस्ती नगर, तेहरा नगर नवीन श्रावस्ती नगर, पप्पड गल्ली, खडकपुरा, जुना नांदेडात करबला, गौतमनगर, काला पूल, लक्ष्मीनगर, शिवनगर, बालाजी नगर, दत्तनगर, खोब्रागडे नगर, बाबा नगर, राम घाट, नंदिग्राम सोसायटी, तानाजीनगर आदी भागात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. त्यातील गाडीपुरा या एका भागाला पालकमंत्री गिरीश महाजन यांनी धावती भेट देऊन पाहणी केली. या भागातील नागरिकांसोबत संवाद साधून सर्वांना धीर दिला व प्रशासनाकडून लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळेल हा विश्वास व्यक्त केला.
यावेळी महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, डॉ. संतुकराव हंबर्डे, चैतन्यबापू देशमुख, दीपकसिंह रावत, दिलीपसिंघ सोडी, युवा मोर्चा अध्यक्ष बंटी मल्होत्रा, महेश बाळू खोमणे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अजितपालसिंघ संधू, डॉ. सचिन उमरेकर यांच्यासह भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती. पालकमंत्री महाजन व खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी संवाद साधून सर्वांना धीर दिला व प्रशासनाकडून लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळेल हा विश्वास व्यक्त केला.
लोहा तालुक्यातील सुनेगाव येथेही पालकमंत्र्यांनी धावपळीत शेतीपिकांच्या नुकसानीची पाहणी केली होती. आता राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे न करता सर्वांना निकषाप्रमाणे मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरी भागातील नुकसानीच्या मदतीसाठी मात्र पंचनामे करावे लागणार आहेत.