Police

नांदेड पोलीस अधीक्षकांनी केले अवैध धंदे उच्चाटनासाठीच्या सर्वच सहा विशेष पथकांचे पुनर्गठन…

पोलीस उपमहानिरीक्षक उमाप यांनी केली होती एका पथकावर निलंबनाची कारवाई

नांदेड – जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांचा बिमोड करण्याची ज्यांच्यावर जबाबदारी दिली त्यांनीच थेट अवैध धंदे करणाऱ्यांशी संधान साधून हप्ते वसुली सुरू केली. हा प्रकार खुद्द नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनीच उघडकीस आणत त्यांना रोख रकमेसह पकडले.त्या विशेष पथकातील पाच जणांचे थेट निलंबन केले. त्यामुळे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी त्याही पुढे जाऊन एक पाऊल टाकत जिल्ह्यातील सर्वच सहा विशेष पोलीस पथके बरखास्त करून या पथकांचे पुनर्गठन केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत गुन्हेगारांवर जोमात कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यासाठी यापूर्वी स्थापन करण्यात आलेले विशेष पथके बरखास्त करण्यात आली आहेत. यापुढे नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या उच्चाटनासाठी नव्याने विशेष पथकाची स्थापना करण्याचे आदेश ११ नोव्हेंबर रोजी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिले आहेत. त्यानुसार पथक क्रमांक एक  उपविभाग नांदेड शहरची जबाबदारी सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर गायकवाड यांच्यावर सोपवली आहे. या पथकात पोकॉ नंदू पवार, वचेवार, तुकाराम तुरटवाड, पोकॉ मल्लिकार्जुन पचलिंगे यांचा समावेश आहे.  पथक क्रमांक दोन इतवारा उपविभागासाठी पोलीस उपनिरीक्षक गजानन कागणे हे प्रमुख राहणार आहेत.  या पथकात पोहेकॉ बंडू कलंदर, पोहेकॉ दिलीप गुट्टे, पोकॉ संजय यमलवाड, पोकॉ नवनाथ गुट्टे तर पथक क्रमांक तीन उपविभाग नांदेड ग्रामीण व भोकरसाठी सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल घोगरे हे प्रमुख असतील. या पथकात पोकॉ कृष्णा सुनोडे, कीर्तीकिरण डोईफोडे, उद्धव सावंत, रविकुमार कांबळे यांचा समावेश करण्यात आला आहे. पथक क्रमांक चार उपविभाग किनवट व माहूरसाठी उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मणे यांच्या नेतृत्वात पोकॉ नामदेव इनकर, सोमनाथ देशमुख,  मिर्झा नवीन बेग, नूरखान  मेहबूबखान पठाण, बिलोली व धर्माबाद उपविभागासाठी पथक क्रमांक पाचमध्ये सहायक पोलीस निरीक्षक सहदेव खेडकर हे प्रमुख राहतील. त्यामध्ये पोकॉ अमरसिंह दखणे, अक्षय आचेवाड, राजू जायभाये, स. सलिमोद्दीन आणि पथक क्रमांक सहा उपविभाग कंधार व देगलूरसाठी सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एस. आरसेवार यांना प्रमुख करण्यात आले असून या पथकात पोकॉ सचिन राठोड, शिवाजी आडंबे, ब्रह्मानंद केंद्रे आणि जमीरखान मुनीरखान यांचा समावेश करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार विशेष पथकात समाविष्ट करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना संबंधित पोलीस स्टेशन शाखा प्रभारी अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत या पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामकाजाचा दैनंदिन आढावा दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयास सादर करावा असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
नांदेड पोलीस परीक्षेचा पदभार स्वीकारल्यानंतर विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी परिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या चारही जिल्ह्यात अवैध धंदे बंद करण्याबाबत आदेशित केले होते. या आदेशानंतर त्यांनी त्या त्या पोलीस अधीक्षकांना विशेष पथक स्थापन करण्याबाबतही आदेश दिले होते. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातही जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ८ ऑगस्ट २०२४ पासून ऑपरेशन फ्लश आऊट सुरू करत अवैध धंदे करणाऱ्याविरुद्ध  मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली होती.  मोठ्या जिल्ह्यात प्रमाणातील बोकाळलेला जुगार, मटका, गुटखा, वाळू, अंमली पदार्थ तस्करी, रेशनचा काळाबाजार रोखण्यासाठी सहा स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली होती. दोन महिन्याच्या कार्यकाळात या पथकांनी तसेच काही ठाणे अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत जवळपास सहा कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तर जवळपास ७५० गुन्हेही दाखल करण्यात आले होते. ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत जिल्ह्यात अवैध धंद्यांना आळा बसल्याचे चित्र निर्माण झाले होते. सामान्य नागरिक हे पोलिसांच्या या कारवाईवर समाधानी होता. मात्र ११ ऑक्टोबर रोजी या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हालसे, पोलीस हवालदार ब्रह्मानंद लामतुरे, पोकॉ राम मुळे, महेश कावळे, तुकाराम जुन्ने या पाच जणांनी  लोहा वळण रस्त्यावर वाळूमाफियांकडून थेट वसुलीच सुरू केली होती. ही बाब नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या निदर्शनात आली. त्यांनी कंधार उपविभागीय अधिकारी अश्विनी जगताप यांच्यामार्फत या पथकाला पकडले. त्यांच्याकडून १ लाख ३ हजार रुपये रोख स्वरूपात जप्त केले आहेत. या पथकातील सर्वच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश उमाप दिले आहेत. त्यामुळे ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत झालेल्या कारवायांबाबत आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याचवेळी या पथकांनी आपली विश्वासर्हता गमावल्याने पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी तातडीने निर्णय घेत सहाच्या सहा पथके बरखास्त करीत नव्या पथकांचे गठन करून त्यांच्यावर आता अवैध धंदे रोखण्याची जबाबदारी सोपविली आहे. विशेष म्हणजे लोहा येथील घटनेनंतर या नव्या पथकांवरही आणखी करडी नजर राहणार आहे. त्यामुळे या पथकांची कामगिरी आता नेमकी कशी राहील याकडेही लक्ष लागले आहे.

महसूल विभाग निवडणुकीच्या तयारीत; वाळूमाफियांचे चांगभले..! उमापांची करडी नजर

विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. निवडणुकांच्या तयारीसाठी महसूल विभाग गेल्या दोन महिन्यापासून गुंतलेला आहे. त्यात पोलीस उपमहानरीक्षक शहाजी उमाप यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. असे असतानाही जिल्ह्यात वाळूमाफीयांना मात्र मोकळे रान आहे की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. बिहारी, उत्तर प्रदेशातील शेकडो टोळ्या नांदेड जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. या टोळ्यांना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळूमाफीयांनी आसरा दिला आहे. या टोळ्या रिकाम्या हाताने जिल्ह्यात दाखल झाल्या नाहीत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात गावठी कट्टेही उपलब्ध आहेत. हे गावठी कट्टे गुन्हेगारांना विक्री करण्याचे सत्रही जिल्ह्यात मागच्या काही वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. असे असताना महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू होता. त्याचवेळी पोलिसांचे लागेबांधेही आता पुढे येत आहेत. आगामी निवडणुकीच्या काळात या वाळूमाफियना आता रोखण्याची जबाबदारी महसूलसह पोलीस प्रशासनावर आहे. आता पावसाळा संपला आहे. त्यामुळे वाळूमाफीयाही ऍक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. त्यांना डीऍक्टिव्ह करण्याची जबाबदारी स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी, त्या त्या ठाण्याचे अधिकारी घेतील का हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. नाहीतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न..!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!