
नांदेड – जिल्ह्यात शेती, सिंचन, आरोग्यासह पर्यावरण रक्षणासाठी काम करण्यास प्राधान्य देणार असल्याचे नूतन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले. कर्डिले यांनी गुरुवारी पदभार स्वीकारल्यानंतर विविध विभागांचा प्राथमिक स्वरूपात आढावा घेतला. शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील कामांचा प्राधान्यक्रम स्पष्ट केला.
जिल्ह्यात सिंचनाचे प्रमाण असले तरी ते प्रमाण आणखी वाढविण्यासाठी काम केले जाणार आहे. शेतीमध्ये काम करण्यासही मोठा वाव आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. केळी, ऊस यासह फळपीकांचेही मोठ्या प्रमाणात आहे. शेती उत्पादन वाढविण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांना करता यावा या शासन स्तरावर प्रयत्न केले जाणार आहेत. सिंचन क्षेत्रातही काम करण्याची गरज आहे. जलसंधारणाची कामे हाती घेऊन भूजल पातळी वाढवणे गरजेचे आहे. पर्यावरण रक्षणासाठी काम करण्याची गरज आहे. वर्धा येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना ‘चला नदीकडे जाऊ या ‘ हा उपक्रम राबविला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याच धरतीवर नांदेड जिल्ह्यातही नदी संवर्धनासाठी काम करण्याची गरज आहे.
जिल्ह्यात सामान्य माणसांची कामे वेळेत व्हावीत या बाबीला आपले प्राधान्य राहणार आहे. शेवटच्या व्यक्तीपर्यंत शासनाच्या योजना पोहोचाव्यात यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. नागरिकांसाठी आपण सदैव उपलब्ध राहणार आहे. काही कारणामुळे भेट होत नसेल तर आपण आपला व्हॉट्स ॲप क्रमांक उपलब्ध करून देण्यात येईल. शासकीय योजनांचे अनेक प्रस्ताव बँकाकडून नाकारले जातात. परिणामी विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवर मोठा परिणाम होत आहे. ही परिस्थिती पूर्णतः बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्ह्यात सामाजिक संस्थांसोबत प्रशासन हातात हात घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणार आहे. अशा सामाजिक संस्थांशी समन्वय साधून जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितले.
नांदेडला यावर्षी महसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजनाचा बहुमान मिळाला आहे. २०१२ मध्ये राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा पुण्यातील बालेवाडी येथे झाल्या होत्या. त्यानंतर आता त्या थेट मराठवाड्यात नांदेडमध्ये होत आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या स्पर्धा आयोजनाचे शिवधनुष्य उचलले आहे. ते यशस्वी करण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. या स्पर्धांची जय्यत तयारी केली जात आहे. या स्पर्धांसह राऊत यांनी जिल्ह्यात सुरू केलेल्या अनेक लोकोपयोगी योजना सुरूच ठेवण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.