अपघात

नांदेडमध्ये आनंदनगरात आगीचे तांडव..! 

हॉस्टेलमधील ७० मुलींचे वाचविले प्राण..! हॉटेल, हॉस्टेल, मोबाईल शॉपी, ऑइल शोरूम जळाली

नांदेड – शहरातील आनंदनगर भागात आज बुधवारी पहाटे पाच वाजेदरम्यान आगीचे तांडव पहायला मिळाले. या आगीत हॉटेल, हॉस्टेल, मोबाईल शॉपी आणि ऑइल शोरूम जळाली आहे. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे अग्निशमन दलाला पोहोचण्यास काही मिनिटांचाही विलंब झाला असता तर आगीच्या तावडीत सापडलेल्या हॉटेलमधील ७० मुलींचा जीव अक्षरशः धोक्यात आला होता. मात्र सुदैवाने या सर्व मुलींना वेळीच सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

शहरातील आनंदनगर भागात आज बुधवारी पहाटे पाच वाजेदरम्यान प्रारंभी नैवेद्यम हॉटेल आणि जीव्हीसी मोबाईल शॉपीला आग लागली. या आगीने रौद्र रुप धारण केले. यात नैवेद्यम हॉटेलच्या वरच्या मजल्यावर असलेल्या वैष्णवी मुलींच्या हॉस्टेललाही आगीने वेढले. या इमारतीच्या डाव्या बाजूस असलेल्या जीव्हीसी मोबाईल शॉपीपर्यंत आग पोहोचली. त्यात मोबाईल शॉपीचे सीसीटीव्ही कॅमेरे व शटर जळाले. मोबाईल शॉपीच्या डाव्या बाजूस श्री महालक्ष्मी ऑईल शोरूम हे मोठे दुकान होते. या दुकानाचेही शटर व समोरील सिलिंग आगीमध्ये जळाली. नांदेड महापालिकेच्या अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळताच एम.एच. २६ सीएच १४७९ क्रमांकाच्या बंबासह अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे, कांबळे, साजीद, गीते, शिंदे, नरवाडे हे अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. ही आग विझवत असताना हॉटेल नैवेद्यमवरील वरच्या मजल्यावर असलेल्या वैष्णवी मुलींच्या हॉस्टेलमधून तब्बल ७० मुलींची तातडीने सुखरूप सुटका करण्यात आली. त्याचवेळी हॉटेल नैवेद्यममधील ८ गॅस सिलिंडरही वेळीच बाहेर काढण्यात आले. जीव्हीसी मोबाईल शॉपीतील १५ ते २० लाख रुपयांचे साहित्य तसेच महालक्ष्मी ऑईल शोरूममधील ३० ते ४० लाख रुपयांचे आगीपासून वाचविले. दरम्यान, ही आग कशामुळे लागली हे मात्र अद्यापही स्पष्ट झाले नाही.

नांदेडमधील हॉस्टेलची सुरक्षितता रामभरोसे…नांदेड शहर हे शैक्षणिकदृष्ट्या आता राज्यात नाहीतर देशात नावारूपास आले आहे. त्यामुळे देशभरातील मुले नांदेडमध्ये शिक्षणासाठी येत आहेत.  या मुलांच्या राहण्यासाठी ठिकठिकाणी हॉस्टेल्स उभारण्यात येत आहेत. हॉस्टेल उभारणीबाबत असलेली नियमावली मात्र गुंडाळून ठेवली जात आहे. याकडे प्रशासकीय यंत्रणेचेही दुर्लक्षच होत आहे. बुधवारी झालेल्या आगीच्या घटनेत आनंदनगर येथील वैष्णवी मुलींच्या हॉस्टेलमध्ये छोटे छोटे कप्पे बनविण्यात आले होते. हे कप्पे प्लायवूड आणि साध्या पडद्यांनी तयार केल्याची बाब पुढे आली आहे. अगदी लहानशा जागेत या ७० मुली राहत होत्या. हॉटेल नैवेद्यममधील आगीने वैष्णवी मुलींचे हॉस्टेलला जवळपास गाठलेच होते. एका प्लायवुडने पेटही घेतला होता. सुदैवाने अग्निशमन दल वेळेत दाखल झाले आणि पुढील दुर्घटना घडली असेच म्हणावे लागेल. मात्र त्याचवेळी आता अशा या नांदेडमध्ये गल्लोगल्ली थाटलेल्या हॉस्टेलमधील सुरक्षिततेचे काय?  या सुरक्षिततेबाबत काही नियमावली आहे की नाही? त्या नियमावलींचे पालन का केले जात नाही? असे प्रश्न पुढे येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!