
नांदेड – विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील आ. जितेश अंतापूरकर यांचे नाव ठळकपणे समोर येत आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीने लोकसभा निवडणुकीदरम्यानच पाठवला होता. मात्र त्यानंतरही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे आता विधान परिषद निवडणुकीतही संशयाची सुई पुन्हा एकदा आ. अंतापूरकर यांच्याकडेच वळली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा काँग्रेसने आ. अंतापूरकर यांच्याविरुद्ध कारवाई करावी, असा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसकडे पाठविल्याची माहिती काँग्रेसचे नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांनी दिली. याच प्रस्तावाबाबत खा. वसंतराव चव्हाण यांनीही दुजोरा दिला आहे.
विधान परिषदेच्या १२ जुलै रोजी झालेल्या अकरा जागांच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपाचे सर्व उमेदवार निवडून येतील अशी परिस्थिती नव्हती. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांनाही काही मतांची जुळवाजुळ करावी लागणार होती. ही जुळवाजुळ करत महायुतीने विजयाचा झेंडा फडकवला. या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट पुरस्कृत शेकापचे उमेदवार जयंत पाटील हे पराभूत झाले आहेत.
विधान परिषद निवडणूक निकालानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता कोणतीही प्रक्रिया न करता थेट कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. मात्र याच प्रक्रियेत नांदेडबाबत विलंब झाल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे देगलूर विधानसभेचे आ. जितेश अंतापूरकर यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे काम केले नाही, प्रचारात भाग घेतला नाही. या निवडणुकीच्या प्रचारदरम्यानच प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी नांदेडमध्ये असताना आ. अंतापूरकर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले होते. मात्र तसे न करता पुढे त्यांना काँग्रेसच्या दुष्काळ पाहणी समितीत समाविष्ट करून त्यांना अभय देण्यात आले. आता विधान परिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा जितेश अंतापुरकर संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अंतापूरकर यांचे मत फुटल्याचे स्पष्ट होत असून आता थेट कारवाई करावी अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयाकडे केल्याचे काँग्रेसचे नांदेड दक्षिणचे आमदार जिल्हाध्यक्ष माजी आमदार बेटमोगरेकर यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत खासदार वसंतराव चव्हाण यांनीही कारवाई आता प्रदेश पातळीवरून तातडीने होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.