प्रशासकीय

‘युवा उमेद’ने युवकांना रोजगाराची संधी मिळेल – पालकमंत्री अतुल सावे

२२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा

नांदेड – परंपरागत आणि बहुचर्चित भोकर मतदार संघातून आमदार झाल्यानंतर श्रीजया चव्हाण शांत बसल्या नाहीत. पहिल्याच महिन्यात त्या कामाला लागल्या असून, त्यांच्या ‘युवा उमेद’ उपक्रमातून युवकांना रोजगाराची चांगली संधी मिळेल, अशी शाबासकीची थाप पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. रोजगार व स्वयंरोजगार तसेच शैक्षणिक दर्जोन्नतीसाठी आ. श्रीजया चव्हाण यांनी सुरु केलेल्या ‘युवा उमेद’ उपक्रमाचे फेसबुक पेज व इन्स्टाग्रामचा शुभारंभ करताना ते रविवारी नांदेडमध्ये बोलत होते.

येथील डॉ. शंकरराव चव्हाण मेमोरियलमध्ये आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. अशोकराव चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून खा.डॉ. अजित गोपछडे, भाजपचे विभागीय संघटन महामंत्री संजय कौडगे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपाचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, भाजपचे महानगर कार्यकारी अध्यक्ष अमरनाथ राजूरकर, श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे सचिव डी. पी. सावंत, नांदेड उत्तर ग्रामीणचे भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख, प्रदेश सचिव देविदास राठोड, बालाजी बच्चेवार, श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे सहसचिव रावसाहेब शेंदारकर, नरेंद्र चव्हाण, प्राचार्य जी.एन. शिंदे, कौशल्य विकास विभागाच्या रेणुका तम्मलवार आदी मान्यवर उपस्थित होते.

अर्धापूर येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालय २२ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘युवा उमेद’चा भव्य रोजगार मेळावा होणार आहे. हा मेळावा आणि मेळावापूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माहितीपत्रकाचे विमोचन देखील पालकमंत्री व इतर मान्यवरांनी याप्रसंगी केले. मराठवाड्यात अनेक उद्योग येत असून, ही संधी साधण्यासाठी आपल्या भागातील तरुणांनी सज्ज झाले पाहिजे, असे पालकमंत्री ना. अतुल सावे पुढे म्हणाले. विशेष म्हणजे त्यांच्या ओबीसी विकास खात्यांतर्गत असलेली संस्था ‘महाज्योती’चा स्टॉल अर्धापूरच्या रोजगार मेळाव्यात उपलब्ध असेल, असेही त्यांनी आवर्जून घोषित केले.

आ. श्रीजया चव्हाण यांनी रोजगार मेळाव्यासोबतच कंपन्यांमध्ये नोकरीसाठी मुलाखत कशी होते, तिथे कसे बोलायचे, कसे कपडे घालायचे आदींबाबत माहिती देणारे मेळावापूर्व प्रशिक्षण आयोजित केले आहे. यातून मुलाखतीला जाताना युवकांच्या आत्मविश्वासात भर पडेल, असे खा. अशोकराव चव्हाण अध्यक्षीय भाषणात म्हणाले. यशवंत महाविद्यालयाच्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रा. विश्वाधार देशमुख यांनी सांभाळली. याप्रसंगी युवा वर्ग, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आ. श्रीजया चव्हाण यांनी भोकर हा केवळ मतदारसंघ नसून, आमच्या कुटुंबाचाच एक भाग आहे. या ग्रामीण भागातील मतदारसंघातील विद्यार्थ्यांची क्षमता वृद्धींगत करावी, रोजगार व स्वयंरोजगाराच्या शोधात असलेल्या युवा वर्गाला माहिती, मार्गदर्शन व प्रशिक्षण देऊन मदत करावी, यासाठी आम्ही ‘युवा उमेद’ उपक्रम सुरु केला. या माध्यमातून रोजगाराची संधी व तरुणांमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!