
नांदेड – गुंज येथून सकाळीच शेतमजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर त्या विहिरीकडे जात असल्याचे पाहून ट्रॅक्टर ट्रॉलीत बसलेल्या सर्व महिला ट्रॅक्टर चालकाला ट्रॅक्टर थांबवण्याबाबत जीवाच्या आकांताने ओरडून सांगत होत्या. मात्र त्याच्या कानात हेडफोन असल्याने त्याला महिलांचा हा आवाज आलाच नाही आणि त्याने ट्रॅक्टर थेट विहिरीतच नेले. त्यावेळी मोठा हिंमतीने बालपणापासून पोहणे येत असलेल्या ४० वर्षीय पुरभाबाई कांबळे यांनी स्वतःला तर वाचवलेच पण पार्वतीलाही ओढत कडेला आणले. त्यानंतर विहिरीच्या काठावर पाहून उभे राहून त्या आपल्या पोटच्या मुलीचा शोध घेऊ लागल्या. १८ वर्षीय सिमरन पाण्यातून वर येईल आणि आपण तिला बाहेर काढू, असा विश्वास त्यांना वाटत होता. मात्र त्यांची मुलगी सिमरन ही काही पाण्याबाहेर आलीच नाही. त्यामुळे तिला वाचवता आले नाही, असे सांगून पुरभाबाईने आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली.
तीन दिवसापासून नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात भुईमूग निंदण्यासाठी वसमत तालुक्यातील गुंज येथील महिला शेतमजूर येत होत्या. पहिल्या दोन दिवशी शेतमालकाने ट्रॅक्टर आणण्यासाठी पाठवले. दोन दिवस काम झाले मात्र तिसऱ्या दिवशी ट्रॅक्टर घेऊन येणारा तरुण सात महिलांचा काळ बनून आला होता. महिलांना घेऊन मजुरीचे काम असलेल्या शेतात ट्रॅक्टर पोहोचलेही होते मात्र रोजची वाट त्याने निवडली नाही. दुसऱ्या वाटेने तो जात होता. शेतातील विहिरीजवळ असलेल्या चारीतून ट्रॅक्टर पुढे जात नव्हते. यावेळी समोर विहीर आहे हे पाहून ट्रॅक्टरमधील सर्वच महिलांनी एकच आरडाओरड केली. आम्हाला उतरू दे, आम्हाला उतरू दे… मात्र ट्रॅक्टर चालकाच्या कानात हेडफोन असल्याने त्याला महिलांचा हा आवाज ऐकू आला नाही.. ऐकू आला असला तरी त्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि ट्रॅक्टर पुढेच नेले ते थेट विहिरीतच… ट्रॅक्टर विहिरीत कोसळताच काय होत आहे हे कळायच्या आता सर्वजण बुडाले. विहिरीत बुडालेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये पाणी भरत असताना मोठ्या पाण्याच्या उकळ्या आल्या. त्यात पुरभाबाई या ४० वर्षीय महिलेसह पार्वतीबाई भुरड आणि बचावलेला सटवाजी जाधवही पाण्याबाहेर आला. पुरभाबाईला लहानपणापासूनच पोहणे येत होते. त्या पाण्याबाहेर आल्यानंतर त्यांच्या गळ्याला जीवाच्या आकांताने पार्वतीबाईने मिठी मारली होती; त्यावेळी मोठ्या हिंमतीने पुरभाबाईने स्वतःला आणि पार्वतीबाईलाही कडेला आणले. विहिरीतील विद्युत मोटार असलेल्या पाईपला धरून त्या उभ्या राहिल्या. दुसरीकडे सटवाजी जाधव आणि ट्रॅक्टर चालकही पाण्याबाहेर आला. हे दोघेही तात्काळ विहिरीच्या बाहेर आले. ट्रॅक्टर चालक पळून गेला तर सटवाजी जाधवने मदतीसाठी आरडाओरड सुरू केली.
विहिरीमध्ये कडेला असलेल्या पुरभाबाईची नजर आपल्या मुलीला शोधत होती. त्यांची मुलगी १८ वर्षीय सिमरनही ट्रॅक्टर ट्रॉलीत होती मात्र ती पाण्यात होती. पाण्याबाहेर ती येईल आणि आपण तिला बाहेर काढू असा मनोमन विश्वास पुरभाबाईला होता. त्या विहिरीतील पाण्याकडे डोळे लावून बसल्या होत्या. आपली मुलगी वर येईल आणि आपण तिला बाहेर काढू मात्र असे घडलेच नाही. मुलगी सिमरन ही काही पाण्यातून वर आलीच नाही. त्यामुळे काठावर वाट पाहत असलेल्या पुरभाबाईला एकच चिंता लागली होती आपल्या मुलीचे काय… इकडे सटवाजी जाधवने मदतीसाठी धाव घेऊन गावकऱ्यांना जमा केले. गावकरी मदतीला धावले मात्र त्यांच्या हाती साधन नसल्यामुळे तेही काही करू शकत नव्हते. त्यामुळे सर्वांना बाहेर काढण्यासाठी मदतीची वाट पाहत तब्बल दोन तास आपण विहिरीत होतो असेही पुरभाबाईने स्पष्ट केले. दोन तासानंतर सर्व यंत्रणा आली. पाणी उपसा केला, आम्हाला बाहेर काढले मात्र सोबतच्या मात्र पोटच्या गोळ्यासह सोबतच्या सात महिलांचे मृतदेह पाहायला मिळाले. आजघडीला पुरभाबाई या आपल्या वस्तीवर आहेत. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. या अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. त्यांना काही टाकेही बसले आहेत. स्वतः त्या अपघातातून बचावल्या असल्या तरीही आपल्या मुलीची प्रतीक्षा त्यांना नेहमीच राहणार आहे.
मोठ्या हिंमतीने विहिरीत पडल्यानंतर स्वतः चा आणि पार्वतीबाईचा जीव वाचवलेल्या पुरभाबाईने ही ‘आप बीती ‘ ‘नांदेड स्क्रिप्ट’ पुढे मांडली. सटवाजी जाधवने आपल्याला वाचवले का असे विचारले असता त्यांनी सटवा तर लगेच पाण्याबाहेर आला आणि विहिरीतूनही तो बाहेर पडला . त्याने आरडाओरड करून गावकऱ्यांना माहिती दिली, लोकांना गोळा केले हे त्यांनी स्पष्ट केले. ट्रॅक्टर चालकही लगेच विहिरीबाहेर येऊन पळून गेला असल्याचे त्यांनी सांगितले.