
नांदेड – देगलूर नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात असलेले घर जिल्हा परिषद हायस्कूल प्रशासनाने अतिक्रमण म्हणून जातीय द्वेषातून पाडल्यानंतर जिल्हा परिषद हायस्कूलच्या मुख्याध्यापिकांना तात्काळ निलंबित करावे, या सर्व प्रकरणाची चौकशी करून न्याय द्यावा, आम्हाला शासनामार्फत पक्के घर मिळवून द्यावे या मागणीसाठी एकाच कुटुंबातील तब्बल दहा महिला, मुली तसेच पुरुष आणि बालके यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापुढे प्रारंभी चार दिवस आमरण उपोषण आणि त्यानंतर धरणे आंदोलन सुरू केले आहे. तब्बल १७ दिवसानंतरही या आंदोलनाची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. कोणत्याही पोलीस बंदोबस्ताशिवाय १७ दिवस या दहा महिला, मुली, बालके जिल्हाधिकारी कार्यालयापुढे रात्रंदिवस ठाण मांडून असताना प्रशासनाची संवेदनशीलता कुठे हरवली असाच प्रश्न पुढे येत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत सामान्य नागरिकांना वेगवेगळ्या सुविधा पुरवाव्यात, प्रश्न वेळेत सोडवावेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व विभागांचे अधिकारी आपल्या विभागामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत मात्र जिल्हाधिकारी कार्यालयापुढेच सुरू असलेल्या आंदोलन, उपोषणांची संख्या पाहता या शंभर दिवसांच्या उपक्रमात सामान्य नागरिकांचे प्रश्न किती तत्परतेने सोडवले जात आहेत याचीच प्रचिती स्पष्टपणे येत आहे.
देगलूर येथील विधवा महिला रसिकाबाई राजाराम कांबळे यांचे देगलूर येथे जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील बाजूस घर आहे. ३५ वर्षापासून सदर महिला आपल्या कुटुंबीयांसह येथे वास्तव्यास होती. ३५ वर्षापासून देगलूर नगरपालिकेकडे नियमितपणे करही भरला जात होता मात्र असे असताना जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणात अतिक्रमण झाले असल्याचे नमूद करत शाळेच्या मुख्याध्यापिका बसवदे, शाळेतील कर्मचारी भगवान पाटील, देगलूर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे आणि तुमची जागा जिल्हा परिषद शाळेच्या कार्यक्षेत्रात आहे, असे म्हणून ६ मार्च २०२५ रोजी दुपारी जेसीबीने त्यांचे ३५ वर्षापासूनचे राहते घर जमीनदोस्त केले. यावेळी कांबळे कुटुंबीयांनी ही जागा नगरपालिका क्षेत्रात असून शाळेच्या अतिक्रमणात नसल्याचे वारंवार सांगूनही शाळेच्या मुख्याध्यापिका, भगवान पाटील आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांनी घर जमीनदोस्त केले. या कारवाईदरम्यान घरातील मोबाईल, टीव्ही, फ्रिज, कुलर, अन्नधान्याची नासधूस झाल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणाची चौकशी करावी या मागणीसाठी रसिकाबाई आणि त्यांच्या मुली, नातवंडे यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण सुरू केले.
आज १० एप्रिल रोजी या उपोषण आणि धरणे आंदोलनाला तब्बल १७ दिवस उलटले आहेत. या १७ दिवसात सदरील उपोषण उठवावे यासाठी जिल्हा प्रशासनातील कोणताही संवेदनशील अधिकारी पुढे आला नाही. विशेष म्हणजे एकाच घरातील १० महिला, मुली व इतर सहा जण जिल्हा कचेरीपुढे आंदोलन करत असताना संवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळणे गरजेचे होते. योग्य त्या कार्यवाहीचे आश्वासन, पत्र देऊन उपोषणकर्ते, आंदोलनकर्त्यांचे समाधान करणे आवश्यक होते मात्र गेल्या काही दिवसातील जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची मानसिकता पाहता उपोषणकर्ते, आंदोलनकर्ते यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत त्यांना आंदोलनापासून परावृत्त न करता ‘ बसू द्या’ काय होते, अशीच भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयापुढील आंदोलन, धरणे यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मागण्यासंदर्भात आवश्यक ती भूमिका घेऊन जिल्हा प्रशासनाने न्याय द्यावा, अशीच भूमिका आंदोलनकर्त्यांची असते मात्र जिल्हा प्रशासनाकडून आपल्या अधिनस्त कार्यालय, अधिकारी, कर्मचाऱ्यांची पाठराखणाच होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ज्यांच्याविरुद्ध तक्रार आहे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे कंधार तालुक्यातील बोरी बू येथील शिवलिंग सदाशिव स्वामी या ७२ वर्षीय धरणग्रस्त पालकाने आपल्या पाल्याला नोकरी द्यावी या मागणीसाठी ७ एप्रिलपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. सोनाजी नागोराव कांबळे, अनुसया सोनाजी कांबळे या कुटुंबानेही जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण सुरू केले आहे. त्याकडेही प्रशासनाने कानाडोळाच केला आहे.
विविध संघटनाचे कागदावरील नेते गेले कुठे..?जिल्ह्यात बहुजन, दलित चळवळीचे नेतृत्व आपल्याच खांद्यावर आहे असे समजून, भासवून वेगवेगळ्या बैठकामध्ये अधिकाऱ्यांच्या पुढे पुढे करत सहभागी होणारे नेते एक सामान्य कुटुंब आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १७ दिवस जिल्हास्तरावर आंदोलन करत असताना हा प्रश्न सोडवून कांबळे कुटुंबीयांना न्याय द्यावा, त्यांचा प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा होती. तब्बल सतराव्या दिवसापर्यंत तरी हा प्रश्न सोडवण्यासाठी, हे आंदोलन समाप्त करण्यासाठी कुणीही भूमिका घेतली नव्हती. १४ एप्रिल.. भीमजयंती साजरी करण्यासाठी प्रत्येक आंबेडकरी कुटुंब आज एका ऊर्जेने, उत्साहाने तयारीला लागले आहे मात्र देगलूर येथील कांबळे कुटुंबीय आज वादळी वाऱ्याशी, पावसाची लढा देत जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ठाण मांडून आहे. भूक लागल्यास या बालकांना नांदेडमधील लंगरमध्ये आपली भूक भागवावी लागत आहे. याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांना ना चळवळीतील मी नेता आहे असे मानणाऱ्यांना कोणतेही सोयर सुतक उरले नाही हेच वास्तव आहे.