सामाजिक

तामसा प्रकरणातील दरोड्याचे खोटे गुन्हे मागे घेण्याची जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडे मागणी

बुद्ध विहारासमोरील अतिक्रमण हटविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागासह महसूल विभागाची बैठक तामसा येथे घेतली जाणार 

नांदेड – हदगाव तालुक्यातील तामसा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला काही समाजकंटकांनी बॅनर फाडून स्थानिक नागरिकांना मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणात तामसा पोलीस ठाण्यात दोन्ही गटाकडून आलेल्या तक्रारीनंतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत; मात्र या प्रकरणातील दलित बांधवांवर दाखल करण्यात आलेले दरोड्याचे खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी तामसा येथील शेकडो महिलांनी नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसेच पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्याकडे मंगळवारी केली.

समाजकंटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे बॅनर फाडल्यानंतर तसेच मारहाण केल्याप्रकरणी तामसा पोलीस ठाण्यात १३ एप्रिलच्या रात्री गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर १४ एप्रिलच्या सकाळी संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, बीट जमादार यांना हाताशी धरून तामसा गावातील बौद्ध युवकांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची तक्रार तामसा येथील महिलांनी केली आहे. या गुन्ह्याची उच्चस्तरीय अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या महिला मंडळाच्या शिष्टमंडळाने केली आहे. या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचीही भेट घेऊन या प्रकरणाची माहिती दिली तसेच खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी केली. गावातील एक महिला तामसा पोलीस स्टेशन येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे बॅनर जातीयवादी समाजकंटकाने काढल्याबाबत तक्रार करण्यासाठी गेली असता तेथे तामसा पोलिसांनी त्यांना दमदाटी करून ठाण्याबाहेर काढले. या प्रकरणाचीही चौकशी करावी त्याचवेळी तामसा येथील बौद्ध समाजाला संरक्षण देण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी तथा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.

यावेळी रिपाई आठवले गटाच्या महिला आघाडीच्या राज्य सचिव वैशाली हिंगोले, भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या राज्य सचिव महादेवी मठपती, रिपाईचे मिलिंद शिराढोणकर, मनीषा जाधव, सागरभाई जाधव, निर्मलाबाई जाधव, सरस्वतीबाई जाधव, सखुबाई जाधव आदी महिलांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती.

तामसा येथील अतिक्रमणाबाबत संबंधित विभागाची बैठक होणार…तामसा येथे बौद्ध विहारापुढे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी या प्रकरणात सर्व संबंधित विभागाची बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती दिली. हदगाव तहसीलदार यांना या बैठकीचे आयोजन करण्याबाबतही निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग व इतर संबंधित विभागाची उपस्थिती राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!