सामाजिक

नांदेडमधील ६० विद्यार्थ्यांनी घेतले इस्रो अंतराळ संशोधन केंद्राकडे उड्डाण..!

रेल्वेतही कधी न बसलेल्या विद्यार्थ्यांना मिळाली विमान प्रवासासह वैज्ञानिक अभ्यासाची संधी

नांदेड – कुणाचे वडील मजुरी करतात तर आई शेतावर कामाला जाते, कुणाला वडिल नाहीत, तर कोणाचे घर आई एकटीच सांभाळते. अशा या आर्थिकदृष्ट्या बिकट कौटुंबिक परिस्थितीत शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाचा आधार बनण्याचा निर्धार करत सहाय्यक समाज कल्याण अंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध यांच्यासाठी नांदेड जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळेत शिक्षण घेणाऱ्या साठ विद्यार्थ्यांनी आज बुधवारी हैदराबादहून श्रीहरीकोटाकडे विमानाने उड्डाण केले. आयुष्यातील हा सर्वोच्च अभिमानाचा क्षण… विद्यार्थ्यांसाठीही आणि त्यांच्या पालकांसाठी होता. या उड्डाण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी कोणी रेल्वेतही बसले नव्हते तर कोणाचा प्रवास तालुक्यातून फक्त नांदेड जिल्ह्याच्या ठिकाणापर्यंतच झाला होता.

नांदेडचे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी बुधवारी सकाळी नांदेड सहाय्यक समाज कल्याण कार्यालयातून श्रीहरीकोटा येथील इस्रो या अंतराळ संशोधन केंद्रातमध्ये शैक्षणिक सहलीसाठी जाणाऱ्या साठ विद्यार्थ्यांच्या २ वाहनांना हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. यावेळी सहाय्यक समाज कल्याण आयुक्त शिवानंद मिनगिरे यांचीही उपस्थिती होती. नांदेड जिल्ह्यातील माहूर, हदगाव, उमरी आणि नायगाव येथील साठ विद्यार्थ्यांची निवड श्रीहरीकोटा येथे इस्रो या अंतराळ संशोधन केंद्रातील शैक्षणिक सहलीसाठी झाली आहे. हा नाविन्यपूर्ण उपक्रम नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या संकल्पनेतून हाती घेण्यात आला होता. या विद्यार्थ्यांची निवड विज्ञान परीक्षेमार्फत करण्यात आली होती. जिल्ह्यात चालणाऱ्या या चार शाळांमध्ये परीक्षा घेण्यात आली. प्रत्येक शाळेतून पंधरा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

निवडीनंतर या विद्यार्थ्यांना ओढ लागली ती इस्रोच्या अंतराळ संशोधन केंद्रातील सहलीची. ही सहल जाणार होती ती विमानाने. या विद्यार्थ्यांनी विमानात तर सोडाच पण काही विद्यार्थ्यांनी रेल्वेतूनही प्रवास केला नव्हता, हेही वास्तव पुढे आले. भारतीय संशोधन संस्था इस्रोच्या कार्याची माहिती घ्यावी त्यातून विज्ञानाबाबत विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या संकल्पनेतून मांडण्यात आला होता. तो आज प्रत्यक्ष साकारला. या शैक्षणिक सहलीसाठी ६० विद्यार्थ्यांसह काळजीवाहक म्हणून सोबत अधिकारी, कर्मचारी, शिक्षकही सहलीमध्ये सहभागी झाले आहेत. श्रीहरीकोटा येथे १६ ते १९ एप्रिल दरम्यान ही शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली आहे. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनीही या नावीन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांना इस्रोची शैक्षणिक सहल घडवून आणण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

गेली तीन दिवस भूक लागली ना तहान लागली…आपला नातू विमानातून प्रवास करणार आहे.. तो नेमका कुठे जात आहे… कशासाठी जात आहे याची माहितीही नसलेल्या गौरव सुनील भगत या विद्यार्थ्याच्या आजी अनुसया भीमराव भगत यांनी या शैक्षणिक सहलीबद्दल आनंद व्यक्त केला. आपल्या पणजोबा, आजोबा तसेच कोणीही विमान प्रवास केला नाही, तो शक्यही नव्हता मात्र नातू आज विमानातून प्रवास करणार आहे याचा आम्हाला आनंद आहे. या आनंदात गेली तीन दिवस तहान, भूकही लागली नाही. आम्ही याच आनंदात असल्याची प्रतिक्रिया अनुसया भगत यांनी दिली. यावेळी भीमराव भगत हेही उपस्थित होते.

आकाशात आवाज येताच घरातून बाहेर येऊन विमान बघायचे…घरात असताना आकाशातून जाणाऱ्या विमानाचा आवाज येताच घराबाहेर पडून मान वर करून कुठे गेले.. कुठे गेले असं म्हणून आम्ही विमान बघितले. त्या विमानाचे आयुष्यभर आकर्षण होते. आज त्याच विमानात आपला मुलगा यश प्रवास करणार आहे याचा आनंद ज्योती विजय गच्चे यांच्या चेहऱ्यावर मावत नव्हता. सकाळपासूनच मुलाला सोडण्यासाठी त्या समाज कल्याण कार्यालयात पोहोचल्या होत्या. आपला मुलगा तिथे जाऊन निश्चितच काहीतरी शिकून येईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईमुळेच ही संधी…रेवता सुनील भगत यांनीही आपल्या मुलाच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक केले मात्र या इथपर्यंत येण्यासाठी आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्याईच कामाला आली. त्यांनीच आम्हाला जीवनात वर आणलं. आज आमची मुलं विमानातून जात आहे, याचा अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले.

या शैक्षणिक सहलीसाठी निवड झालेल्या सिद्धी आनंद चंदनकर या हदगाव येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी सांगितले… वडील कंपनीत आहेत तर आई घरीच ब्लाऊज शिवून घर चालवते. अशा परिस्थितीत आपण शिक्षण घेतलं. विज्ञानाची प्रारंभीपासूनच आवड होती. तालुकास्तरावर झालेल्या विज्ञान प्रदर्शनात पहिला क्रमांक मिळवला होता. सेंद्रिय शेतीचा प्रयोग तिने सादर केला होता. पुढे या सहलीसाठी झालेल्या परीक्षेत तिने यश मिळवले आणि आज बुधवारी हैदराबाद येथून विमानाने उड्डाण घेतले.

अक्षरा पाईकराव या माहूर येथील विद्यार्थ्यांनी सांगितले, आई वडील दोघेही शेतात काम करतात. आपण शिक्षणासाठी माहूरमध्ये राहतो. आज विमानातून प्रवास करण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. श्रीहरीकोटा येथे जाऊन निश्चितच काहीतरी शिकणार असेही ती म्हणाली.

निलेश परबतराव हनुमंते या विद्यार्थ्यानेही वडील शेती करतात तर आई घरकाम करते असे सांगितले. घरात भाऊ शिकलेला आहे त्याची प्रेरणा घेऊन आपण शैक्षणिक वाटचाल करत आहोत. तर पारस रमेश जाधव यानेही या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्याचेही आई-वडील शेतकरीच आहेत.

  • सृष्टी प्रमोद परेकर  या माहूर तालुक्यातील या विद्यार्थिनीने आतापर्यंत रेल्वेतही प्रवास केला नाही. ती आज विज्ञान परीक्षेतील यशानंतर थेट विमानातून प्रवास करणार आहे. आई घरकाम करते तर वडील शेती करून कुटुंब चालवतात. अशा या कुटुंबातील सृष्टी विमानातून सृष्टीचा आनंद घेणार आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!