दळणवळण

भोकर, मुदखेड तालुक्यातील रेल्वे भुयारी मार्गांचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होणार

विभागीय रेल्वे व्यवस्थापकाचे माजी मुख्यमंत्री, खा.चव्हाण यांना आश्वासन

नांदेड – सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही जिल्ह्यातील भोकर, मुदखेड तालुक्यातील भुयारी मार्ग, रस्ते व ड्रेनेज अशी ७ कामे रखडल्याने शेतकऱ्यांची गैरसोय, वाहतुकीचा प्रश्न यावरून माजी मुख्यमंत्री, खा.अशोकराव चव्हाण यांनी येथील दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकारसह संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेत त्यांना धारेवर धरले. यानंतर सर्वच कामास गती देत डिसेंबर २०२४ अखेर कामे पूर्ण होतील असे आश्वासन नीती सरकार यांनी दिले आहे.

जिल्ह्यातील भोकर, मुदखेड तालुक्यातील रेल्वे विभागाशी संबंधित भुयारी मार्ग, ड्रेनेजचे काम मुदतीत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र अनेक महिन्यांपासून रखडली आहेत. कामे रखडल्याने शेतकऱ्यांची गैरसोय, वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री, खा. अशोकराव चव्हाण यांनी मे २०२३ तसेच वेळोवेळी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयात कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेत कामे दर्जेदार व गतीने करण्याची मागणी केली होती. यावेळी कामे पूर्ण करण्याची दिलेली मुदत संपली तरी कामे अद्याप पूर्ण न झाल्याने माजी मुख्यमंत्री, खा.अशोकराव चव्हाण यांनी नुकताच दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयात संबंधित कामांचा आढावा घेतला.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बस्वराज पांढरे, कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे, सोनवणे रेल्वेचे कार्यकारी अभियंता रवी, गोविदराव शिंदे नागेलीकर, बाळासाहेब देशमुख बारडकर, रामचंद्र मुसळेसह संबंधित गावच्या सरपंचाची उपस्थिती होती.

यावेळी माजी मुख्यमंत्री, खा.अशोकराव चव्हाण यांनी देगांव -पाथरड, निवघा-खांबाळा, निवघा-इजळी फाटा, भोकर-जाकापूर, थेरबन, भोकर व बेंबरच्या भुयारी रेल्वे मार्ग, रिटेनिंग वॉल लगतचे रस्ते, ड्रेनेजच्या कामांची सद्यस्थिती जाणून घेतली. यातील काही कामे २०१७ आणि काही कामे २०१९ मध्ये सुरू करण्यात आली आहेत. ही कामे सहा महिने ते वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र तब्बल पाच ते सहा वर्ष उलटले तरी कामे पुर्ण झाली नाहीत. यामुळे या भागातील शेतकरी, रस्त्यामुळे वाहतूक, खोदकामांमुळे पाणी साचत असल्याने सबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधत त्यांची माजी मुख्यमंत्री, खा. चव्हाण यांनी चांगलीच झाडाझडती घेतली तसेच प्राधान्यक्रम ठरवून संबंधित कामे दर्जेदार व आणखी पुढे किती दिवसांत पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित केला.  याबाबत त्वरित सकारात्मक निर्णय न झाल्यास रेल्वेच्या वरिष्ठाकडे तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी रेल्वे भुयारातील पाणी पम्पिंगने काढणार, जेथे शक्य नाही त्या ठिकाणी बाजूला रस्ता देण्याचा प्रयत्न तसेच ड्रेनेज अशा सर्वच कामांना गती देत कामे डिसेंबर २०२४ अखेर पूर्ण होतील असे आश्वासन विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी दिले आहे.

अशोकरावांचे टार्गेट भोकर मतदार संघ..! राज्यसभेचे खासदार झाल्यानंतर प्रारंभीपासूनच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भोकर विधानसभा मतदारसंघातील अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी लक्ष्य निर्धारित केले असल्याचेच स्पष्ट होत आहे. जिल्हा परिषदेत घेतलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतांनाही त्यांनी भोकर मतदार संघातील कामांना प्राधान्य दिले होते. आता रेल्वे प्रश्नांवरील बैठकीतही भोकर मतदार संघातील अर्धवट कामे पूर्ण का झाले नाहीत असा प्रश्न उपस्थित करीत रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. दुसरीकडे रेल्वेचे अनियंत्रित झालेले वेळापत्रक, रेल्वेतील अस्वच्छता, ऐनवेळी रद्द होणाऱ्या गाड्या, गुन्हेगारी तसेच विद्युतीकरणाचे काम मार्च २०२४ अखेर पूर्ण झाल्याची घोषणा रेल्वे विभागानेच केली असताना एकही रेल्वे विद्युतीकरणावर नांदेडहून धावली नाही. नवी एकही गाडी सुरू झाली नाही. या सर्व प्रश्नांवर जिल्ह्यातील पाच खासदारांपैकी कोणता खासदार आवाज उचलणार याकडेही आता लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!