क्राईम

नांदेडमध्ये अवैध नळ घेणाऱ्या १७ जणांवर इतवारा ठाण्यात गुन्हा दाखल

जुन्या नांदेडातील भोईगल्ली ब्रह्मपुरी आणि चौफाळा ते बिलाल नगर रस्त्यावर पाणी पुरवठा विभागाच्या पथकाने केली कारवाई 

नांदेड – शहरात एकीकडे उन्हाच्या तीव्रतेने पाणी टंचाईच्या झळा तीव्र होत असताना कोणतीही परवानगी न घेता थेट नळ जोडणी घेण्याचे प्रकारही पुढे आले आहेत. अवैध नळ जोडणी घेणाऱ्या तब्बल १७ जणांविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध नळजोडणी शोधण्यासाठी महापालिका आता थेट मोहीम हाती घेणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिली. अशा प्रवृत्तींना कोणताही थारा दिला जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील अनाधिकृत नळ जोडणी धारकांना नळ जोडणी दि. ३१ जुलै २०२३ पर्यंत अधिकृत करण्याची संधी देण्यात आली होती. अवैध नळ जोडणी घेणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही महापालिकेने दिला होता.

जुन्या नांदेडातील भोईगल्ली ब्रह्मपुरी आणि चौफाळा ते बिलालनगर रस्त्याची महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या पथकाने २५ एप्रिल पाहणी केली असता लक्ष्मण चन्नप्पा मच्छेवार, शकुंतलाबाई राजाराम कोकुलवार, जिल्हा परिषद शाळेच्या जवळ (बेनामी) सर्व रा. चौफाळा ते बिलालनगर रोड, वामन कोंडीबा गवते, तुकाराम राजाराम कोकुलवार, रामदिनवार तानाजी, बालाप्रसाद कल्लाकट्टे, योगेश डीजे ऑडीयो दुकानाजवळ बेनामी, बजरंग दल पाटीजवळ-बेनामी, पुरभाजी हसनपल्ली सर्व रा. भोई गल्ली ब्रम्हपुरी, शंकर पांडूरंग गवते, इस्माईल खान मोहम्मद खान, सुमनबाई पंढरानाथ बोटलावार, शुभांगी धोंडीबा अमृतवाड, शेख मैनुद्दीन शेख सादीक, सलील खान आणि बाबु नवाब अ. हबीब नवाब सर्व रा.चौफाळा ते बिलालनगर रोड या १७ मालमत्ता धारकांनी अनाधिकृत नळ जोडणी घेतल्याचे आढळून आले.

या प्रकरणी पंचनामा करण्यात आलेला आहे. संबंधीत भागाचे वसुली लिपीक जयदीप लक्ष्मण धुळे यांनी अभिलेखे तपासले असता नळ कनेक्शन बाबत कोणतीही नोंद आढळून आली नाही. यावरुन उपरोक्त १७ मालमत्ता धारकाच्या नळ जोडण्या अनाधिकृत असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित पथकाने मालमत्ताधारक मागील चार ते पाच दिवसापासून विना परवाना पाणी वापरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्व नळ महापालिकेने बंद केले आहेत. त्याचवेळी अनाधिकृत नळ जोडणी घेतलेल्या मालमत्ता धारकांनी महानगरपालिकेच्या ताब्यातील जलवाहिनीला अनाधिकृतपणे छिद्र पाडुन सरकारी मालमत्तेचे आर्थिक नुकसान केले आहे. याप्रकरणी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता प्रकाश कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सार्वजनिक संपती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ कलम (३) अन्वये इतवारा ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ ठाकूर हे करीत आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!