
नांदेड – शहर आणि जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात तब्बल १०१ आगीच्या घटना घडल्या आहेत. सदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. त्याचवेळी मालमत्तेचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. नांदेड शहरात आगीच्या या घटनांचे प्रमाण पाहता आगीवर लवकर नियंत्रण मिळवता यावे यासाठी आता अग्निशमन बंबांना त्या त्या भागात पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी महापालिकेने शहरात पाच नवे स्टॅन्ड पोस्ट तयार केले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन बंबांना या स्टॅन्ड पोस्टवर पाणी उपलब्ध होणार आहे. शहरात झोननिहाय एकूण नऊ स्टॅन्ड पोस्ट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
नांदेड महापालिका अग्निशमन दलाला १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या काळात २१६ आगीच्या घटनांना तोंड द्यावे लागले. इतर वेगवेगळ्या घटनेत दोन ठिकाणी रेस्क्यू कॉलही अग्निशमन दलाने पार पाडले आहेत. एमएसईबीच्या विद्युत विद्युत रोहित्रांना आग लागण्याच्या घटना २५ घडल्या आहेत. आगीच्या या घटनांमध्ये महापालिका अग्निशमन बंब भरण्यासाठी सध्या काबरानगर आणि गांधी पुतळा येथील जलकुंभावरून पाणी घेतले जात आहे. गांधी पुतळा येथील जलकुंभावरून पाणी घेण्यासाठी जागाही अपुरी पडत आहे. आगीचे स्वरूप मोठे असल्यास एकापेक्षा अधिक बंब लागत आहेत. त्याचवेळी कधी कधी तर २० हून अधिक बंबांची गरज पडत आहे. त्यामुळे हे बंब भरून आणण्यासाठी मोठा वेळ जात होता. ही बाब पाहता महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी शहरात झोननिहाय स्टॅन्ड पोस्ट तयार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हे स्टॅन्ड पोस्ट तयार करण्याचे काम हाती घेतले. नांदेड शहरातील आगीच्या घटनांचे प्रमाण पाहता महापालिकेचे शहर अभियंता सुमंत पाटील यांनी हे काम वेळेत होण्यासाठी सूचना दिल्या.
त्यानुसार आजघडीला शहरात पाच स्टॅन्ड पोस्ट तयार झाले आहेत. त्यामध्ये नंदिग्राम सोसायटी जलकुंभ, खडकपुरा, हैदरबाग, हडको आणि शहाजी नगर येथील जलकुंभातून आता महापालिकेच्या अग्निशमन बंबांना पाणी उपलब्ध होणार आहे. त्या त्या भागात आगीची घटना घडल्यास तेथून अग्निशमन दल पाणी वेळीच उपलब्ध करून आगीवर नियंत्रण लवकर मिळवणार आहे. हे काम पूर्ण झाल्याचे शहर अभियंता सुमंत पाटील यांनी सांगितले. या स्टॅन्ड पोस्टवरून केवळ आपत्ती काळातच पाणी उपलब्ध होणार आहे. तेही केवळ अग्निशमन बंबासाठीच उपलब्ध राहील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
महापालिकेने नव्याने निर्मिलेले हे स्टॅन्ड पोस्ट अग्निशमन दलाला निश्चितच उपयोगी ठरतील, असा विश्वास महापालिकेचे अग्निशमन अधिकारी के. एस. दासरे यांनी व्यक्त केला आहे. अग्निशमन विभाग हा आगीच्या घटना, रेस्क्यू कॉल, नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती करिता सदैव तत्पर असतो. तसेच अग्निशमन विभाग हा दोन मुख्य तत्वांवर चालतो. एक नागरिकांच्या प्राणांची रक्षा करणे व त्यांच्या संपत्तीचे आगीपासून होणारे नुकसान वाचवणे. हा मुख्य संकल्प करून तो आपले कार्य बजावत असतो. एखाद्या आगीच्या ठिकाणी एकापेक्षा अधिक बंब वापरावे लागत असल्यास ते बंब पुन्हा पुन्हा भरून आणण्यात काही वेळ जात होता. आता त्या त्या भागात स्टॅन्ड पोस्ट असल्याने त्या स्टॅन्ड पोस्टवरून अग्निशमन बंबाला पाणी घेता येणार आहे. त्यामुळे आगीवर नियंत्रण वेळीच मिळवता येईल, असेही दासरे म्हणाले.
मार्च, एप्रिलमध्ये नांदेड शहरात १०१ आगीच्या घटना…शहर व जिल्ह्यात मार्चपासूनच तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे आगीचे प्रमाण वाढले. त्यात आगीचे कॉल ५०, महावितरणचे विद्युत रोहित्र जळण्याचे तीन कॉल झाले. एप्रिल महिन्यामध्ये ४३ अंश सेल्सियसपर्यंत तापमान गेल्यामुळे आगीच्या घटना ३५, रेस्क्यू कॉल २, महावितरणचे विद्युत रोहित्र जळण्याच्या ११ घटना घडल्या आहेत. मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांमध्ये आगीच्या एकूण १०१ घटना घडल्या. यामध्ये महावितरणचे विद्युत रोहित्र जळण्याच्या १४ घटनांचाही समावेश होता. या सर्व आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन अधिकारी के. एस. दासरे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन अधिकारी निलेश कांबळे, फायरमन सूर्यकांत सावळे, गायकवाड, सूर्यवंशी, साजिद, पंडित, लांडगे, ताटे, पवळे, किरकन, शिंदे, गीते, पेरेवाड, पोळे, मोरे, कदम, आंचेवार, पानपट्टे, खंदारे व वाहन चालक तोटावर, नरवाडे, टारपे, ताटे, एन. जी. माशनवार यांनी परिश्रम घेतले.