
नांदेड – नवीन नांदेडातील विस्कळीत झालेला पाणीपुरवठा येत्या दोन दिवसात सुरळीत केला जाईल, अशी माहिती नांदेड महापालिका अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. नांदेड दक्षिणचे आमदार आनंद बोंढारकर यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत पाणीपुरवठा संदर्भात येणाऱ्या अडचणीवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी महापालिका अधिकाऱ्यांनी विद्युत पंप बदलण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून नांदेड दक्षिणचा पाणीपुरवठा दोन दिवसात सुरळीत केला जाईल, असे स्पष्ट केले. या बैठकीत आमदार बोंढारकर यांनी पाणीपुरवठ्यासह स्वच्छता, विद्युत व्यवस्था तसेच पावसाळापूर्व सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.
महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या उपस्थितीत आ. आनंद बोंढारकर यांनी महापालिकेच्या विविध विभागांचा आढावा घेतला. प्रामुख्याने नवीन नांदेड भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाई संदर्भात बोंढारकर यांनी पाणीपुरवठा विभागाला धारेवर धरले. नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ येतेच कशी..? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर ही वेळ आली नसती. त्यामुळे आता तरी तातडीने उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करा, अशी सूचना त्यांनी केली. त्यावेळी मनपाचे शहर अभियंता सुमंत पाटील, उपअभियंता प्रकाश कांबळे यांनी दोन दिवसात या भागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे स्पष्ट केले.
शहरातील स्वच्छतेबाबतही अनेक तक्रारी असल्याचे आ. बोंढारकर यांनी सांगितले. या प्रकरणात स्वच्छता विभागाने लक्ष घालून शहरात स्वच्छता राहील याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले. शहरातील अनेक भागात अंधार असून नागरिकांच्या तक्रारीनंतरही पथदिवे बसविले जात नाहीत, आपण स्वतः फोन करूनही विद्युत विभागाचे अधिकारी त्याला प्रतिसाद देत नाहीत, ही बाब गंभीर असल्याचे हे त्यांनी स्पष्ट केले.
नवीन नांदेड भागात पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी शिरल्याने गंभीर प्रश्न निर्माण होतो, याकडे महापालिकेने वेळेत उपायोजना कराव्यात असे बोंढारकर म्हणाले. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी शहरात सुरू असलेल्या पावसाळापूर्व कामाची माहिती दिली. त्यामध्ये शहरातील मोठे नाले आणि लहान नाले मशिनरीसह उपसले जात असल्याचे सांगितले. शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी बांधकाम व्यावसायिक लेआउटनुसार काम करत नाहीत. लेआउटचे सर्रासपणे उल्लंघन करतात, परिणामी अनेक भागात पावसाळ्यात पाणी शिरण्याचे गंभीर प्रकार होत आहेत. याचे खापर महापालिकेवरच फोडले जात आहे. लोकप्रतिनिधींच्या नावेही बोटे मोडली जातात. त्यामुळे अशा या बांधकाम व्यवसायिकाविरुद्ध लेआउट उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावेत, असे निर्देशही देण्यात आले.
सिडकोतील दोन जलकुंभ २०१० मध्ये तयार करण्यात आले मात्र त्यातून अद्याप पाणीपुरवठा सुरू नसल्याची गंभीर बाब शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विनय गिरडे यांनी निदर्शनास आणून दिली तसेच जुन्या नांदेडातील अनेक जलवाहिन्या या ७० वर्षांपूर्वीच्या असल्याची बाब शिवसेना शहरप्रमुख तुलजेश यादव यांनी सांगितली. त्यावेळी याबाबत निश्चितपणे उपाययोजना केल्या जातील, असेही महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. या बैठकीस शिवसेनेचे नांदेड दक्षिण विभाग प्रमुख सुहास खराणे, उपायुक्त अजितपालसिंघ संधू, सुप्रिया टवलारे, गुलाम सादिक, कार्यकारी अभियंता विश्वनाथ स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्या: आयुक्तांनीही दिले निर्देश… या बैठकीत महापालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनीही मनपा विभाग प्रमुखांना जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. ज्या गोष्टी आज आणि आता करणे गरजेचे आहे, त्या तातडीने कराव्यात. त्या उद्या करून त्याचा कोणताही लाभ नागरिकांना होणार नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांचा प्राधान्यक्रम निश्चित करून काम करावे असे, आदेश डॉ. डोईफोडे यांनी या बैठकीत दिले. बांधकाम विकासकांकडून अनधिकृतपणे कामे होत असतील तर त्याचा तातडीने शोध घेऊन कारवाई करावी, असे आदेशही यावेळी आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी दिले आहेत.