
नांदेड – पावसाळा संपताच जिल्ह्यातील बहुचर्चित येळी, शंखतीर्थ, कामळज घाटावर पुन्हा एकदा अवैध वाळू उपसा सुरू करण्यात आला होता. या वाळू उपसासाठी महाकाय अशा बोटीही चालवण्यात येत होत्या. ही बाब समजताच महसूल आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने कारवाई करत चार मोठ्या बोटी, चार छोट्या इंजिन बोट असा तब्बल एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह उस्माननगर, कुंटूर आणि मुदखेड पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे. मोसमाच्या पहिल्याच टप्प्यात महसूल आणि पोलीस विभागाची ही संयुक्त कारवाई झाल्याने वाळू माफीयांना पहिल्याच टप्प्यात मोठा दणका बसला आहे.
लोहा तालुक्यातील येळीसह मुदखेड तालुक्यातील शंखतीर्थ, कामळज या घाटावर आपले राजकीय वरदहस्त वापरत भर पावसाळ्यातही वाळू उपसा सुरू होता. पूर ओसरताच पुन्हा या अवैध वाळू उपसाला गती आली होती. थेट सक्षण पंपाद्वारे, महाकाय बोटीद्वारे अवैध वाळू उपसा सुरू होता. या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्यासह नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनाही वाळू उपसाची लाईव्ह माहिती सूत्रांकडून मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांना हा अवैध वाळू उपसा तात्काळ थांबवत कारवाईचे आदेश दिले.
वरिष्ठ स्तरावरूनच आदेश आल्यानंतर स्थानिक स्तरावर कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या. ही कारवाई थातूरमातूर न ठेवता मोठ्या स्तरावर ही कारवाई करण्यात आली. ९ सप्टेंबर रोजी महसूल अधिकाऱ्यांसह उस्माननगर, कुंटूर आणि मुदखेड पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने एकाच वेळी गोदावरी पात्रात उतरत वाळू माफीयांना घेरले. या पथकांनी थेट रात्रभर गोदावरी नदीतच पहारा दिला. परिणामी वाळूू माफीयांना आपल्या महाकाय बोट लपविता आल्या नाहीत. त्याचवेळी या कारवाईवर वरिष्ठांचीही नजर असल्याने कोणतीही हालचाल स्थानिक पातळीवरही झाली नाही. परिणामी तब्बल एक कोटींचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. प्रत्येकी १५ लाखाच्या चार बोटी आणि प्रत्येेकी दहा लाखाचे चार छोटे इंजीन असा मुद्देमाल या कारवाईत पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांच्या या कारवाईत शंकर प्रकाश भरकडे, संतोष ज्ञानेश्वर भरकडे दोघे रा. कौडगाव, संजय जाधव रा. चिंचोली आणि भगवान पंडित भोग रा. मारतळा ता. लोहा या चौघांविरूद्ध अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. हे चौघेही महसूल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाच्या हाती लागले नाहीत. पथक येताच ते पळून गेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप स्वतः नदीपात्रात..! ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आणि पोलीस उपअधीक्षक डॉ. अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उस्माननगर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार, उपनिरीक्षक गजानन गाडेकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक हंबर्डे, पोहेकॉ शेख, गंगाधर चिंचोरे, पवार, पोकॉ. प्रकाश पेदेवाड, माधव पवार, जुन्ने, राठोड तसेच मुदखेड आणि कुंटूरच्या पोलीस पथकांनी केली आहे. या कारवाईत कंधारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अश्विनी जगताप या स्वतः सहभागी होत थेट नदीपात्रात उतरल्या. वाळूमाफीयांचा त्यांनी शोध घेताना या महाकाय बोटी शोधल्या. त्यामुळे या कारवाईची तीव्रता आणखी वाढली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप स्वतः नदीपात्रात..! 


