राजकीय

नांदेडमध्ये वसंतरावांनी केली चिखलीकरांवर मात..!

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रचार सभानंतरही नांदेडकरांनी दिली वसंतरावांनाच पसंती

नांदेड – संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांनी भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांना मात दिली आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतरही चव्हाण यांनी चिखलीकर यांना दिलेली मात एक भाजपासाठी मोठी चपराक ठरली आहे. त्याचवेळी चिखलीकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या सभा झाल्या होत्या. मात्र या सभानंतरही नांदेडकरांनी चिखलीकरांना नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांनी हा विजय सामान्य जनतेचा विजय असल्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

नांदेडमध्ये होणारी लढत ही माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांचे भवितव्य निश्चित करणारी निवडणूक होती खासदार चव्हाण यांनी या निवडणुकीत पूर्ण वेळ नांदेड येथे प्रचार केला. इतकेच नव्हे तर देशभरातील नेते नांदेडमध्ये खा. चिखलीकर यांच्या प्रचारासाठी आले होते. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा या मतदारसंघात कळीचा मुद्दा ठरला होता. अनेक गावात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना गावकऱ्यांनी गावबंदी केली होती. त्यांच्या वाहनांना गावात प्रवेश होऊ दिला नाही. प्रचार सभाही घेण्यास अडथळे आणले. हा मोठा फटका भाजपाच्या उमेदवाराला बसला एकीकडे चिखलीकरांची सामान्य जनतेप्रती असलेली बांधिलकी त्यांच्या उपयोगात येईल, असे चित्र निवडणुकीपूर्वी होते. मात्र हे चित्र प्रचारादरम्यान बदलले. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेही खासदार चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे  विजयाचा फाजील आत्मविश्वास बाळगून प्रचारासाठी सरसावलेच नाहीत. खासदार चव्हाण यांच्यासह खासदार चिखलीकर यांच्या कुटुंबीयांनाही गावबंदीचा सामना करावा लागला.

भाजपाचे कार्यकर्ते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशामुळे चिखलीकर यांचा विजय हा एकतर्फी होईल असा फाजील आत्मविश्वास बाळगत होते. तर काँग्रेसचे कार्यकर्ते सामान्य जनतेपर्यंत जात प्रचार करत  महागाई, बेरोजगारी आणि काँग्रेसचे तत्कालीन नेते अशोकराव चव्हाण यांनी निवडणुकीच्या तोंडावर काढलेला पळ याबाबत भाष्य करत होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश करणे हे नांदेड जिल्हावासियांना रुचले नव्हते,  पचले नव्हते. त्यामुळे सामान्य मतदारांची नाराजी ही उघडपणे पुढे येत होती आणि ती मतदानाच्या माध्यमातूनही स्पष्ट झाली आहे.

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या राजकीय प्रभावाचा लाभ संपूर्ण मराठवाड्यासह राज्यात होईल अशी अपेक्षा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना होती. मात्र ती पूर्णपणे फोल ठरली आहे. अशोकराव चव्हाण यांच्या नांदेडमध्येच भाजपाला पराभव पत्करावा लागला. त्यासह शेजारील लातूर, हिंगोली, परभणी येथेही महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर आता प्रश्नचिन्हच निर्माण झाले आहे.

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे राजकीय वैर हे संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रुत होते. २०१९ मध्ये चिखलीकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून प्रचार करत असल्याचे चित्र उभे केले. मात्र मनातून हा प्रचार झाला होता का नाही  याबाबत प्रारंभीपासूनच शंका घेतली जात होती. अशोकरावांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेड शहरातील अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासह जिल्हाभरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला. मात्र हा  हा प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी भाजपाचा कितपत प्रचार केला याबाबत ही शंकाच घेतली जात आहे.

दुसरीकडे भाजप पक्षांतर्गत सुरू असलेली कुरघोडीही प्रतापरावांच्या पराभवास कारणीभूत ठरली आहे. भाजपचे नांदेड महानगराध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष यांच्या निवडीच मुळात चिखलीकर यांच्या मनाविरोधात झाल्या होत्या. नंतर या दोन्ही जिल्हाध्यक्षांनीही वेगळी चूल मांडत कारभार सुरू केला होता. वसंतनगरातून चालणारा कारभार हा अन्य ठिकाणाहून सुरू राहिला. त्याचवेळी लोकसभा उमेदवारीसाठीही भाजपातील प्रमुख नेते पुढे आले. शेवटी चिखलीकर यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडली. दुसरीकडे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर चिखलीकर यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना मोठे बळ मिळाले. या विरोधकांनी थेट चिखलीकर यांना या ना त्या प्रकारे आव्हान देण्याचाही प्रयत्न केला. याबाबत चिखलीकर यांनी मौन बाळगले असले तरीही या दिलेल्या आव्हानाचा फटका लोकसभा निवडणुकीत चिखलीकर यांना बसला आहे. प्रचारादरम्यान खुद्द चिखलीकर यांनीच कोण कोणते पदाधिकारी काम करत आहेत आणि कोणते पदाधिकारी काम करत नाहीत याची यादी आपल्याकडे असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आता चिखलीकर हे आगामी काळात काम न करणाऱ्या तसेच विरोधात काम करणाऱ्यांची यादी जाहीर करतील का याकडेही आता लक्ष लागले आहे. प्रचार संपल्यानंतर आणि मतदानानंतर भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते हे पक्षाने केलेला सर्व्हे विरोधात असतानाही चिखलीकर यांना तिकीट देणे चुकीचे होते अशा प्रतिक्रिया खाजगीमध्ये देत होते. त्यामुळे चिखलीकरांचा पराभव हा स्पष्टपणे दिसत होता आणि तो आज ४ जून रोजी निकालाद्वारेपुढे आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!