सामाजिक

दहावी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने नांदेडमध्ये विद्यार्थिनीने केली आत्महत्या 

गरिबीच्या जाणिवेतून कुटुंबाला हातभार लावण्याची होती इच्छा, घरातच घेतला गळफास

नांदेड – इयत्ता दहावी परीक्षेत ७३.८० टक्के गुण मिळाल्यानंतरही हे गुण कमी असल्याचे भावना मनात आल्याने नांदेड शहरातील अंबानगर येथे राहणाऱ्या रोशनी रवींद्र पगारे या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी नांदेडमध्ये घडली.

वडिलांचे छत्र २०१८ मध्ये हरवल्यानंतर रोशनी आणि तिच्या बहिणीचा आई मोलमजुरी करून सांभाळ करत होती. याच गरीब परिस्थितीत रोशनी रवींद्र पगारे ही विद्यार्थिनी नांदेड शहरातील सावित्रीबाई फुले हायस्कूल, बाबानगर येथे शिकत होती. दुसरी बहीण नुकतीच नववी उत्तीर्ण झाली आहे. बालपणापासूनच घरातील गरिबीची जाण असल्यामुळे आपण शिकून मोठे होऊ आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावू अशी रोशनीची मनोमन इच्छा होती. हाच दुर्दम्य आशावाद घेऊन ती शिक्षण घेत होती. यंदा तिने दहावीची परीक्षा दिली. दोन दिवसापूर्वी दहावीचा ऑनलाईन निकाल लागला. यामध्ये रोशनी पगारे हिला ७३.८० टक्के गुण मिळाले. मात्र हे गुणही कमी असल्याची भावना तिच्या मनात दोन दिवसापासून होती. याच दरम्यान ती आज बुधवारी आपल्या शाळेतील काही मैत्रिणींनाही भेटल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. यानंतर ती घरी आली.

बहिणीला सांगितले माझ्याकडे बघू नको..! आई नेहमीप्रमाणे आज बुधवारीही मजुरीसाठी बाहेर गेली होती. घरात दोघीच बहिणी होत्या. या दोघी घरामध्ये असताना आराम करण्यासाठी पलंगावर पहुडल्या होत्या. बहिण बाजूलाच असताना तिला माझ्याकडे न बघता तू तिकडे बघून आराम कर, असे रोशनीने सांगितले. यावेळी लहान बहिणीला आपल्या मोठ्या बहिणीच्या मनात नेमके काय आहे याची जराशीही शंका आली नाही. काही वेळानंतर तिने बहिणीकडे पाहिले तर घरातील पंख्याला रोशनीने गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. हे पाहताच तिने एकच टाहो फोडला. आजूबाजूचे शेजारी घराकडे धावले आणि याबाबत आईलाही माहिती दिली. आईला ही माहिती कळताच एकच धक्का बसला. आईने कामावरून घर गाठले. रोशनीला पाहून त्यांनी एकच टाहो फोडला. याबाबत विमानतळ पोलिसांना माहिती देण्यात आली असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बदलत्या शिक्षण प्रणालीत गुणांची ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी जीवघेणी ठरत आहे. जीवनात विविध क्षेत्रात करण्यासारख्या अनेक बाबी आहेत; मात्र काही ठराविक क्षेत्राकडेच विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे यात स्पर्धाही मोठी झाली आहे. याच स्पर्धेतून मुलांमध्ये नकारात्मक भावना वाढीस लागली आहे. त्यामुळे आत्महत्येसारख्या अशा घटना पुढे येत आहेत. ही बाब शिक्षण तज्ज्ञांसोबतच मानसोपचार तज्ज्ञांपुढेही मोठे आव्हान उभे करणारी आहे. समाजातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी आता पुढे येणे गरजेचे आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!