
नांदेड ( अनुराग पोवळे ) – नांदेडमध्ये काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारीसाठी एकमेव नावाची शिफारस करण्यात आलेल्या वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या नावाला काँग्रेसच्या केंद्रीय समितीने गुरुवारी मान्यता देत काँग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता नांदेड लोकसभेसाठी प्रतापराव विरुद्ध वसंतराव असा थेट सामना रंगणार आहे.
लोकसभा निवडणुका घोषित झाल्यानंतर भाजपाने प्रतापराव चिखलीकर यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवले आहे. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसकडून कोण लढणार असा प्रश्न निर्माण झाला होता. काँग्रेसच्या केंद्रीय समितीने देशभरातील ५७ उमेदवारांच्या नावाची घोषणा गुरुवारी रात्री केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील सात उमेदवारांचा समावेश आहे. नांदेडमधून विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या विरोधात काँग्रेसने माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना मैदानात उतरविले आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे काँग्रेसमधून भाजपात आल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील बहुतांश आघाड्यांचे पदाधिकारी भाजपामध्ये प्रवेश करीत आहेत. या परिस्थितीत काँग्रेसला लोकसभेसाठी तगडा उमेदवार मिळेल की नाही अशीही चर्चा सुरू होती. मात्र वसंतरावांच्या उमेदवारीने आता त्याला उत्तर मिळाले आहे. शेकापच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आशाताई शिंदे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जात होते. मात्र त्यांचे नाव मागे पडले. त्यामागचे कारण अद्यापही पुढे येऊ शकले नाही.
जिल्ह्याच्या राजकारणातील तगडा अनुभव आणि प्रतिष्ठीत राजकीय घराणे लक्षात घेता तसेच पडझडीच्या काळात काँग्रेस न सोडलेले वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी द्यावी अशी शिफारस केंद्रीय कार्यकारणीकडे करण्यात आली होती. एकाच नावाची शिफारस असल्याने काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा नव्हती. वसंतराव चव्हाण यांनीही आपण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचे स्पष्ट केले होते. इतकेच नव्हे तर ते प्रचारालाही लागले आहेत.
काँग्रेसच्या केंद्रीय समितीने गुरुवारी रात्री घोषित केलेल्या महाराष्ट्रातील उमेदवारांच्या यादीत नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण यांच्यासह लातूर लोकसभेसाठी डॉ. शिवाजीराव काळगे, नंदुरबारमध्ये ॲड. गोपाल पाडवी, अमरावती लोकसभेसाठी बळवंत वानखेडे, पुणे येथे रवींद्र धांगेकर, सोलापूरला प्रणिती शिंदे आणि कोल्हापूर लोकसभेसाठी छत्रपती शाहू महाराज यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.
नांदेड लोकसभेच्या रिंगणात आता भाजपाकडून प्रतापराव आणि काँग्रेसकडून वसंतराव हे दिग्गज उमेदवार आमने सामने आले आहेत. माजी मुख्यमंत्री, खासदार अशोकराव चव्हाण, विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्यासह सत्ताधारी भाजपाचा वसंतराव कसा सामना करणार याकडेही लक्ष लागले आहे.
जानेवारी २०२४ पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडमध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना पराभव पत्करावा लागला आहे. भाजपाचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांनी विजय मिळवला होता. या विजयात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने १ लाख ६६ हजार मते मिळवली होती. ही मते निर्णायक ठरली होती. राज्यात महाविकास आघाडीत वंचितचा वृत्त लिहीपर्यंत तरी समावेश झाला नव्हता. त्यामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघाबाबत वंचित नेमकी काय भूमिका घेते यावरही जय पराजयाचे गणित अवलंबून आहे.
एकूणच काँग्रेसकडून वसंतरावांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघात चांगली लढत होईल ही अपेक्षा काँग्रेससह राजकीय विश्लेषकही व्यक्त करीत आहेत.
यापूर्वी अशोकराव चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री असताना काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडीत २००९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने नायगाव मतदार संघातून वसंतरावांना तिकीट नाकारले होते. मात्र वसंतरावांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली अन् विजयही मिळवला होता. हा इतिहास आहे. काँग्रेसची जिल्ह्यात आजघडीला झालेली वाताहत पाहता नव्या दमाच्या आणि काँग्रेसमधील उर्वरित पदाधिकारी घेऊन लोकसभेचा किल्ला लढवायचा आहे. पण दुसरीकडे आजही वसंतरावांना मानणारी कार्यकर्त्यांची मोठी फळी जिल्ह्यात आहे. त्यात जिल्हाभरात असलेल्या नात्यागोत्यांचा त्यांना किती लाभ होईल हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.