प्रशासकीय

नांदेड जिल्ह्यातील ‘त्या’ ११ पर्यटकांच्या जिल्हा प्रशासन संपर्कात..

सुखरूप असलेल्या सर्व पर्यटकांचे परतीच्या प्रवासाचेही झाले नियोजन- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती

नांदेड – उत्तराखंडमधील केदारनाथ, बद्रीनाथ येथे दर्शनासाठी गेलेले नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील डोणगाव येथील सर्व ११ युवक सुखरूप असून त्यांच्याशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाला आहे. त्यांच्या परतीच्या प्रवासाचेही नियोजन पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.
मंगळवारी उत्तराखंडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील अकरा युवक अडकून पडले आहेत. हे सर्व युवक सुखरूप आणि पूर, भूस्खलन झालेल्या घटनास्थळापासून १५० किलोमीटर अंतरावर होते. उत्तरकाशी जिल्ह्यात धराली येथे ढगफुटी झाली आहे. त्यामुळे खीरगंगा नदीला मोठा पूर आला आहे. अनेक ठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळे घरांचे नुकसान झाले आहे. अनेक जण बेपत्ताही आहेत. नांदेड जिल्ह्यातील
सचिन पत्तेवार वय २५, शिवचंद्र सुकाळे वय ३०, शिवा कुरे वय ३२, स्वप्निल पत्तेवार वय २५, शिवा ढोबळे वय २८, धनंजय ढोबळे वय २६, नागनाथ मुंके वय २८, देवानंद गौण्डगे वय २४, अमोल कुरे वय २८, सोमनाथ चंदापुरे वय २९ आणि देवानंद चंदापुरे वय २७ हे युवकही उत्तरकाशी जिल्ह्यात सुखरूप आहेत. त्यांच्यातील सचिन पत्तेवार याच्याशी जिल्हा प्रशासनाने संपर्क साधला आहे. त्यांच्या सर्वांचे परतीच्या प्रवासाचेही नियोजन पूर्ण झाले असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले आहे.

उत्तराखंडमध्ये येथे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत आणखी काही यात्रेकरू अडकून पडले असतील तर त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित तालुक्यातील तहसीलदार किंवा जिल्हा आपत्ती जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे ०२४६२ – २३५०७७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. या ११ युवकांव्यतिरिक्त जिल्ह्यातील कोणीही तेथे अडकल्याची माहिती अद्याप तरी आपत्कालीन कार्य केंद्राला दिली नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!