नांदेड : नांदेडचे खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्यावर आज २७ ऑगस्टला जिल्ह्यातील नायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना राज्य शासनामार्फत श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
नायगाव येथे या भूमीपूत्राला संपूर्ण शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पुष्पचक्र अर्पण केले. तसेच शासनामार्फत विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर यांनी पुष्पचक्र अर्पण केले. पोलीस दलातर्फे हवेत तीन फैरी झाडून अंतिम सलामी देण्यात आली. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार प्रामुख्याने उपस्थित होते.
२६ ऑगस्टला हैद्राबाद येथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सोमवारी त्यांचे पार्थिव नायगाव येथे पोहोचल्यानंतर त्यांच्या वडिलोपार्जित वाड्यामध्ये अंत दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर आज त्यांचे मूळ गाव असणाऱ्या नायगाव येथे हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत अंतीम संस्कार करण्यात आले.चव्हाण कुटुंबांच्या मंदिर परिसरातील स्मशानभूमीत त्यांचे चिरंजिव रवींद्र चव्हाण व रंजीत चव्हाण यांनी भडाग्नी दिला. तत्पूर्वी, त्यांना पोलीस दलाच्या वतीने सलामी देण्यात आली. यावेळी त्यांचा पूर्ण परिवार उपस्थित होता.
नायगाव येथे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी संपूर्ण राज्यातून तसेच तेलंगाना व कर्नाटक मधील स्नेही मोठ्या संख्येने पोहोचले होते. तर देशातील व राज्यातील राजकीय पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने पालकमंत्री गिरीश महाजन,राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण,खासदार डाॅ.शिवाजी काळगे, खासदार शोभा बच्छाव, खासदार कल्याण काळे, खासदार संजय जाधव, खा.डॉ.अजित गोपछडे, माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात, आ.अमीत देशमुख, आमदार राजेश पवार, माधवराव जवळगावकर, बालाजी कल्याणकर, डॉ. तुषार राठोड, धीरज देशमुख, प्रज्ञा सातव, विक्रम काळे, जितेश अंतापूरकर, मोहन हंबर्डे, माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर, प्रतापराव पाटील चिखलीकर, हेमंत पाटील, सुभाष वानखेडे, माजी केंद्रीय राज्य मंत्री सूर्यकांता पाटील, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्यासह राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत श्रद्धांजली सभा झाली.
खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या वडिलांचे नाव कै. बळवंतराव अमृतराव चव्हाण होते. बळवंतराव चव्हाण हे देखील विधानसभा व विधान परिषदेवर निवडून आले होते. त्यांचाच राजकीय वारसा वसंतरावांनी पुढे सुरू ठेवला. वसंतरावांचा जन्म दि. १५ ऑगस्ट १९५४ रोजी झाला होता. त्यांचे जन्मस्थळ नांदेड जिल्हयातील नायगांव (बा.) आहे. त्यांचे शिक्षण बी.कॉम असे होते.
सरपंच ते खासदार…खासदार वसंतराव चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ग्रामपंचायत सदस्य, सरपंच अशी केली आहे. सन १९७८ ते २००३ पर्यत सलग २४ वर्ष ते नायगाव ग्रामपंचायतचे सरपंच होते. सन १९९० ते १९९५ या काळात जिल्हा परिषद सदस्य नांदेड. सन २००२ मध्ये जिल्हा परिषदेला दुसऱ्यांदा निवड झाली. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड येथे नांदेड, सन २००२ ते २००८ या कालावधीत विधान परिषद सदस्य होते. २००९ ते २०१४ या काळात ते राज्याच्या विधानसभेमध्ये विधानसभा सदस्य (अपक्ष) होते. त्यांनी रोजगार हमी योजना महाराष्ट्र राज्य समितीचे सदस्य म्हणूनही पद भूषविले. संसदीय कामकाज पध्दतीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी युरोपचा अभ्यास दौरा केला. पुन्हा एकदा २०१४ ते २०१९ या काळात काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून ते निवडून आले. २०२१ ते २०२३ या काळात त्यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. ४ जून २०२४ पासून ते कॉग्रेस पक्षाकडून लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले. खासदार म्हणून त्यांचे कामकाज नुकतेच सुरू झाले होते. राजकीय कारकीर्दीसोबतच त्यांचे सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यातही खूप मोठा सहभाग होता.