
नांदेड – नांदेड लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी झालेल्या मतदानादरम्यान केवळ ६० मशीनचा बदल करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. ‘वंचित’ ने दिलेला आकडा हा मतदानाच्या आदल्या दिवशी मॉक पोल आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी असा दोन्ही मिळून असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिल रोजी मतदान झाले. हे मतदान सर्वत्र शांततापूर्ण वातावरणात झाले. प्रत्यक्ष मतदानादरम्यान २० बॅलट युनिट, १० कंट्रोल युनिट आणि ३० व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आल्या होत्या. या संदर्भात सर्व पक्षांच्या मतदान प्रतिनिधींना माहिती देण्यात आली. त्यांच्या समक्ष ही मशीन बदलण्याची प्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे या सर्व बदलाच्या प्रक्रियेची नोंद भारत निवडणूक आयोगाच्या पोर्टलवरही त्याच क्षणी करण्यात आली आहे.
मतदान यंत्रात बिघाड झाल्यावर बदल करणे स्वाभाविक बाब आहे. यासाठी निवडणूक आयोगाने १० टक्के अतिरिक्त मतदान यंत्र वापरण्यासाठी दिलेले असतात. मॉक पोल दरम्यान म्हणजेच मतदान सुरू होण्यापूर्वी ३२ बॅलेट युनिट, १३ कंट्रोल युनिट आणि २९ व्हीव्हीपॅट बदलण्यात आले होते. तर मतदान सुरू झाल्यावर २० बॅलेट युनिट, १० कंट्रोल युनिट आणि ३० व्हीव्हीपॅट बदलण्यात आले होते.
मशीन बदललेल्या सर्व केंद्रांच्या कागदपत्रांची २७ एप्रिल २०२४ रोजी उमेदवार/प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत निवडणूक निरीक्षक व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननी केली. त्यावेळी कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळली नाही.
सर्व उमेदवारांना मतदान यंत्र तयार करताना डिफेक्टिव्ह आढळलेल्या मशीन, मतदानाच्या दिवशी मॉक पोल दरम्यान व प्रत्यक्ष मतदानाच्या दरम्यान बदललेल्या मतदान यंत्रसंख्येची माहिती २७ एप्रिल रोजी दिलेली आहे. त्या आधारे आरोप केला जात असल्याचेही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने मतदान दरम्यान जवळपास २५० मशीन बदलण्याचा आरोप केला आहे. या मशीन बदलताना कोणत्याही उमेदवाराला निवडणूक विभागाच्या वतीने कळविण्यात आले नसल्याचे म्हटले आहे.त्यामुळे ऐनवेळी या मशीन का बदलल्या असा प्रश्न वंचितने उपस्थित केला आहे. याप्रकरणी १३ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी केवळ पाच ते सहा ठिकाणीच ईव्हीएमबाबत तक्रारी आल्या होत्या. उर्वरित कोणत्याही ठिकाणी ईव्हीएमबाबत तक्रारी आल्या नाहीत. असे असताना २५० ठिकाणी ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्या आहेत ही माहिती जिल्हा निवडणूक विभागानेच दिली असल्याचेही वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.