क्राईम

नांदेडमध्ये पोलीस अधीक्षकांनीच केली अवैध वाळू माफियांवर कारवाई; पोलिसांचे धाडसत्र सुरूच राहणार – अबिनाश कुमार

१६ डिझेल पंप, ६९ तराफे, १ जेसीबी, २०० ब्रास वाळू साठा जप्त, बिहारी मजुरांचीही धरपकड

नांदेड – जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला लगाम घालण्यासाठी आता खुद्द पोलीस अधीक्षकच मैदानात उतरले आहेत. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी बुधवारी पहाटे रहाटी पासून ते पेनुरपर्यंत गोदानदी काठावर पाहणी करत अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर कठोर कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १६ डिझेल पंप जप्त करण्यात आले आहेत. २०० ब्रास वाळूसाठाही जप्त केला असून ६० तराफे आणि एक जेसीबीही पकडण्यात आली आहे. या कारवाईत दोन कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिली.

गोदावरी नदी काठावरील रहाटीपासून ते पेनुरपर्यंत गेल्या अनेक वर्षांपासन मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. या वाळू उपसावर कोणतेही नियंत्रण राहिले नाही. यामध्ये महसूल विभागाने परवानगी दिलेले  अधिकृत रेती घाटही आहेत. परवानगी दिलेल्या वाळू डेपो  या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात नियमांची पायमल्ली करून अवैध वाळू उपसा केला जातो. वाळू डेपोमध्ये वाळू न साठवता थेट ती बाजारात विक्री केली जात आहे. स्थानिक तसेच वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून मनमुरादपणे हा कारभार सुरूच आहे. या बाबीला आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने गेल्या महिनाभरापासून कारवाईला सुरुवात केली आहे.  बुधवारी झालेल्या मोठ्या धाडसत्रात खुद्द पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार हेही सहभागी झाले होते. मंगळवारी रात्रीपासूनच या धाडसत्राचे नियोजन करण्यात आले होते. मोठा फौज फाट्यासह अवैध वाळूचा उपसा करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल १६ डिझेल पंप जप्त करण्यात आले आहेत. ६० तराफे, एक जेसीबी, २०० ब्रास वाळू साठा असा जवळपास दोन कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबतची पंचनामा प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उपसा चालणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिला आहे.
महसूल विभागाकडून वाळू उपसा आणि वाहतुकीसाठी परवानगी दिली जाते. मात्र मोठ्या प्रमाणात यामध्ये अनियमितता होत आहेत. झटपट श्रीमंत होण्यासाठी अनेक गुन्हेगारी वृत्तीचे लोक यामध्ये शिरले आहेत. परिणामी जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. हे गुन्हेगारी प्रमाण रोखण्यासाठी पोलीस विभागाला आता कारवाई करावीच लागणार असल्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. पोलीस विभाग रेतीच्या माध्यमातून होत असलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी यापुढेही असे धाडसत्र कायम ठेवणार असल्याचे  अबिनाश कुमार यांनी सांगितले. जिल्ह्यात वाळू उपसाचे प्रमाण यापुढे निश्चितच वाढणार असल्याची चिन्ह आहेत. याबाबतची तयारी मोठ्या प्रमाणात वाळूमाफियाकडून केली जात आहे. या वाळू माफीयांना वेळीच ठेचले नाही तर यापुढेही असा अवैध वाळू उपसा तसेच वाहतूक जिल्ह्यात सुरू राहील. यातून गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल.  त्यामुळे अवैध वाळू उपसा रोखण्यात पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे अबिनाश कुमार यांनी स्पष्ट केले. बुधवारी करण्यात आलेल्या या मोठ्या कारवाईत इतवारा उपविभागाचे पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्यासह इतर पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

जिल्ह्यात गोदावरी नदीसह मांजरा पैनगंगा या प्रमुख नद्यांसह इतर लहान मोठ्या नद्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे हा वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल विभाग अपयशी ठरल्याचे स्पष्ट होत आहे. महसूल विभागाच्या संगनमतानेच हा वाळू उपसा सुरू असल्याचा थेट आरोप नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील प्रमुख आमदारांनी केला होता. यावर थेट कारवाईचे आदेश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले होते. त्यात महसूल विभागाने कारवाई करत मंगळवारी तीन डिझेल पंप जप्त करण्यात आले होते.  मात्र पोलिसांनी त्याच भागात कारवाई करताना तब्बल १६ डिझेल पंप आणखी जप्त केल्या आहेत त्यामुळे महसूलच्या एक दिवस आधी झालेल्या कारवाईवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!