
नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिके अंतर्गत अग्निशमन विभागातर्फे दि.१४ ते २० एप्रिल हा आठवडा अग्निशमन सेवा सप्ताह म्हणून पाळण्यात येणार आहे. त्यानुषंगाने दि.१४ एप्रिल रोजी महापालिकेच्या अग्निशमन केंद्र येथे झालेल्या कार्यक्रमात अग्निशमन सेवा सप्ताहास सुरुवात करण्यात आली.
सदर कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत हे अध्यक्षस्थानी तर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी हुतात्मा स्मारकास मानवंदना देऊन, पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली अर्पित करण्यात आली. तसेच १९४४ साली मुंबई गोदीत जहाजला लागलेल्या भीषण आगीत हुतात्मा झालेले ६६ अग्निशमन जवान व त्यानंतरही विविध ठिकाणी अग्निशमन सेवा बजावताना शहीद झालेल्या जवानांना २ मिनिटे स्तब्ध राहुन श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी केले. यामध्ये अग्निशमन सेवेच्या बळकटीकरणासाठी आयुक्त यांच्या विशेष प्रयत्नाने व मार्गदर्शनाखाली नांदेड महानगरपालिकेने दोन वेगवेगळ्या प्रस्तावाद्वारे जिल्हा वार्षिक योजनेकडे मागणी केलेल्या निधीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मान्यता देऊन महापालिकेस निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे त्या निधीतून महापालिकेस आवश्यकतेनुसार अग्निशमन वाहन खरेदी करणे शक्य झाले. यामुळे महापालिका प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी राऊत यांचे धन्यवाद व्यक्त केले. आयुक्त डॉ . महेशकुमार डोईफोडे यांनी आपल्या मनोगतात अग्निशमन सेवेतील जवानांच्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले. अग्निशमन सेवेची जास्तीत जास्त प्रसिद्धी करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत सूचना दिल्या.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्यासह उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधू, औद्योगिक वसाहत अग्निशमन केंद्राचे अग्निशमन अधिकारी डी.एन.गायकवाड, सहाय्यक आयुक्त मो.गुलाम सादेक, अग्निशमन अधिकारी के.एस.दासरे व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सेवा निवृत्त भांडारपाल विलास पांचाळ व आभार प्रदर्शन अग्निशमन अधिकारी के.एस.दासरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या समारोपानंतर जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे व उपस्थित इतर सर्व अधिकारी यांनी अग्निशमन केंद्र येथे असलेल्या आपत्ती विषयक साहित्याची व अग्निशमन वाहनांची पाहणी केली.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अग्निशमन सेवा ही अतिशय महत्वाची सेवा असून याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच आग प्रतिबंधत्मक उपाययोजनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. अग्निशमन सेवेतील जवानांच्या कार्याची विशेष नोंद घेऊन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन येत्या १ मे रोजी संबंधिताना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.