
नांदेड – आरक्षणाच्या नावाखाली मराठा समाजाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी मंगळवारी सांगितले. अर्धापूर प्रकरणात पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन कारवाई केली. जिल्ह्यात मराठा आरक्षण प्रकरणात जी काही कारवाई होत आहे त्याचा आमच्याशी काहीही संबंध नसून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून ही कारवाई केली जात असल्याचेही खा . चव्हाण यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यात आले आहे. सगे सोयरे यावरही आचारसंहितेनंतर निर्णय घेतला जाईल हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. आरक्षणाबाबत जे काही आक्षेप आले आहेत त्यावर सुनावणी घेतली जाणार आहे. त्यामुळे आचारसंहितेनंतर हा विषय मार्गी लागेल. मराठा आरक्षण आंदोलकांनी गाडी अडवण्याच्या एका प्रकरणाला आपण सामोरे गेलो. तिथेही आम्ही तक्रार दिली नाही, पुढेही देणार नाही. मराठा आरक्षणाबाबत समाजातील अनेक मान्यवरांशी तसेच अनेक तरुणांशी आपण बोललो आहोत. मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण लागू झाले आहे, हे वास्तव सांगितले. त्यामुळे समाजाचा रोष काही प्रमाणात कमी झाला आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. जरांगे यांनीही आमचा कोणाला पाठिंबा नाही आणि कोणाला विरोधही नाही हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे काही लोक मराठा समाजाला बदनाम करण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याकडून मराठा आंदोलनाचा उपयोग राजकीय फायद्यासाठी घेण्याचा प्रयत्न होत आहे.
मराठा आरक्षणात आपल्याला टारगेट केले जात आहे, हे स्पष्ट करताना दर पाच वर्षाला आपल्यालाच टारगेट केले जाते. यावेळी तर प्रतापरावांपेक्षाही आपणच टारगेटवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुस्लिम समाजाचे आपले आजही चांगले संबंध आहेत. मुस्लिम समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, हे भाजपा खासदार म्हणून मी जाहीरपणे सांगत असल्याचेही ते म्हणाले.
खासदार चव्हाण यांनी यावेळी काँग्रेसचे नेतृत्व कमकुवत झाल्याची टीका केली. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असताना लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात केवळ १७ जागा देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे प्रादेशिक पक्ष असलेल्या शिवसेनेला २१ जागा देण्यात आल्या. मुंबईतही एकच जागा देण्यात आली आहे. भिवंडी, सांगली या काँग्रेसच्या चांगल्या जागाही मिळवता आल्या नाहीत. हे सर्व काँग्रेसच्या कमकुवत नेतृत्वामुळे घडत असल्याचेही चव्हाण म्हणाले. सांगलीत विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे. ही सांगलीची चांगली जागा असताना तीपण काँग्रेसला राखता आली नाही.
यावेळी खासदार चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा हा देशाला विकासाकडे नेणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देश जागतिक पातळीवर बलशाली झाल्याचेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपा महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, प्रवीण साले, दिलीप ठाकूर आदींची उपस्थिती होती.
मला हनुमंतरावांची काळजी… नांदेड येथील प्रा. यशपाल भिंगे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला याबाबत विचारले असता, मला आता हनुमंतरावांची चिंता लागली असल्याची कोपरखळी त्यांनी लगावली. भिंगे यांचा हा चौथा पक्षप्रवेश असल्याचे कुठेतरी वाचले त्यांना शुभेच्छा असेही ते म्हणाले. अशोकरावांची पोकळी भरून करण्यासाठी आपण काँग्रेसची उमेदवारी घेतली असल्याचे वक्तव्य वसंतराव चव्हाण यांनी केले होते. त्यावर उत्तर देताना खासदार चव्हाण यांनी गेल्या निवडणुकीत नायगाव मतदारसंघ पिछाडीवर होता. त्यांनी नायगावचीच पोकळी भरून काढली तरी पुरेशी असल्याचे ते म्हणाले. वसंतरावांना फोन करण्याबाबतही त्यांनी खुलासा करताना नायगावमध्ये विधानसभेलाही ते पिछाडीवर होते, त्यामुळे त्यांना फोन करण्याची गरजच काय असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला.