
नांदेड – एकीकडे जलपर्णी आणि दुसरीकडे वाळू माफीयांच्या कचाट्यात सापडलेल्या गोदावरी नदीला वाळू माफीयांच्या तावडीतून सोडविण्यासाठी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने मोठे पाऊल उचलत नांदेड तालुक्यातील भनगी आणि वाहेगाव येथे जवळपास २४ तासापासून वाळूमाफियांविरुद्ध कारवाई सुरू आहे. या कारवाईत वाळू उपसासाठीचे दहा पंप जिलेटीनच्या स्फोटात नष्ट करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे वाळू माफीयांचे कंबरडे मोडले असून वाळू उपसा करण्यासाठी आणलेल्या बिहारी टोळ्यांचीही धरपकड सुरूच आहे. एकूणच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशाने झालेली ही कारवाई या वर्षीची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, नांदेडचे उपविभागीय अधिकारी विकास माने आणि तहसीलदार संजय वरकड यांच्या नेतृत्वाखाली २७ मे रोजी पोलीस फौजफाट्यासह भनगी आणि वाहेगाव येथील अवैध वाळू माफियावरील कारवाईस प्रारंभ करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक आयलाने यांच्या नेतृत्वाखाली एक शीघ्र कृती दलाचे पथकही या कारवाईत सहभागी झाले आहे. मोठ्या फौजफाट्यासह सुरू असलेल्या या कारवाईनंतर अनेक वाळूमाफिया भूमिगत झाले आहेत. त्यांचा मोठ्या प्रमाणात शोध घेतला जात आहे.
या मोहिमेअंतर्गत नदीपात्रातील अवैध रेती उपसा करणारे १० इंजिन पंप जिलेटीनच्या स्फोटात नष्ट करण्यात आले आहेत. ४० तराफेही जप्त करण्यात आले असून ते नष्ट केले आहेत. या कारवाईत अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन हायवा ट्रकही पकडण्यात आले आहेत. या हायवा नांदेड तहसील कार्यालयात जमा केल्या आहेत. अवैध वाळू उपसा करून साठा केलेला जवळपास १५० ब्रास वाळूचा साठा शासकीय वाळू डेपो खूपसरवाडी येथे जमा करण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्हाभरात वाळू काढण्यासाठी आणलेल्या बिहारी टोळ्यांचाही शोध घेतला जात आहे. बिहारी मजुरांच्या छावण्या उध्वस्त करून काही बिहारी मजूर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत. या कारवाईत मंडळ अधिकारी प्रफुल्ल खंडागळे, आर. डी. शिंदे, अनिल धुळगंडे, तलाठी संताजी देवापुरकर, माधव भिसे, रमेश गिरी, रामेश्वर भिंगोरे पवार, कोतवाल शिवा तेलंगे, अजिंक्य सुरवसे, अर्जुन जानोळे, बालाजी सोनटक्के, जहिरुद्दीन, किरण श्रीवास्तव, आशिष अंभोरे आदींनी सहभाग घेतला आहे.
जिल्ह्यात गोदावरीसह मांजरा नदीतील अवैध वाळू उपसाकडे ‘नांदेड स्क्रिप्ट’च्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. प्रशासकीय परवानगीपेक्षा कितीतरी पटीने अधिक वाळूसाठा वाळू डेपोमध्येच शासकीय खर्चानेच करण्यात आला आहे. आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने हा साठा केला जात असून पावसाळ्यात चढ्या दराने वाळूची विक्री करून नफाखोरी करण्यासाठी ठेकेदाराकडून हा वाळूसाठा केला जात आहे. तर दुसरीकडे गोदावरी आणि मांजरा नदीपात्रातूनच वाळूमाफीयांच्या माध्यमातून थेट लातूर, कुर्डूवाडी, उदगीर, सोलापूर, पुणे, नगर तसेच शेजारील तेलंगणा कर्नाटक राज्यात मोठ्या प्रमाणात वाळू सोन्याच्या भावात विक्री केली जात आहे. जिल्ह्याला वरदान लाभलेल्या लाल वाळूची कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात २२ ते २४ चाकी वाहनातून वाहतूक होत आहे. मोठ्या प्रमाणात ही वाहतूक ओव्हरलोड असली तरीही त्याकडे दुर्लक्षच केले जात आहे. वाळू वाहतुकीसाठी केवळ सहा चाकी वाहनांचा अथवा ट्रॅक्टरचा वापर करावा असा नियम आहे, परंतु हा नियम पायदळी तुडवला जात आहे. नांदेडच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या हाणामारीपर्यंतच्या प्रकाराकडे पाहिले असता ओव्हरलोड वाळू वाहतुकीवर कारवाईची अपेक्षा चुकीचीच ठरणार आहे. दोन दिवसांपूर्वीच सगरोळी येथील वाळू धक्क्यावरून निघालेल्या भरधाव वेगातील हायवा ट्रकने दुचाकीला उडवले. यात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता.
देगलूर, बिलोलीत हवा आहे कारवाईचा असाच एक मोठा बडगा…जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या सर्व प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देत प्रारंभी विष्णुपुरी प्रकल्प क्षेत्रातूनच सुरू असलेला अवैध वाळू उपसा बंद केला आहे. दुसरीकडे सामान्य महसूलच्या कर्मचाऱ्यांच्या भाषेत कारवाईच्या पलीकडे गेलेला भाग म्हणून भणगी ओळखला जातो. त्या भनगीत २४ तासापासून कारवाई सुरू आहे. असाच एक कारवाईचा मोठा बडगा आता देगलूर आणि बिलोली तालुक्यातही आवश्यक आहे. त्यातून लाल वाळूची होणारी तस्करी थांबण्यास मोठी मदत होईल. एकूणच पर्यावरणास पूरक अशीच ही कारवाई ठरणार आहे. या कारवाईकडेही आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. महसूल प्रशासन प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी हे निवडणुकीच्या आणि आता लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या कामात गुंतलेले पाहून वाळूमाफीयांनी सर्व नियमांना धुडकावून २४ तास वाळू उपसा सुरू केला होता. त्याला आता आळा बसेल अशीच अपेक्षा केली जात आहे.